राख होऊन मेला : नागपुरी तडका

राख होऊन मेला : नागपुरी तडका

हप्ता थकला म्हूनशान, वसुलीले गेला
हप्ता गेला भाडमंधी, राख होऊन मेला  ….॥१॥

पंचीस पेट्या महिनेवारी, सेटींग जमून व्हते
तारखेवार भेटेस्तोवर, काईबी प्राब्लेम नोते
कायच्यातबी काईबी मिसळा, देल्ली व्हती हमी
साधेसिधे समिकरन; अर्धे तुमी, अर्धे आमी
हप्त्यापायी जीव जाईन, माहित नोयतं त्येला  ….॥२॥

महिना उलटून गेला बैन, हप्ता नाई आला
मंग जीव सायबाचा, कालवाकालव झाला
सायेब म्हने श्याम्या तुह्या, मनात बद्दी आली?
हप्ता नाय तं धंदा नाय, कायढीन तुह्या साली
हप्त्यासाठी सांग तुनं, उशीर काहून केला?  ….॥३॥

श्याम्या म्हणे उशिर कारन, मेली माही बायकू
सायेब म्हने, तुह्या बाह्यना, मी कायले आयकू?
माय मरन, पोट्टं मरन, उद्या मरन तुहा भाऊ
आमी किती दिवस मंग असे, हप्त्याबिना राहू?
एकटा मीच खात नाय, वर्तून आडर आला  ….॥४॥

“पोट्टं मरन” म्हनल्यावर, झकापकी झाली
तळपायाची आग मंग, मस्तकात गेली
गुंडा नोयता तरीबी पन, गुंड्यावानी वागला
अध्धर उचलून सायबाले, भट्टीमंधी फ़ेकला
कोनी अभय ह्यो देस, भलतीकडं नेला?
हप्ता गेला भाडमंधी, भट्टीमंधी मेला ….॥५॥

                         गंगाधर मुटे
————————————————————————–
भाड = भट्टी, लोहाराचा भाता
पेट्या = दोन नंबरच्या आर्थिक व्यवहारात पेटी म्हणजे लक्ष व खोका म्हणजे कोटी
बाह्यना = बहाणा, खोटी सबब
अध्धर = हवेत अधांतरी
————————————————————————–
@ ही केवळ कविता आहे. या कल्पनाविलासाला कसलेच संदर्भ नाहीत.
————————————————————————–

स्वप्नरंजन फार झाले


स्वप्नरंजन फार झाले

स्वप्नरंजन फार झाले
सौख्यही बेजार झाले

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले

झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले

खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले

पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले

बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले

उत्तरांना पेलताना
प्रश्नकोडे ठार झाले

“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद सारे बार झाले

                                   गंगाधर मुटे
……………………………….…
वृत्त : मनोरमा
लगावली : गालगागा गालगागा
…………………………………

गाय,वाघ आणि स्त्री


गाय,वाघ आणि स्त्री

                     मुंबईच्या अभिव्यक्ती ग्रंथ न्यास या संस्थेतर्फे नुकताच “गझल : सुरेश भटानंतर” हा गझलेचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अभिव्यक्ती ग्रंथ न्यास ही समग्र मराठी गझलेच्या उत्कर्षासाठी झटणारी जनमान्यता पावलेली संस्था. कविवर्य स्व. सुरेश भटानंतर जे गझलकार झालेत त्यांच्या निवडक गझलांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला असून या ग्रंथात माझ्या तीन गझलांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला  आहे. मी गझल लिहायला लागल्यापासून आजपर्यंत काही दिग्गज गझलकारांनी मी गझलेमध्ये जसा आशय व्यक्त करतो, तो गझलियतशी मेळ खात नाही, असे म्हणून माझ्या गझलेला कमी लेखण्याचा जो प्रकार केला, त्या पार्श्वभूमीवर माझ्या गझलांचा या संग्रहात समावेश झाल्याने माझ्या गझलेतील ग्रामीण आशयाला या निमित्ताने जनमान्यतेची अधिकृत पावतीच मिळाली आहे.

