‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘आप’ के अडैल रुख पे ’कमल’ जरा मलूल है।
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥

खुली खुली ये बात है की उलझा हुआ ये दाव है-२
सोचना ये सोच है की सोच ही पडाव है
अण्णा जिधर गये – २
अण्णा जिधर गये वहॉसे ’लोकपाल’ दूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥१॥

झुकी झुकी निगाह में भी है बला की मग्रूरी -२
दबी दबी सी बात मे भी छुपी हुई धुरंधरी
ये पेच दिल्लीका-२
ये पेच दिल्लीका अब बन गया नुपूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥२॥

गीत – गंगाधर मुटे
संगीत – अरविंद हर्षवर्धन
गायिका – बि. किरण
फ़िल्म – ’आप’ के हसिन सपने
’दूम दबाके दिल्ली भागी’ प्रॉडक्शन की प्रस्तुती
————————————————————

नागपुरी तडका – ई पुस्तक

                 ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे या प्रकाशनसंस्थेने “नागपुरी तडका” हा माझा Online कवितासंग्रह आज प्रकाशीत केलाय, त्याबद्दल मी “ई साहित्य प्रतिष्ठान” चमूचा आभारी आहे.
                                                                                                                   
*  *  *  *
PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता चित्रावर क्लिक करा.
प्रकाशकाचे दोन शब्द

                          मराठी अमृताहून गोड भाषा. पण तिच्या ग्रामीण बोलींना जो गोडवा, तजेला आणि मसालेदार झणझणीत तडका आहे तो पुस्तकी शहरी मराठीत नाही. कोकणची खुमासदार मालवणी घ्या किंवा कोपरखळ्या मारणारी अहमदनगरची नगरी , सणसणीत गोळीबंद आगरी किंवा मिठ्ठास खानदेशातली अहिराणी. गांवोगांवच्या या भाषांची मज्जाच न्यारी. अगदी ज्वारीच्या भाकरीबरोबर तांबड्या रश्शासारखी. ज्यांनी अशा भाषांतून व्यवहार केला नाही ते कमनशीबीच. या भाषा म्हणजे अस्सल संस्कृतीची खाण आहे. त्यामुळे आज वऱ्हाडी भाषेतल्या या कवितांची मेजवानी तुमच्यासमोर आणताना आम्हाला प्रचंड आनंद होत आहे. 

                          पण गंगाधर मुटे यांच्या नागपुरी तडक्यात केवळ भाषेचा फ़ुलबाग नाही. काळजाची आग आहे. उपाशी शेतकऱ्याच्या पोटात खवळणाऱ्या अॅसिडमधल्या या कविता आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अत्महत्यांवर अश्रू गाळणारं भरपूर लिखाण आजवर झालंय. “बिचारा शेतकरी” असंच विदर्भातल्या शेतकऱ्याचं वर्णन इतर लेखक कवी करतात. मनापासून त्यांना त्याच्या दुःखाची संवेदना जाणवते यात वाद नाही. पण गंगाधर मुटेंच्या कवितेत हाच शेतकरी हात पसरून नाही तर मुठी वळून येतो. वाकून नाही तर ताठ मानेने येतो. गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागतो. त्यांची जनता बिचारी नाही तर विचारी आहे. आणि ती अविचारी होण्यापुर्वी पिळणाऱ्यानी आणि गिळणाऱ्यानी सावध व्हावे असा इशारा ती घेऊन येते. त्यांचा शेतकरी “खादीचं धोतर सोडून, मांजरपाठ घालणाऱ्या” पुढाऱ्यांना खणखणीत दणके घालणारा आहे. 

                          गंगाधरजींच्या कविता मरगळलेल्या शेतकऱ्याला स्फ़ूर्ती देणाऱ्या आहेत. या कविता केवळ आरामखुर्चीतलं वाचन नाहीत. भविष्यकाळाला घडवण्याची ताकद असलेल्या जनसंमर्दाला झोपेतून जागं करणाऱ्या आहेत. आपल्याला त्या नक्की आवडतील.

