मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो…!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय….!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय….!!!

                     – गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘कमल’ ’आप’के ’हाथ’ – विडंबन गीत

‘आप’ के अडैल रुख पे ’कमल’ जरा मलूल है।
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥

खुली खुली ये बात है की उलझा हुआ ये दाव है-२
सोचना ये सोच है की सोच ही पडाव है
अण्णा जिधर गये – २
अण्णा जिधर गये वहॉसे ’लोकपाल’ दूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥१॥

झुकी झुकी निगाह में भी है बला की मग्रूरी -२
दबी दबी सी बात मे भी छुपी हुई धुरंधरी
ये पेच दिल्लीका-२
ये पेच दिल्लीका अब बन गया नुपूर है
’हाथ’ भी फ़िसल गया तो ’आठ’ की जरूर है॥२॥

गीत – गंगाधर मुटे
संगीत – अरविंद हर्षवर्धन
गायिका – बि. किरण
फ़िल्म – ’आप’ के हसिन सपने
’दूम दबाके दिल्ली भागी’ प्रॉडक्शन की प्रस्तुती
————————————————————

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता…।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता… ॥

                                                  – गंगाधर मुटे
———————————————————

शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)


शेरनीच्या जबड्यात ससा (हझल)

मी तुझी साथ सोडून गाऊ कसा?
तूच माझा गळा, कंठ, नरडी, घसा

वाटले मोगर्‍याला तुला पाहुनी
पालखीला मिळालाय भोई जसा

मारली मी मिठी त्या क्षणी वाटले
शेरनीच्याच जबड्यात गेला ससा

झोप पाण्यात घेतोय मासा कसा?
प्रश्न हा फ़ालतू;  फ़क्त खावा रसा

कार्य बाकी किती ते उद्याला बघू
मंडळींनो चला भोजनाला बसा

भोजनाचा लुटा स्वाद पंक्तीमध्ये
अक्षता टाकण्याला असा वा नसा

टक्कलाला तुझ्या तूप मी लावते
दे मला एकदा तू ’अभय’ राजसा

                                  – गंगाधर मुटे
—————————————

टुकारघोडे! (हझल)

टुकारघोडे! (हझल)

 उगाच पिळतोस रे मिशा तू, कडमडणे हा विकार आहे
तिच्या खुट्याला तुझ्याप्रमाणे टुकारघोडे हजार आहे

कशी बघा चालते कचेरी, अशी जशी की दुकानदारी
अनाथ सोडून कायद्याला, विधानमंडळ फ़रार आहे

बघा जरा हो बघा जरासे कसा भामटा फ़ुगून गेला
मुरूम-गिट्टी अमाप खातो, तरी न देतो डकार आहे

गमावतो ना कधीच संधी हपापलेला विचित्र प्राणी
डसून लचकेच तोडण्याचा ठरून त्याला ’पगार’ आहे

कुठून आणू नवीन गजरा, दुकान शोधू कुठे नव्याने?
सरून पर्याय सर्व गेले, जुनीच देणी उधार आहे

नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी
कितीतरी जाड पुस्तकांचे लिखान माझे तयार आहे

अम्हांस नाही कुठेच सत्ता, कुठेच नाही “अभय” पदांचे
लबाडवंशात जन्म ज्यांचा, तमाम त्यांचा पुढार आहे

                                                    – गंगाधर मुटे
————————————————–

राखेमधे लोळतो मी (हजल)

राखेमधे लोळतो मी (हजल)

मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या
बहूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                                     गंगाधर मुटे
————————————-
(तर ही हजल)

लगान एकदा तरी….

लगान एकदा तरी….. (हझल)

चरेन शासकीय कुरण-रान एकदा तरी
ठरेन या जगात मी महान एकदा तरी

हरूनही रणांगणात लाभते विरत्वश्री
बनेन राजकीय पहिलवान एकदा तरी

क्षणाक्षणास भेटण्यास फ़ालतू विलंब का?
तुझ्या समोर बांधतो मकान एकदा तरी

शिकून घे धडे लढायचे हिरोकडे अता
बघून थेटरात घे लगान एकदा तरी

कधी विचारतेय का अभय इथे कुणी तुला?
जरा गप बसणार का? गुमान एकदा तरी

                                             – गंगाधर मुटे
……………………………………………………………………………………….
वृत्त : कलिंदनंदिनी     काफिया : महान    रदीफ : एकदा तरी 

लगावली : लगालगा लगालगा लगालगा लगालगा
……………………………………………………………………………………….