                     दोन वर्षापूर्वी मराठी गझल या काव्यप्रकाराशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. कवितेपेक्षा गझल हा काव्यप्रकार पूर्णपणे भिन्न असतो. लयबद्धता हा गझलेचा प्राण असतो. तंत्रशुद्धतेच्या चौकटी काटेकोरपणे सांभाळूनच गझल जन्माला येते. मुक्तछंद किंवा छंदमुक्ततेला गझलेत काहीही स्थान नसते. वेगवेगळ्या तर्‍हेचे पाचपेक्षा जास्त विषय एकाच रचनेत प्रभावीपणे हाताळण्यासाठी गझलेसारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. ह्या गोष्टी माझ्यावर एवढा मोठा प्रभाव पाडून गेल्यात की मला गझल या काव्यप्रकाराचे अक्षरशः वेड लागले आणि मी गझलेच्या प्रेमात पडलो.

                     गझल लिहिणे हे थोडे कलाकुसरीचेच काम असते. काव्य स्फुरले तर कविता लिहिली जाऊ शकते, गझल लिहिली जाऊ शकत नाही. गझल हा तसा कृत्रिमरीत्या काव्य हाताळण्याचा प्रकार आहे. स्फ़ूर्तीमुळे एखाद्या लयबद्ध शेराची किंवा मतल्याची निर्मिती होऊ शकेल; पण उर्वरित चार किंवा त्यापेक्षा जास्त शेर मात्र मतल्यात निश्चित झालेल्या जमिनीला म्हणजे बहर (वृत्त), काफ़िया (यमक)  आणि रदीफ (अंत्ययमक) अनुसरून जाणीवपूर्वकच रचावे लागतात. मी तसा गझलेचा अभ्यासक किंवा फारसा वाचकही नाही; पण ज्या काही गझला माझ्या वाचण्यात आल्या त्यात ग्रामीण सुखदु:खाचे पदर असलेली गझल मला आढळलीच नाही. शेती आणि शेतकरी या शब्दांचा गझलेशी दूरान्वयानेही संबंध मला तेव्हाही आढळला नाही, आजही आढळत नाही. अरबीतून फारसीत व फारसीतून उर्दू भाषेत दाखल झालेला हा काव्यप्रकार आता सर्वच भारतीय भाषांत दाखल होऊ पाहत आहे. मराठी भाषेतही गझल हा काव्यप्रकार बर्‍यापैकी रुजलेला आहे. सर्वसाधारणपणे “शराब आणि शबाब” याविषयाभोवतीच पिंगा घालणार्‍या पारंपरिक गझलेला मराठी गझलेने फाटा देऊन सामाजिक आशयाची झालर दिली असली तरीसुद्धा विशिष्ट साचेबंद आशयाच्या बाहेर पडून मराठी मातीचा सुगंध पुलकित करण्यार्‍या आशयाकडे झेप घ्यायची उत्कंठा मराठी गझलेत अजूनही जागृत झाल्याचे जाणवत नाही. ज्या देशातला बहुसंख्य समाज अनादीकाळापासून शेती याच एकमेव व्यवसायावर गुजराण करीत असला आणि स्वतः अर्धापोटी राहून इतरांना पोटभर जेवू घालत असला तरी शेतीक्षेत्राचे वास्तववादी चित्र प्रतिबिंबित करण्यात जिथे संपूर्ण साहित्यक्षेत्रानेच शेतीक्षेत्राची उपेक्षा केली तिथे नवख्या मराठी गझलेला दोष देण्यात अर्थ नसला तरी या दिशेने पाऊल टाकण्याचे प्रयत्न न होणे, ही मात्र साहित्यक्षेत्राला फारशी शोभादायक बाब खचितच नाही. गझलेला शेतीच्या बांधवर आणून सोडायचे असेल तर त्यासाठी कोणीतरी गझलकार पुढाकार घेईल याची वाट पाहात बसण्यापेक्षा आपणच गझल लिहिण्याचा प्रयत्न का करू नये? अशी माझी भावना झाली आणि मी गझल लिहायचे ठरवले.