PDF स्वरुपातील पुस्तक वाचण्याकरिता येथे क्लिक करा.
———————————————————————————————-

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता…।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता… ॥

                                                  – गंगाधर मुटे
———————————————————

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

मी तुझी साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

टक्कलाला तुझ्या तूप मी लावते
दे मला एकदा तू ’अभय’ राजसा

                                  – गंगाधर मुटे
—————————————

भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

भारतीय सणांचे अनर्थशास्त्र

                      त्या दिवशी भल्या पहाटेच चक्रधर माझ्याकडे आला होता. त्याला माझ्याकडून प्रवाशीबॅग हवी होती पंढरपूरला जायला. असा अचानक चक्रधर पंढरपूरला जायची तयारी करतोय हे ऐकून मी उडालोच. आदल्या दिवशीच माझे त्याच्याशी बोलणे झाले होते. एका खासगी कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला चलतोस का म्हणून विचारले तर म्हणत होता की, त्याला निदान एक पंधरवडा तरी अजिबात फुरसत नाहीच. शेतीची आंतरमशागत करायचीय, फवारणी करायचीय, निंदन-खूरपण करायचेय. अर्थात तो खोटेही बोलत नव्हता. त्याचे शेत माझ्या शेतापासून थोड्याशाच अंतरावर असल्याने मला त्याच्या शेतीची आणि शेतीतील पिकांची इत्थंभूत माहिती होती.


                   चक्रधर शेती करायला लागल्यापासून पहिल्यांदाच त्याच्या शेतीत इतकी चांगली पिकपरिस्थिती होती. यंदा त्याने छातीला माती लावून सार्‍या गावाच्या आधीच कपाशीची धूळपेरणी उरकून टाकली होती. पावसानेही आपला नेहमीचा बेभरंवशाचा खाक्या सोडून चक्रधरला साथ दिली आणि त्याची कपाशीची लागवड एकदम जमून गेली. नशीब नेहमी धाडसी लोकांनाच दाद देत असते याची प्रचिती यावी असाच हा प्रसंग होता. त्यामुळे हुरूप आलेला चक्रधर दमछाक होईपर्यंत शेतीत राबायला लागला होता. त्याला विश्वास होता की, यंदा आपली “इडापिडा टळणार आणि सावकाराच्या पाशातून मुक्ती मिळणार”. भरघोस उत्पन्न आले आणि कर्मधर्म संयोगाने जर भावही चांगले मिळालेत तर ते अशक्यही नव्हते. त्यामुळे कीटकनाशक कंपनीच्या कार्यक्रमाला येत नाही म्हटल्यावर मलाही फारसे नवल वाटले नाही. 

                    पण चक्रधर आता असा अकस्मात पंढरपूरला जायची तयारी करतोय हे मला अनपेक्षित होते. नेमके काय गौडबंगाल आहे हे जाणून घ्यायची माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी प्रथम त्याच्या हातात प्रवाशी बॅग दिली, प्रवासाला शुभेच्छा दिल्या, येताना माझ्यासाठी पांडुरंगांचा प्रसाद घेऊन यावा, अशी विनंती केली आणि मग हळूच विचारले होते,