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

धोतर फ़ाटेपाव्‌तर : नागपुरी तडका

मारखुंड्याच्या घरामंधी पारखुंडा गेला
धोतर फ़ाटेपाव्‌तर सोटे खाऊन आला …॥१॥

गाढवाम्होरं भगवद्‌गीता वाचून काय होते?
माणसाची अक्कल तरी भायच उतू जाते
राखडीमंदी लोळू नको, सांगासाठी गेला
उसण उतरेपाव्‌तर लाथा खाऊन आला …॥२॥

मुद्दे आटून गेले की, हातघाईवर येणार
शिवीगाळ करता करता, गुद्दे हाणून देणार
माणुसकीच्या गोष्टी त्याले समजवाले गेला
येता येता ढोरावाणी, रट्टे खाऊन आला …॥३॥

पोशाखाच्या आधाराने, पारख होत नसते
कपड्याच्या आतमंदी, नंगे लपून बसते
मांडी उघडी दिसली म्हणून, झाकासाठी गेला
होती नव्हती थेय आपली, अब्रू देऊन आला …॥४॥

अरधकच्चं ग्यान लई, खतरा असते भाऊ
नको अभय कोणाच्याबी, झाशामंदी जाऊ
कावरल्या कुत्र्यासाठी भाकर घेऊन गेला
येता येता बोम्लीवर, सुया घेऊन आला …॥५॥

                                                  गंगाधर मुटे
————————————————————
मारखुंडा = मारकुडा, पारखुंडा = पारखी, पारख करणारा
————————————————————

शेतकरी पात्रता निकष

  शेतकरी पात्रता निकष.