                     मी गझल लिहायचे ठरविले तेव्हा तंत्रशुद्धता आत्मसात करणे ही अभ्यासाने साध्य करण्यासारखी बाब आहे, याची मला जाणीव होती. मुख्य प्रश्न होता आशयाचा. आलंकारिक भाषेत शारीरिक प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गझल लिहिणे हा माझा प्रांत नव्हता. तरुण, तरुणी, प्रेमरस, प्रेमभंग किंवा तिचा गजरा, तिच्या नजरा, तिचे चालणे, नटकणे, लचकणे, गालात खळी पडणे या विषयावर एवढ्या गझला लिहिल्या गेल्या आहेत की मी आणखी पुन्हा याच विषयावर गझल लिहावी असे मला वाटत नाही. आधीच कुण्यातरी गझलकाराने लिहिलेल्या ओळींची मोडतोड करून किंवा शब्दांची अदलाबदल करून शेर किंवा गझल रचायची आणि ती आपल्या नावावर खपविण्यासाठी लागणार्‍या वृत्तीची माझ्याकडे वानवा आहे. शिवाय शेती आणि ग्रामीण जीवन हाताळता येत नसेल तर गझल लिहायची हौस तरी कशासाठी बाळगायची? हा मला पडलेला प्रश्न.


                     
गझलेतील लयबद्धता, वृत्ताची हाताळणी, यमकाचे नादमाधुर्य आणि एकाच गझलेत पाचपेक्षा जास्त वेगवेगळे विषय हाताळायची संधी, हे गझलेने मला वेड लावण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळे गझल लिहिण्याचा मोह काही केल्या टाळताही येईना. शेवटी ठरले की आपण जे काही लिहायचे, ते शेतीविषयाला अनुसरूनच लिहायचे. गझलेतील आशयाच्या प्रांतात सुद्धा चिरयौवणी ललनेचे मोहक डोळे किंवा शरीरसौंदर्य प्रकटीत करणार्‍या अवयवाऐवजी आपल्याच शेतातील वांगे, टमाटर, आंबे, चिक्कू, पेरू, गाय, बैल, वासरू इत्यादींना सोबत घेऊन गझलप्रातांत शिरायचे. निर्णय झाला आणि लेखनी उचलली. पहिल्याच प्रयत्नात थोडीशी सूट घेतलेली आनंदकंद या वृत्तातील माझी पहिलीवहिली गझल आकारास आली…. 

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

                     ही गझल सहा संकेतस्थळावर प्रकाशित केल्यावर रसिकाकडून जोरदार स्वागत झाले. पहिलीच गझलरचना असल्याने कौतुकही झाले पण; दबक्या आवाजात का होईना, भाषाशुद्धता व तंत्रशुद्धतेतील दोन निकष पाळले गेले नसल्याची खंतही व्यक्त झाली. देण्या ऐवजी देण्यास आणि जोजविण्या ऐवजी जोजविण्यास असे असायला हवे होते आणि तसे केले तर वृत्त बिघडणार होते. दुसरा मुख्य नियम असा की, मतल्याच्या किंवा शेराच्या पहिल्या ओळीत विषयाची प्रस्तावना व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीत जी प्रस्तावना व्यक्त झाली असेल तिचा प्रभावी समारोप असायला हवा. शेरातील दोन ओळींचा परस्पर संबंध असायलाच हवा. त्यामुळे 


गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

                     हा मतला डोक्यावरून डोक्यावरून गेल्याच्या किंवा काहीही अर्थच लागत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्यात. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभूमी उलगडण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मते त्या मतल्याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकतो.


बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारीरिक अंगाने अबलाच. स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदाहरणार्थ, उंदराला बिळात घुसता येते, मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते, कुत्र्याला भिंतीवर चढता येत नाही.
या झाल्या उंदीर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करून कौशल्याने अन्न मिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघूयात.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रूपेक्षा अधिक वेगवान वेगाने पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरीत्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे निसर्गत: यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करून साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करून संपूर्ण सजीव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही. विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढू शकत नाही. साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करू शकेल.
पण गायीचे काय? गाय पूर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा. (कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या?)
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणार. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभावच.
गायीवरचे प्रेम, भूतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय, राजकीय पक्षांची कार्यालये वगैरे ठिकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दूध काढताना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल? गायीचे काय होईल?
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दूध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु. प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दूध खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या किती?
जर अशी स्थिती उद्भवली आणि दुधाचा धंदा न परवडणारा झाला तर कोणी कशाला गायी पाळतील? मग अशा विपरीत परिस्थितीत माणूस गायीचा त्याग करणारच.
मग गायीचे काय होईल? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करू शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत, ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत, ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे, ना हत्तीसारखे शक्तिशाली सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षीण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल?
तेव्हा तिला तिच्या संरक्षणार्थ गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण?
गायीला जेवढे नैसर्गिक शत्रू आहेत त्या सर्वांना पराभूत करून गायीला जीवदान, अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह, वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करू शकत नाही.
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच.
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भूक शमविण्याची वस्तू या नजरेने पाहणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच…
तिचे प्राण वाचवू शकेल, अभय देऊ शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कुठे?
ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जाऊ शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर………….
म्हणून गाय आणि स्त्री या दोघीत याच अनुषंगाने विचार केला तर दोघींच्याही व्यथा सारख्याच वाटतात मला.