“काय चक्रधर, असा अचानक कसा काय बेत आखला बुवा पंढरपूरचा?”
“आरं, मी कसला काय बेत आखतो पंढरीचा? तो पांडुरंगच मला बोलवायला आलाय ना स्वतःहून” इति चक्रधर.
“स्वतःहून थेट पांडुरंगच आला तुला निमंत्रण द्यायला?” आश्चर्याने डोळे विस्फारून मी विचारले. 
“हं मग? इच्छा त्या पांडुरंगाची. दुसरं काय?” चक्रधर निर्विकारपणे सांगत होता.
“अरे, पण मी तर ऐकलंय की पांडुरंग निर्गुण-निराकार असतो. शिवाय तो बोलत पण नसतो” या विषयातील आपले तुटपुंजे ज्ञान उगाळत मी बोललो.
“तसं नाही रे, पंढरीचा विठोबा स्वप्नात आलाय तो त्या रावसाहेबांच्या” माझ्या प्रश्नाचा उबग आल्यागत चक्रधर बोलत होता. पण आता मला संवाद थांबवणे शक्य नव्हते. माझी उत्कंठा शिगेला पोचली होती.
“रावसाहेबांच्या स्वप्नात? रावसाहेब आणि तुला, दोघांनाही बोलावलं होय?” मी प्रश्न फेकलाच.
“आरं बाबा, तसं नाही रे. आत्ता पहाटेपहाटे विठोबा-रुक्मिणी दोघंबी रावसाहेबांच्या स्वप्नात आलेत आणि रावसाहेबांना आदेशच दिला की चक्रधरला तातडीने पंढरीला पाठवून दे. बिचारे रावसाहेब धावतपळत माझ्याकडे आलेत आणि म्हणालेत की, तू आताच्या आत्ता सकाळच्या गाडीने तातडीने पंढरपूरसाठी नीघ. मी पैशाची अडचण सांगायच्या आधीच रावसाहेबांनी माझ्या हातावर जाण्यायेण्याला पुरून उरतील एवढे पैसे पण ठेवलेत. लई मायाळू माणूस आहे बघा आपले रावसाहेब.” माझ्या प्रश्नाच्या सरबत्तीला वैतागलेल्या चक्रधरने एका दमात सगळे सांगून टाकले आणि झपाझप पावले टाकत निघून गेला.

                    पंढरीची वारी करून चक्रधर जेव्हा परतला तेव्हा सारेच काही बदललेले होते. फवारणी अभावी कपाशीची वाढ खुंटून झाड खुरटले होते. मशागत व खुरपणी अभावी तणांची बेसुमार वाढ झाली होती. आल्याआल्या मशागत सुरू करावी तर पाऊस सुरू झाला होता. पाऊस नुसताच सुरू झाला नव्हता तर ठाण मांडून बसला होता. आकाशातील ढग पांगायचे नावच घेईना. म्हणजे झाले असे की, जेव्हा उघाड होती आणि मशागत करण्यायोग्य स्थिती होती तेव्हा चक्रधर पंढरपुरात होता आणि आता चक्रधर शेतात होता तर पावसामुळे मशागतीचे काम करणे अशक्य झाले होते. शेवटी तणाची वाढ एवढी झाली की शेतात जिकडेतिकडे गवतच गवत दिसत होते. कपाशी गवताखाली पूर्णपणे दबून गेली होती. त्यामुळे जे व्हायचे तेच झाले. एकावर्षात सावकाराच्या म्हणजे रावसाहेबाच्या कर्जाच्या पाशातून मुक्त व्हायची गोष्ट दूर, उलट कर्जबाजारीपणाचा डोंगरच वाढत जाणार होता. 

                         रावसाहेब सावकार मात्र आनंदी होते. त्यांनी स्वप्न पडल्याची मारलेली थाप त्यांना मस्तपैकी कामी आली होती. ऋणको जर स्वयंपूर्ण झाला तर धनकोची दुकानदारी कशी चालेल? त्यासाठी ऋणको नेहमीच कर्जात बुडूनच राहावा, हीच धनकोची इच्छा असते. त्यासाठीच नाना तर्‍हेच्या कॢप्त्या लढविण्याचे कार्य धनकोद्वारा अव्याहतपणे चाललेले असते. 



                   मी जेव्हा ही गोष्ट अनेकांना सांगतो तेव्हा त्यांना सावकाराचाच राग येतो. कोपरापासून ढोपरापर्यंत सोलून काढण्याचीही भाषा केली जाते मात्र शेतीच्या ऐन हंगामातच पंढरपूरची यात्रा का भरते? याचे उत्तर कोणीच देत नाही. पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तवर्गामध्ये शेतकरी समाजच जास्त आहे. ज्या वेळी शेतकर्‍यांनी आपल्या शेतीतच पूर्णवेळ लक्ष द्यायची गरज असते, नेमकी तेव्हाच आषाढी किंवा कार्तिकीची महिमा का सुरू होते? याचा धार्मिक किंवा पुराणशास्त्रीय विचार करण्यापेक्षा तार्किक पातळीवर विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