                  मायबोली या संकेतस्थळावर मला एक प्रश्न विचारण्यात आला की “एखाद्या माणसानं कधीच शेती केली नसेल – आणि त्याला शेती करायची असेल तर कुठले मुद्दे विचारात घ्यावेत? म्हणजे, आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि कायदेशीर सर्व बाबींबद्दल तुमचा अनुभव/मते सांगा – प्लीज! “असा प्रश्न विचारला आहे. अशा तर्‍हेच्या प्रश्नाला उत्तर तरी काय द्यावे?.
             कारण या प्रश्नाचे उत्तर माझ्यासाठी फारच अवघड आहे. असा प्रश्न मला आजवर कोणी विचारलाच नव्हता. “इधरसे बाहर निकलनेका रस्ता है, अंदर आनेके लिये रस्ता तो हैही नही”.
शेती सोडून जे अन्यत्र गेले त्यांच्या आयुष्याचे सोने झाले याउलट जे बाहेरुन शेतीत आले ते गेले, कामातूनच गेले, मातीमोल झाले.
               हे जर मला माहीत असेल तर मी काय माहिती द्यावी? आम्ही कवी माणसं. कविता करताना पतंगाला सहज अग्निज्योतीवर उड्डाण घ्यायला सांगतो आणि प्रेमाच्या आहुतीची महती गातगात कविता पूर्णं करतो. पण जित्याजागत्या जीवाला शेती करायला लावणे म्हणजे खोल डोहात बुडण्यासाठी आमंत्रीत करण्यासारखे आहे, हे मला पक्के ठाऊक आहे, तरीपण मी उत्तर द्यायचा माझ्यापरी प्रयत्न करणार आहे.
.
या प्रश्नाचे दोन विभाग पडतात.शेती कशासाठी करायची ?
अ) हौसेखातर शेती. (उपजीविकेसाठी अन्य सोर्स आहेत अशांसाठी.)
                      हौसेखातर शेती करायची असेल तर कशाचीच अडचण नाही. घरात दोन पिढ्या जगतील एवढी संपत्ती असेल, पुढारीगिरी करून माया जमविता येत असेल किंवा घरातले कोणी सरकारी नोकरीत असून पगाराव्यतिरिक्त माया जमविण्याचे अंगी कौशल्यगूण असेल तर त्यांच्यासाठी काळ्या पैशाला पांढर्‍यात रूपांतरित करण्यासाठी शेती एक वरदानच ठरत आली आहे.
ब) उपजीविकेसाठी शेती.
                      उदरभरणासाठी शेती ( उदरभरण हाच शब्द योग्य. लाईफ बनविणे, करिअर करणे, जॉब करणे सारखे शब्द सुद्धा येथे फालतू आहेत.) करायची असेल तर मग गंभीरपणे विचार करावा लागेल.त्यासाठी कायकाय हवे आणि कायकाय नको अशा दोन याद्या कराव्या लागतील.
१] प्रथम आर्थिक खर्चाची यादी करू.अंदाजे किमतीसह.
१) १० एकर शेतजमीन………२०,००,०००=००
२) बांधबंदिस्ती : ………………..२०,०००=००
२) विहीर पंप :…………………१,५०,०००=००
३) शेती औजारे :………………. ३०,०००=००
४) बैल जोडी :………………….. ६०,०००=००
५) बैलांचा गोठा :…………… १,००,०००=००
६) साठवणूक शेड :…………..१,००,०००=००
———————————————–
एकूण अंदाजे भांडवली खर्च : २४,६०,०००=००
———————————————–
सर्वसाधारणपणे अंदाजे २५,००,०००=०० एवढी भांडवली गुंतवणूक करावी लागेल.
शारीरिक गरजा :
१) त्वचा जाडी भरडी असावी.सहजासहजी काटा रुतायला नको.
२) रंग घप्प असावा.शक्यतो डार्क ब्लॅक.
३) गोरा,निमगोरा,गव्हाळी वगैरे रंग इकडे घेऊन येऊ नये.चार-सहा महिन्यातच रंग बदलण्याची हमखास शक्यता.त्यासाठी एक उन्हाळा पुरेसा आहे.
४) पायांना चपलेची आदत नसावी.चिखलात चप्पल चालत नाही.
५) शरीरात रक्त जास्त नको,जेमतेम असावे कारण काटा रुतला तर भळभळा वाहायला नको.
६) हाडे कणखर आणि दणकट असावी.
७) शरीरात चपळता असावी.बैल पळाल्यास धावून पकडता येणे शक्य व्हावे.
८) ५०-६० किलो वजन २-४ किलोमीटर वाहून नेण्याची क्षमता असावी.
मानसिक गरजा :-
१) बिपीचा आजार नकोच.नाहीतर शेतीत पहिल्याच वर्षी जर घाटा-तोटा आला तर लगेच ” रघुपती राघव राजाराम” हे गीत घरासमोर वाजंत्री वाजविण्याची शक्यता……राम नाम सत्य है…
२) हांजीहांजी करण्याची सवय हवी.कारण इथे पुढार्‍यावाचुन बरीच कामे अडतात.आर्थिक पाठबळ नसल्याने जागोजागी हांजीहांजी केल्यावाचून गत्यंतर नसते.
३) मिनतवारी करणे हा अंगीभूत गुण असावा कारण प्रत्येक ठिकाणी उधारीपाधारी शिवाय इलाज नसतो.
४) आत्मसन्मान वगैरे वगैरे अजिबात नको.हमालानेही अरे-कारे,अबे-काबे म्हणून दोन शिवा हासडल्या तर वैषम्य वाटायला नको.शेतकर्‍यासोबतची सर्वांची बोलीशैली ठरली आहे.७० वर्षाच्या शेतकर्‍याला १२ वर्षाचा व्यापारी पोरगा सुद्धा याच भाषेत बोलत असतो.
५) मुलाबाळांना उच्चशिक्षण द्यायच्या महत्त्वाकांक्षा नकोत.नाहीतर अपेक्षाभंग व्हायचा.
६) चांगले जीवनमान जगण्याची हौस नसावी.अनेक पिढ्या उलटूनही तसे शक्य होत नाही.
७) थोडाफार मुजोरपणा हवा.
सावकार – बँका कर्जवसुली मागण्यास आल्या तर – पुढच्या वर्षी देतो, होय देतोना, पळून गेलो काय, होईन तवा देईन, नाही देत जा होईन ते करून घे. अशी किंवा तत्सम उत्तरे देता आली पाहिजेत.तरच चार वर्षे पुढे जगता येईल.
८) मनाचा हळवेपणा अजिबात नको. जर का तुम्ही संवेदनाक्षम-हळव्या मनाचे असलात तर चार लोकात झालेली फटफजिती सहन न झाल्याने गळफास लावून घ्यायचे.म्हणून मुजोरपणा हवा हळवेपण अजिबात नकोच.
९) पंखा,कूलर,फ्रीज,टीव्ही वगैरेची आवड नको. दिवसभर शेतात काम झाले की आलेला शीण-थकवा एवढा भारी की खाटेवर पडल्याबरोबर ढाराढूर झोप लागत असते.
१०) विचार करण्याची प्रवृत्ती नको नाहीतर चिंतारोग व्हायची भिती.
कायदेशीर गरजा:-
कायदेशीर ज्ञान नसले तरी चालते. खिशात पैसे असेल तर हवा तेवढा सल्ला वकील मंडळीकडून घेता येतो.
माझ्या मते जर कोणाला नव्याने शेती करायची (गावरानी भाषेत जिरवून घ्यायची) हौस असेल तर त्यांनी एवढा विचार नक्कीच करायला हवा.
देशाच्या पोशिंद्याची ही चार प्रश्नांची कहाणी अठरा उत्तरी सुफळ संपुर्णम…..!
पोशिंद्याचा विजय असो….!!
२५-०१-२०१०                                                 गंगाधर मुटे
===========================================

