४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन

४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन

नमस्कार मंडळी,

        आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपासून उत्तरार्ध सुरु झालाय. ४ थ्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचे म्हणता-म्हणता अन्य कामाच्या धबडग्यात चक्क चार महिने निघून गेलेत. जरा उशीर झाला असला तरी पुढील कामाचा थोडा वेग वाढवून आपल्या लेट गाडीचा टाइम भरून काढणे अशक्यही नाही. चला तर मग आजपासून आता चवथ्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.

        २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले, २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे आणि २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ ला गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले, त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 

       आता चवथे संमेलन विदर्भाबाहेर मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे घ्यायचे नियोजित असून त्याकरिता  पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
  • तीन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्‍यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर १५/०७/२०१७ पूर्वी संपर्क साधावा.
  • अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता दोन वर्षापूर्वी “शेती अर्थ प्रबोधिनी” ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.   

    मोबाईलधारकासाठी खास : अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीची सर्व माहिती सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी “युगात्मा परिवार” मोबाईल एप डाउनलोड करा. 
  • http://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app614211

    आपल्या सुचनांचे स्वागत आहे. 

आपला स्नेहांकित

गंगाधर मुटे 

संस्थापक अध्यक्ष 
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन

पहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन

ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी,हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयचकोडेच आहे.

            गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने घेतलेलीनाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारणसांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे एकही पुस्तक साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्याअनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणीकरून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्राला अत्यंत लाजिरवाणीच म्हटलीपाहिजे.
             कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी,मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीआणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आणि साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीवभरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटीबद्ध असणार्‍या लेखक – कवी – गझलकारांनी एकत्र येऊन अ. भा. मराठी शेतकरी साहित्यचळवळ स्थापन केली असून पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

दिनांक : २८ फ़ेब्रुवारी २०१५ व १ मार्च २०१५
स्थळ   : मातोश्री सभागृह, आर्वी नाक्याजवळ, वर्धा

————————————————————————————————-

: निमंत्रण पत्रिका :

sahity sanmelan

—————————————————————————————————————-

sahity sanmelan

मराठी भाषा दिन : दोन संकल्प

                   

मराठी भाषा दिन : दोन संकल्प

नमस्कार मित्रहो,

          आज २७ फेब्रुवारी आणि महाशिवरात्री सुद्धा आजच. ५२ वर्षापूर्वी महाशिवरात्री अशीच नेमकी २७ फेब्रुवारी या दिवशी आली होती आणि नेमका हाच शुभमुहूर्त निवडून अस्मादिकांनी या पृथ्वीतलावर आपले ’पुनरागमन’ केले. या दिवसाला वाढदिवस का म्हटले जाते हे एक गूढ कोडेच आहे आणि हा दिवस साजरा करावा हे आणखी एक जटिल कोडे. या दिवशी ’वाढ’ कशात होते हेच कळेनासं झालंय. वयमानात वाढ होते मात्र जगण्याचा काळ कमी होत जातो. यात हर्षोल्लास करण्यासारखे काय आहे?

          वय वाढत जाताना आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर ’वाढ’ या शब्दाचे संदर्भ देखील बदलत जातात. बालपणी वाढत्या वयासोबत शारीरिक बल आणि बुद्धी वाढत जाते. तरुणपणी वाढत्या वयासोबत चैतन्य आणि विवेकशीलता वाढत जाते मात्र एकदा का तारुण्य ओहोटीला लागलं की मग वाढत्या वयासोबत ’वाढ’ शब्दाचे संदर्भही उलटे पडायला लागतात. मानसन्मान वाढण्याची शक्यता असते; केवळ शक्यता असते खात्री नाहीच. मात्र वाढत्या वयासोबत डोळ्याच्या नंबरमध्ये सततची वाढ, प्राकृतिक विकारामध्ये निरंतर वाढ हे मात्र हमखास असते आणि तरीही आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत ’वाढदिवस’ साजरा करण्याचा आपला उत्साह मात्र यत्किंचितही कमी होत नाही. हे मानवी स्वभावातील एक रहस्यच समजावे लागेल.

          आजचा दिवस “मराठी भाषा दिवस” “जागतिक मराठी भाषा दिवस” “मराठी भाषा दिन” म्हणूनही जगभरातील मराठी भाषिकांकडून साजरा केला जातो. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेऊन मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या औचित्याने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू केली. या दिवसाचे औचित्य साधून आपणही काहीतरी संकल्प करायला हवा. मी सुद्धा मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी माझ्यापरीने दोन प्रकल्प हाती घेत आहे.

१) सुमारे दीड वर्षापूर्वी म्हणजे २२/०७/२०१२ रोजी मी http://www.sharadjoshi.in अर्थात “योद्धा शेतकरी” या एका महत्त्वाकांक्षी संकेतस्थळाच्या निर्माणाचा एक महाप्रकल्प हाती घेतला. हे संकेतस्थळ म्हणजे शरद जोशी आणि शेतकरी संघटनेविषयी परिपूर्ण माहितीने ओतप्रोत भरलेला अनमोल खजिना व्हायला हवा. शरद जोशींच्या समग्र लेखनासहित अधिवेशने, मेळावे, रस्ता रोको अथवा रेल्वेरोको दरम्यान वेगवेगळ्या आंदोलनस्थळी घडलेल्या घडामोडीविषयीचे शक्यतो फोटोसहित सर्व वृत्तांत येथे उपलब्ध व्हायला हवेत. त्यादृष्टीने कार्य सुरू केले पण हे संकेतस्थळ परिपूर्ण करण्याचे कार्य वाटते इतके नक्कीच सहजसाध्य नसल्याने अजूनही पूर्णत्वास पोचलेले नाही. अजून खूप काम बाकी आहे. दीड वर्षात झालेल्या कामाबद्दल मी स्वतःही समाधानी नाही. पुढील एक वर्षात हे कार्य पूर्णत्वास नेण्याचा मानस आहे. त्यासाठी येत्या काही काळात एक “राज्यव्यापी दौरा” करण्याचे निश्चित केले आहे.

२) आजवर मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलन झालेत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. या दिशेने पाऊल टाकण्याचा मानस आहे. हे कार्य किती कठीण आहे याची जाणीव असली तरी हे कार्य अशक्यप्राय नाही याचीही खात्री आहे. अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीची पायाभरणी करून एका वर्षाच्या आत अ.भा. स्तरावर मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करायचे ठरवले आहे आणि त्यानंतर दरवर्षी मराठी शेतकरी साहित्य संमेलन भरवणे शक्य व्हावे म्हणून संघटनात्मक बांधणी करायचे ठरवले आहे.

          शामियान्याच्या भव्यदिव्यतेपेक्षा चर्चात्मक दर्जाची “भव्यदिव्यता” जर प्रकटीत करता आली तर ते कदाचित अधिक प्रभावकारी शेतकरी साहित्य संमेलन ठरू शकेल. या कामात मला मार्गदर्शक आणि सहकार्‍यांची प्रचंड गरज भासेल. या निमित्ताने मी आपल्यासमोर मार्गदर्शन आणि सहकाराची याचना करतो आहे. जाणकारांनी आणि स्वेच्छूक मंडळींनी स्वतःहून समोर यावे. आपण लवकरच यासंदर्भात चर्चा सुरू करू. संघटनात्मक प्रारूप ठरवू, नियमावली बनवू, संस्था नोंदणीसाठी दस्तावेज तयार करू आणि आकारास आणू अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ.

सहकार्याच्या अपेक्षेत…!

                                                                                                                                आपला नम्र
                                                                                                                              – गंगाधर मुटे
———————————————————————————————————————————-