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”

                                                                                                                            – गंगाधर मुटे
—————————————————————————————————

नेते नरमले

नेते नरमले

मोठे गरजले
छोटे बरसले

रेती वाहतच
गोटे अडकले

मते पाहताच
नेते नरमले

ललना पाहून
कपडे शरमले

चकवेही आज
रस्ता भटकले

शिपाई मजेत
कैदी सटकले

बिल्डर म्हणताच
मंत्री दचकले

काजवे रात्री
अभय चकाकले

         गंगाधर मुटे
=============

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटून जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत आणखी वाढतच जाते, वैताग येतो. आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणून आपण विषय सोडून देत असतो.
………….
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीण असते?
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असू शकतो?
‘आधी कोंबडी की आधी अंडी’ या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रीय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळून जाते. कळून चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासून कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दूर होते आणि मग लक्षात येते की महाकठीण वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
…………………….
आज हा विषय चघळण्याचे कारण?
२६ जानेवारी – गणराज्य-प्रजासत्ताकदिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
‘काय मिळवले काय गमाविले’
‘देश जगात महाशक्ती म्हणून उदयास येणार की नाही’.
‘देशाला प्रगतिपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिले’.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा? नेते मंडळी की जनता जनार्दन?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा…… उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारीख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरू.
हे असे रहाटगाडगे………..पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती…..!!
याला म्हणायचे प्रजासत्ताकदिन धूमधडाक्यात साजरा करणे…..!!
जोरसे बोलो….
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो….!!!!!!!!!!!!!!!

                                                      गंगाधर मुटे
————————————————————
(पुर्वप्रकाशित १२.०१.२०१०)
————————————————————

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला …॥१॥

गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला …॥२॥

मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला …॥३॥

पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला …॥४॥

अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला …॥५॥

                                                  गंगाधर मुटे
————————————————————
मारखुंडा = मारकुडा, पारखुंडा = पारखी, पारख करणारा
————————————————————

शेतकरी पात्रता निकष

  शेतकरी पात्रता निकष.

                  मायबोली या संकेतस्थळावर मला एक प्रश्न विचारण्यात आला की “एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल – आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा – प्लीज! “असा प्रश्न विचारला आहे. अशा तर्‍हेच्या प्रश्नाला उत्तर तरी काय द्यावे?.
             कारण या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी फारच अवघड आहे. असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नव्हता. “इधरसे बाहर निकलनेका रस्ता है, अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही”.
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले, कामातूनच गेले, मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहिती द्यावी? आम्ही कवी माणसं. कविता करताना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डाण घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पूर्णं करतो. पण जित्याजागत्या जीवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे, हे मला पक्के ठाऊक आहे, तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?
अ) हौसेखातर शेती. (उपजीविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
                      हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचण नाही. घरात दोन पिढ्या जगतील एवढी संपत्ती असेल, पुढारीगिरी करून माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असून पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगूण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पांढर्‍यात रूपांतरित करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजीविकेसाठी शेती.
                      उदरभरणासाठी शेती ( उदरभरण हाच शब्द योग्य. लाईफ बनविणे, करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतू आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थिक खर्चाची यादी करू.अंदाजे किमतीसह.
१) १० एकर शेतजमीन………२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ………………..२०,०००=००
२) विहीर पंप :…………………१,५०,०००=००
३) शेती औजारे :………………. ३०,०००=००
४) बैल जोडी :………………….. ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :…………… १,००,०००=००
६) साठवणूक शेड :…………..१,००,०००=००
———————————————–
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
———————————————–
सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणूक करावी लागेल.
शारीरिक गरजा :
१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिन्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावून पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहून नेण्याची क्षमता असावी.
मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच ” रघुपती राघव राजाराम” हे गीत घरासमोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता……राम नाम सत्य है…
२) हांजीहांजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हांजीहांजी केल्यावाचून गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगीभूत गुण असावा कारण प्रत्येक ठिकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणून दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्त्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जीवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार – बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर – पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळून गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईन ते करून घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहिजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावून घ्यायचे.म्हणून मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कूलर,फ्रीज,टीव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शीण-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.
कायदेशीर गरजा:-
कायदेशीर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकील मंडळीकडून घेता येतो.
माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवून घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्कीच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहाणी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम…..!
पोशिंद्याचा विजय असो….!!
२५-०१-२०१०                                                 गंगाधर मुटे
===========================================