                         संपूर्ण भारतवर्षात शेतीचा हंगाम सर्वसाधारणपणे जून महिन्यामध्ये सुरू होतो आणि डिसेंबर मध्ये मुख्य हंगाम म्हणजे खरीप हंगाम संपतो. विचित्र गोष्ट अशी की, भारतातील सर्व मुख्य सण याच काळात येतात. जून मध्ये हंगाम सुरू झाला की शेतीच्या मुख्य खर्चाला सुरुवात होते. आधीच कर्ज काढून शेती करणार्‍याला हे सण आणखीच कर्जात ढकलायला लागतात. या सणांच्या खर्चातून शेतकर्‍याला बाहेर पडताच येणार नाही, अशी पुरेपूर व्यवस्था झालेली आहे, हेही ठळकपणे जाणवते. या काळात येणार्‍या सर्व सणांचे त्या-त्या सणानुरूप करावयाच्या पक्वान्नाचे मेनू ठरलेले आहेत. नागपंचमीला करंजी, लाडू, चकल्या कराव्या लागतात. रक्षाबंधनाला राखी बांधायला भावाने बहिणीकडे किंवा बहिणीने भावाकडे जायचेच असते. मग एकाचा खर्च प्रवासात होतो तर दुसर्‍याचा पाहुणचार करण्यात. पोळा आला की बैलाला सजवावेच लागते. घरात गोडधड रांधावेच लागते. त्यातही एखाद्या चाणाक्ष काटकसरी शेतकर्‍याने पोळ्यानिमित्त घरात पंचपक्वान्न करून खाण्यापेक्षा तेवढ्याच पैशात शेतामध्ये दोन रासायनिक खताची पोती घालायचे ठरवले तरी ते शक्य होत नाही कारण या दिवशी शेतकर्‍याने आपल्या घरी गडीमाणूस जेवायला सांगणे, हा रितिरिवाज लावून दिल्या गेला आहे. परका माणूस घरात जेवायला येणार असल्याने पंचपक्वान्न करणे टाळताच येत नाही. अशा तर्‍हेने शेतकर्‍याला खर्चापासून परावृत्त होण्याचा मार्गच बंद करून टाकल्या गेला आहे. शिवाय पोळा हा तीन दिवसाचा असतो. वाढबैल, बैल आणि नंदीपोळा. हे तीन दिवस बैलाच्या खांद्यावर जू देता येत नाही. मग होते असे की जेव्हा उघाड असते आणि शेतात औतकाम करणे शक्य असते, त्यावेळेस पोळा असल्यामुळे काम करता येत नाही. पोळा संपला आणि जरका लगेच पाऊस सुरू झाला तर मग पावसामुळे काम करता येत नाही. कधी कधी या तर्‍हेने आठवडा किंवा चक्क पंधरवडा वाया जातो. मग त्याचे गंभीर परिणाम पिकांना भोगावे लागतात.

                          हरितालिका, ऋषिपंचमी, मंगळागौर, कान्होबा, महालक्ष्मी-गौरीपुजन, श्रावणमास याच काळात येतात. आखाडी व अखरपख(सर्व पितृदर्श अमावस्या) या सणांचा मारही खरीप हंगामालाच सोसावा लागतो. गणपती बाप्पा आले की ठाण मांडून बसतात. शारदादेवी, दुर्गादेवी यांचे नवरात्र पाळायचे नाही म्हटले तर त्यांचा प्रकोप होण्याची भिती मनात घर करून बसली असते शिवाय यांना यायला आणि जायला गाजावाजा व मिरवणूक लागते. बाप्पांना दहा-पंधरा दिवस मोदक पुरवावेच लागतात. बदाम, नारळ खारका द्याव्याच लागतात. दुर्गादेवीची ओटी भरावीच लागते. ते संपत नाही तोच दसरा येतो, दसर्‍याची नवलाई संपायच्या आधीच भुलोजी राणाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या भुलाबाई येतात. भोंडला, हादग्याला जुळूनच कोजागरी येते. 