गाणे बदनाम वाले

गाणे बदनाम वाले


कोण्या एका गावामाजी । वार्ता एक मिळाली ताजी ॥
की कोणी साधू बुवा संताजी । गावामध्ये प्रवेशले ॥१॥

वार्ता पसरता सार्‍या नगरी । गोळा होय सभ्य गावकरी ॥
म्हणती घ्यावा सप्ताह तरी । आता सत्संगाचा ॥२॥

त्यात एक सद्‍गृहस्थ । म्हणे होणार जगाचा अस्त॥
भक्तीमार्गे जावे समस्त । मोक्षप्राप्ती मिळविण्या ॥३॥

सल्ला असा ध्यानी भरला । की भक्तीमार्गे गेला तो तरला ॥
नाहीतर नरकामध्ये चरला । भोगवादी जाणावा तो ॥४॥

ठराव केला एकमताने । आणि गाठला स्वर्ग सुताने ॥
मग उभारले शामियाने । व्यासपिठ भव्यही ॥५॥

पारायणाची पाहती वाट । तिथे गर्दी झाली अफ़ाट ॥
पुजेचेही आणिले ताट । पण बुवा काही येईना ॥६॥

मग कुणाला आली शंका । अफ़वेनेही लूटली लंका ॥
त्यातच कोणी पिटवला डंका । की बुवा पळाले रे ॥७॥

एक नास्तिक संधी साधून । बोलून गेला गहिवरून ॥
घेऊ थोडी ’सिरियल’ पाहून । येईस्तोवर बुवाजी ॥८॥

मग वेळ लावियेला सार्थकी । टीव्हीत नाचत होती नर्तकी ॥
तिने वेधिले चित्त सर्व की । तमाम आपुल्याकडे ॥९॥

पारायणास भुलून गेले । नृत्यांगनेस जवळ केले ॥
ठेका धरूनी नाचू लागले । भावविके भक्तही ॥१०॥

आता मुन्नीचे नाम आले । बुवा झेंडूबाम झाले
गाणे बदनाम वाले । भारतभर फ़ेमस झाले ॥११॥

गंगाधर मुटे
………………………………………………………