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?
शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.
त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.
         त्या ताळेबंदावरून या व्यवस्थेने दडवून ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासमोर येईल.  देशातील १०० टक्के शेतकर्‍याची शेती पूर्णतः तोट्याची आहे, याला अधिकृत दुजोरा मिळेल. शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी देत असल्याच्या शासकीय दाव्याचा फुगा फुटून जाईल.(तसाही गॅट समक्ष सादर केलेल्या कागदपत्रात अधिकृतपणे तो फुगा फुटलाच आहे.)
या देशात पुढारी आणि शासकीय कर्मचारी यांच्याच तेवढ्या शेत्या फायद्यात बाकी सर्व तोट्यात हेही देशाला अधिकृतपणे कळेल.
         घरात पोटभर खायला नसूनही, मिशीवर ताव देऊन पाटिलकीचा खोटा आव आणणार्‍यांचे सत्य स्वरूप समाजासमोर येईल.
         आणि काळ्या चलनाचे पांढर्‍या चलनात रुपांतर करण्यासाठी, दोन नंबरची कमाई एक नंबर मध्ये रुपांतरीत करण्यासाठी जो शेतीच्या नावाखाली धुडगूस चाललाय, त्यालाही पायबंद बसेल.
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर त्याच्या घरात आलेली मालमत्ता कशी, कुठून आली याचे तो स्पष्टीकरण काय देईल ?
पुढार्‍याची शेतीच तोट्याची असेल तर तो उत्पन्नाचे साधन काय दाखवील?
शेतीला आयकर लावल्यास शेतकरी सोडून ते इतरांनाच जास्त अडचणीचे आहे.
आयकर लावल्यास गरीब शेतकर्‍यांचे काय होईल असे जर कुणी बेंबीच्या देठापासून ओरडत असेल तर त्यांना “माझं काय होईल’, असे म्हणायचे आहे असा अर्थ काढायला आपण शिकले पाहिजे.
शेतकर्‍यावर उत्पन्नावर आधारीत आयकर लावायला हरकत नाही मात्र त्याऐवजी प्रोफेशनल टॅक्स सारखे मोघम टॅक्स लावू नयेत, नाहीतर ते शेतकर्‍यांना लुटायचं नवे हत्यार ठरेल.
आयकराला शेतकर्‍यांनी भिण्याचे काहीच कारण नाही, कारण…
ज्याला आय नाही त्याला कर नाही आणि ज्याला कर नाही त्याला डर नाही.
भाजल्या कोंबड्याला विस्तवाची कुठली आली भीती ?
शेतकर्‍यांना पिढ्यानपिढ्या लाचारासारखे जीवन जगण्यापेक्षा आर्थिक सुदृढ होऊन आयकरदाता शेतकरी म्हणून सन्मानाने जगायला नक्कीच आवडेल.
………………………………………………………………….
बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१)  बांधबंदिस्ती :          २००००=००
२)  विहीर पंप :           १५००००=००
३)  शेती औजारे :         ३००००=००
४)  बैल जोडी :             ६००००=००
५)  बैलांचा गोठा :       १०००००=००
६)  साठवणूक शेड :    १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च :  ४६००००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :                २५००० रु
नांगरट करणे :           ८००० रु
बियाणे :                  १६००० रु.
रासायनिक खते :      १२००० रु
निंदण खर्च :            १५००० रु.
कीटकनाशके :         १६००० रु.
संप्रेरके :                  ३००० रु.
सुक्ष्मखते :             १२००० रु.
फवारणी मजुरी :      ३००० रु.
कापूस वेचणी :        २४००० रु.
वाहतूक खर्च :          ६००० रु.
ओलीत मजुरी :      १२००० रु.
वीज बिल :              ४००० रु.
बैलाची ढेप/पेंड :       २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) : १,४८ ,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज :             ४६०००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज :          १००००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा :      ४६०००=००
—————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क            २५०००० = ००
—————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ६० quintal.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                    १८०००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क             २,५०,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत          १,८०,००० = ००
ह) शुद्ध तोटा                                        ०,७०,००० = ००
————————————————–
.
.
                     वरीलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करू शकतो,आणि १ विहीर १० एकराचे ओलित होऊ शकते असे गृहीत धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
================================
दिनांकः- ३०.१२.०९
जिरायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी १० एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च १० एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती :             २००००=००
२) विहीर पंप :                  ००००=००
३) शेती औजारे :             २००००=००
४) बैल जोडी :                 ४००००=००
५) बैलांचा गोठा :           १०००००=००
६) साठवणूक शेड :         १०००००=००
———————————————–
एकूण भांडवली खर्च :    २,८०,०००=००
———————————————–
अ) चालू खर्च..