                         शेतीचा हंगाम अगदी भरात असतो. ज्वारी हुरड्यावर, कपाशी बोंडावर आणि तुरी फ़ुलोर्‍यावर येण्याला सुरुवात झालेली असते. अजून पीक पक्व व्हायला, बाजारात जायला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला अजून बराच अवकाश असतो आणि तरीही आतापर्यंत डबघाईस आलेल्या शेतकर्‍याचे कंबरडे मोडण्यासाठी मग आगमन होते एका नव्या प्रकाशपर्वाचे. दिव्यांची आरास आणि फटक्याच्या आतषबाजीचे. एकीकडे कर्ज काढून सण साजरे करू नये म्हणून शेतकर्‍याला वारंवार आवाहन करणार्‍या शहाण्यांचे पीक येते मात्र दुसरीकडे हे सर्व सण शेतकर्‍यांच्या दारासमोर दत्त म्हणून उभे ठाकत असते. दिवाळी जसा प्रकाश आणि आतषबाजीचा सण आहे तसाच पंचपक्वान्न व वेगवेगळे चवदार पदार्थ करून खाण्याचा सण आहे. शेतकर्‍याने जरी सण साजरा करायचे नाही असे ठरवले तर शेजार्‍याच्या घरातून खमंग वासाचे तरंग उठत असताना शेतकर्‍याच्या मुलांनी काय जिभल्या चाटत बसायचे? दिवाळीला नवे कापड परिधान करायचे असते. नवीन कापड खरेदीसाठी पुन्हा कर्ज काढायचे किंवा कापड दुकानातून उधारीवर खरेदी करायची. लक्ष्मीपूजनासाठी स्पेशल दिवस नेमला गेला आहे. शेतीत पिकविलेला कोणताच शेतमाल जर विक्रीस गेला नसेल तर शेतकर्‍याच्या घरात लक्ष्मी तरी कुठून येणार? मग लक्ष्मीपूजन तरी कोणत्या लक्ष्मीचे करायचे? शेतकरी ज्या लक्ष्मीचे पूजन करतो, ती लक्ष्मी उसणवारीची असून तिचे मालकीहक्क सावकार किंवा बॅंकेकडे असतात. त्याच्या घरावर झगमगणार्‍या आकाशदिव्यांचे कॉपीराईटस जनरल स्टोअरवाल्याच्या स्वाधीन आणि घरात तेवणार्‍या दिवावातीतील तेलाचे सर्वाधिकार किराणा दुकानदाराच्या ताब्यात असतात. शेतीचे खर्च आणि या सर्व सणांचे खर्च भागवण्यासाठी शेतातील उभे पीक शेतकर्‍याच्या घरात पोचायच्या आधीच गहाण झालेले असते. या सर्व सणांनी शेतकर्‍याला पुरेपूर कर्जबाजारी करून त्याच्या कमरेला धडूतही शिल्लक ठेवायचे नाही, असा निर्धारच केलेला दिसतो.

                          आणि सर्वात महत्त्वाची आणि उपराटी बाब अशी की डिसेंबरमध्ये माल बाजारात जायला लागला आणि शेतकर्‍याच्या घरात पैसा यायला लागला की अचानक सणांची मालिका खंडीत होते. गाढवाच्या सिंगाप्रमाणे सण नावाचा प्रकारच गायब होतो. डिसेंबर नंतर जे सण येतात ते निव्वळच बिनखर्चिक असतात. “तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला” असे म्हणत तिळगुळाच्या भुरक्यावरच तिळसंक्रांत पार पडते. बारा आण्याच्या रंगामध्ये होळीची बोळवण केली जाते. तांदळाची खीर केली की अक्षय तृतीया आटोपून जाते. खरीप हंगामात येणारी श्रीकृष्ण जन्माष्टमी घराघरात साजरी केली जाते. मात्र उन्हाळ्यात येणारी रामनवमी व हनुमान जयंती केवळ मंदिरातच साजरी केली जाते आणि शेतकर्‍यांना पदरचा खडकूही न खर्च करता फुकटातच प्रसाद खायला मिळतो. म्हणजे असे की शेतकर्‍याच्या घरात जेव्हा त्याच्या कमाईचा पैसा येतो, तेव्हा त्याने त्या पैशाने सण वगैरे साजरे करण्याची अजिबात सोय नाही. स्वतः मिळविलेल्या मिळकतीतून नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत. स्वत:च्या मिळकतीच्या पैशाने गोडधड-पंचपक्वान्ने करून मुलाबाळांना खाऊ घालायची नाहीत. बहिणीने भावाच्या घरी किंवा बापाने पोरीच्या घरी जायचे नाही. केवळ आणि केवळ माल विकून पैसा आला की त्याने किराणा, कापड दुकानाची उधारी फेडायची. बॅंका किंवा सावकाराची कर्जफेड किंवा व्याज फेड करायची आणि पुढील हंगामातील शेतीसाठी नव्याने कर्ज घ्यायला तयार व्हायचे. अजबच तर्‍हा आहे या कृषिप्रधान म्हणवणार्‍या देशातील सणांच्या संस्कृतीची.

