साप गिळतोय सापाला

साप गिळतोय सापाला

               बळी तो कान पिळी किंवा मोठे मासे लहान मास्याला गिळतात, यासारख्या म्हणी बर्‍याचदा ऐकायला मिळाल्या होत्या मात्र आज सकाळी ८ च्या सुमारास शेतात चक्क एक भला मोठा विषारी नाग एका बिनविषारी सापाला गिळताना बघायला मिळाला.

             एक अतिजहाल विषारी गव्हाळ्या नाग एका बिनविषारी लांबलचक धामण जातीच्या सापाला गिळण्याचा प्रयत्न करत होता. गव्हाळ्या नाग कात टाकण्याच्या अवस्थेत (कोषी आल्याने) त्याची हालचाल बरीच मंद होती. बिळातून २ फ़ूट बाहेर तोंड काढून त्याने आपले भक्ष पकडलेले होते. धामण बरीच लांबलचक असल्याने नागाला सहजासहजी आपले भक्ष्य गिळंकृत करता येत नव्हते. लढत काट्याची होईल असे स्पष्ट जाणवत होते.

             छायाचित्र घेण्यासाठी हवी तशी जागा उपलब्ध नसल्याने हवा तसा फ़ोटो मोबाईलने घेता आला नाही.
शिवाय मला अन्य कामासाठी शेत सोडून जायचे असल्याने पुढे काय झाले ते पाहता आले नाही.

snake

बोल बैला बोल : नागपुरी तडका

बोल बैला बोल : नागपुरी तडका

        बोल बैला बोल तुला बोललंच पाह्यजे
        बांधलेलं मुस्कं आता सोडलंच पाह्यजे…!

नांगर ओढू ओढू जेव्हा तोंड फेसाळंले
कोणी तरी आला का रे हाल पुसायाले?
ज्यांच्यासाठी पिकवलेस वखारभरून धान्य
आहेत का रे तरी त्यांना हक्क तुझे मान्य?
फ़ुकामधी रक्त आटणं थांबलंच पाह्यजे….!

        थंडी-पाऊस, ऊन-वारा छातीवरी पेलतोस
        वादळाचे तडाखे शिंगावरी झेलतोस
        तेव्हा कुठे हिरवीगार होते काळी आई
        तरी का रे तुझे श्रम मातीमोल जाई?
        लुटीचं अर्थकारण तू शिकलंच पाह्यजे…!

इच्छाधारी गायवासरे राजबिंडे नवी
खुर्चीसाठी त्यांना तुझी हाडंकुडं हवी
तुझे कष्ट त्यांचे लेखी भिक्षापात्रतेचे
ऐद्यांना देणार ‘अभय’ अन्न सुरक्षेचे
जागा हो बैलोबा तू जागलंच पाह्यजे…!

                               – गंगाधर मुटे ‘अभय’
————————————————

बायोडिझेल निर्मिती व्हावी : सकाळ प्रतिक्रिया

बायोडिझेल निर्मिती व्हावी

                           देशाचे “ग्रोथ इंजिन’ असलेला महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्राबद्दल मोठा जागर १६ सप्टेंबरपासून “अपेक्षा महाराष्ट्राच्या’ या सदराखाली दैनिक “सकाळ”च्या व्यासपीठावर सुरू झाला.
त्याअनुषंगाने १६ सप्टेंबरच्या सकाळमध्ये प्रकाशीत झालेली माझी प्रतिक्रिया.

 

सकाळ

           शेतीव्यवसायामध्ये रोजगाराच्या अमाप संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता असल्याने शेती-व्यवसायाला मुख्य प्रवाहात आणल्याखेरीज औद्योगिक विकासामध्ये आपल्याला गरूड झेप घेताच येणार नाही. त्यासाठी शेतीक्षेत्राला उद्योगासारखी वागणूक मिळणे गरजेचे आहे. शासकीय धोरणे अनुकूल आणि वित्तियसंस्थांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला तर राज्याच्या औद्योगिक विकासात शेतीक्षेत्र फार मोठा सहभाग नोंदवू शकेल. नाशिवंत मालाचे गरजेपेक्षा जास्त प्रमाणावर उत्पादन आले तर त्या शेतमालाची अक्षरशः माती होते. वांगे, टमाटर व अन्य पालेभाज्या सडून जातात. अशावेळी नाशवंत शेतमालावर प्रक्रिया केली तर शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही लाभ होऊ शकतो. परदेशात फ्रोजन फूड मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. लगेच फ्रीझ केलेले पदार्थ हे कधी कधी ‘ताज्या’ हूनही अधिक ताजे असतात. स्टोरेज आणि फ्रोजन/पॅकेज्ड फूड टेक्नॉलॉजीच्या बाबतीत अनेक देश स्थापित अवस्थेमध्ये वावरत आहेत. जे तंत्रज्ञान आज परदेशात वापरले जाते तसे तंत्रज्ञान आमचा देश कृषिप्रधान वगैरे असूनही विकसित करू शकलेला नाही. बायोडिझेल निर्मिती हा अत्यंत सोपा आणि अत्यंत कमी भांडवली गुंतवणूक लागणारा प्रक्रिया उद्योग आहे. शेतकर्‍यांच्या घराघरात बायोडिझेलची निर्मिती होऊ शकते, पेट्रोलजन्य पदार्थावर अमाप खर्च होणारे परकीय चलन वाचू शकते. पण त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. 
                                                                                                                 – गंगाधर मुटे
————————————————————————————————————