शेण खत :                       ००००० रु
नांगरट करणे :                  ८००० रु
बियाणे :                         १६००० रु.
रासायनिक खते :             १२००० रु
निन्दन खर्च :                  १०००० रु.
कीटकनाशके :                १०००० रु.
संप्रेरके :                         ०००० रु.
सुक्ष्मखते :                      ०००० रु.
फवारणी मजुरी :             ३००० रु.
कापूस वेचणी :              १२००० रु.
वाहतूक खर्च :                 ३००० रु.
ओलीत मजुरी :               ०००० रु.
वीज बिल :                     ०००० रु.
बैलाची ढेप/पेंड  :             २००० रु.
———————————————-
एकूण खर्च (अ) :            ७६,००० = ००
———————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज : २८,०००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज : ५,०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा : २८,०००=००
————————————————–
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क          १,३७,००० = ००
————————————————–
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ३ क्विंटल या प्रमाणे १० एकरात ३० क्विंटल.
इ) ६० क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                  ९०,००० = ००
————————————————–
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क ……     .१,३७,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत…..      ०,९०,००० = ००
ह) शुद्ध तोटा……………………………. ०,४७,००० = ००
————————————————-
.
.
             वरीलप्रमाणे मी काढलेला जिरायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी १० एकर कापसाची शेती करू शकतो,असे गृहीत धरले आहे.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत
——————————————-
दिनांक :- ०३-०१-२००९
अत्यल्प भुधारक शेतकरी.
बागायती कापसाचा उत्पादन खर्च
प्रमाण : १ शेतकरी २.५ एकर कापसाची शेती.
उत्पादनखर्च २.५ एकराचा खालील प्रमाणे:
भांडवली खर्च :
१) बांधबंदिस्ती :                   ५०००=००
२) विहीर पंप :                    १५००००=००
३) शेती औजारे :                  ३००००=००
४) बैल जोडी :                      ३००००=००
५) बैलांचा गोठा :                १०००००=००
६) साठवणूक शेड :              १०००००=००
————————————————
एकूण भांडवली खर्च :        ४,१५,०००=००
————————————————
अ) चालू खर्च..
शेण खत :                ६००० रु
नांगरट करणे :         २००० रु
बियाणे :                  ४००० रु.
रासायनिक खते :       ३००० रु
निंदण खर्च :             ४००० रु.
कीटकनाशके :          ४००० रु.
संप्रेरके :                  १००० रु.
सुक्ष्मखते :               १००० रु.
फवारणी मजुरी :       १००० रु.
कापूस वेचणी :         ६००० रु.
वाहतूक खर्च :          २००० रु.
ओलीत मजुरी :        ३००० रु.
वीज बिल :              २००० रु.
बैलाची ढेप/पेंड :       २००० रु.
————————————————-
एकूण खर्च (अ) :  ०,४१ ,००० = ००
————————————————-
.
ब) भांडवली खर्चावरील व्याज :          ४००००=००
…. चालू गुंतवणुकीवरील व्याज :         ५०००=००
क) भांडवली साहित्यावरील घसारा :    ४००००=००
————————————————
एकूण उत्पादन खर्च अ+ब+क        १,२६,००० = ००
————————————————
.
ड) एकूण उत्पादन,कापूस प्रती एकरी ६ क्विंटल या प्रमाणे २.५ एकरात १५ क्विंटल.
इ) १५ क्विंटल कापसाची बाजार भावाने (रु. ३००० प्रती क्विंटल.)
शेतकर्‍याला मिळणारी किंमत                ४५००० = ००
—————————————————
नफ्यातोट्याचा ताळेबंद :
फ) एकूण उत्पादन खर्च अ+ब+क        १,२६,००० = ००
ग) एकूण उत्पन्नाची बाजार किंमत        ४५,००० = ००
ह) शुद्ध तोटा                                   ०,८१,००० = ००
————————————————–
.
               वरीलप्रमाणे मी काढलेला बागायती कापसाच्या शेतीचा उत्पादनखर्च निर्दोष आहे,असे म्हणता येणार नाही. पण जाणकारांनी यावर चर्चा केल्यास, त्रुटी निदर्शनास आणल्यास यात बरीच सुधारणा करता येईल.
उत्पादनखर्च काढताना मी गृहीत धरलेल्या काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण असे.
१) १ शेतकरी २.५ एकर शेती म्हणजे अत्यल्प भुधारक शेतकरी.
२) सर्व भांडवली खर्च १० वर्षासाठी गृहीत धरला आहे. व्याज १० टक्के गृहीत धरले आहे.
३) सर्व भांडवली सामुग्रीचे सरासरी आयुष्य १० वर्षे गृहीत धरून त्यावर १० टक्के घसारा गृहीत धरला आहे.
४) खर्चामध्ये किरकोळ खर्च, बैलांचा चारा, शेतीचा इन्शुरन्स धरलेला नाही.
५) दुष्काळामुळे किंवा अवर्षणामुळे होणारी हानी धरलेली नाही.
६) शेण खत,नांगरट,बियाणे,रासायनिक खते,कीटकनाशके,सुक्ष्मखते आणि फवारणी यांच्या मात्रा कृषी विद्यापीठे यांच्या शिफारशीवर आधारीत आहेत किंवा त्यापेक्षा कमी आहेत.
२६-१२-२००९                                            गंगाधर मुटे
=========================================