                          सणांच्या निर्मितीमागचे ऐतिहासिक महत्त्व विशद करणारे पुराणशास्त्री काहीही म्हणोत, परंतु शेतीमधल्या मिळकतीचा संचय शेतकर्‍याच्या घरात होताच कामा नये, शेतकरी कायमच कर्जबाजारी राहावा हा उद्देश स्पष्टपणे डोळ्यासमोर ठेवूनच सणांची निर्मिती आणि रीतिरिवाज अगदी प्राचीन काळापासून नियोजनबद्धरितीने आखल्या गेले आहे, हे उघड आहे. ज्या हंगामात शेतीमध्ये शेतकर्‍याने स्वतःला झोकून देऊन कामे करायची असतात त्याच काळात इतक्या सणांचा बडेजाव शेतीव्यवसायाला उपयोगाचा नाही. उत्पादनासंबंधी आवश्यक तो खर्च करावयाच्या काळात सणासारख्या अनुत्पादक बाबीवर अनाठायी खर्च करणे, शेतीव्यवसायाला कधीच फायदेशीर ठरू शकणार नाही. सणांचे अनर्थशास्त्र शेतीच्या अर्थशास्त्राला अत्यंत मारक ठरले आहे, ही खूणगाठ मनाशी बांधूनच पुढील वाटचाल होणे अत्यंत गरजेचे आहे.

                                                                                                                                    – गंगाधर मुटे
—————————————————————————————————————————————-
(पूर्वप्रकाशित – देशोन्नती दिवाळी अंक-२०१२)

कापला रेशमाच्या सुताने गळा

.
.
——————————————————–
कशी दाद देऊ मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, तुला गालिच्यांचा लळा
आरसी – ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते, पण;
त्या तिथे गावी बापास मिळत नाही कोरडा जोंधळा
———————————————————
.
.
कापला रेशमाच्या सुताने गळा
.

जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा

घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा

साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?

राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?

भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा

झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा

रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा

मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा

चित्त शाबूत असणे ”अभय” चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा

                               – गंगाधर मुटे
—————————————
अवांतर – एक विडंबन

मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी….॥
—————————————

टुकारघोडे! (हझल)

टुकारघोडे! (हझल)

 उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी
कितीतरी जाड पुस्तकांचे लिखान माझे तयार आहे

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

                                                    – गंगाधर मुटे
————————————————–

राखेमधे लोळतो मी (हजल)

राखेमधे लोळतो मी (हजल)

मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                                     गंगाधर मुटे
————————————-
(तर ही हजल)

लगान एकदा तरी….

लगान एकदा तरी….. (हझल)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

                                             – गंगाधर मुटे
……………………………………………………………………………………….
वृत्त : कलिंदनंदिनी     काफिया : महान    रदीफ : एकदा तरी 

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
……………………………………………………………………………………….

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला …॥१॥

गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला …॥२॥

मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला …॥३॥

पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला …॥४॥

अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला …॥५॥

                                                  गंगाधर मुटे
————————————————————
मारखुंडा = मारकुडा, पारखुंडा = पारखी, पारख करणारा
————————————————————