चिडवितो गोपिकांना-गौळण

चिडवितो गोपिकांना-गौळण

चिडवितो गोपिकांना, वरी मस्करी,
उडवितो दूधदही, करी तस्करी,
यशोदे असा गं कसा? तुझा श्रीहरी,
हा हरी, श्रीहरी ……….. ॥धृ०॥

मेळवुनी लष्कर सेना, चोरी चोरी येतो,
लोणियाच्या सार्‍या हंड्या, चोरुनिया नेतो,
भरवितो गोप सारी, सखा सावरी ….. ॥१॥

मारीयेला चेंडू हाता, यमुनेशी जाता,
लपवितो साडी चोळी, गोपिकांची न्हाता,
कान्हाईची खोड न्यारी, राधा बावरी ….. ॥२॥

मुरलीचा सूर सारा, नादब्रह्म बोले,
हरे कृष्ण, हरे कृष्ण, तन मन डोले,
अरविंद साथसंग, नाचे मुरारी ……. ॥३॥

गंगाधर मुटे
…………………………………………..

कॅम्पस परिवार स्नेहसमारंभ

कॅम्पस परिवार सत्कार समारंभ – आर्वी (छोटी)

दिनांक – २० जानेवारी २०११
———————————————–
Campus
Arvi
Arvi chhoti
Gangadhar Mute
farm House
Farm
Arvi
Campus
—————————————————————————————————-