…तर विचार प्रवाही होतात – भाग ५

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग ५
…तर विचार प्रवाही होतात
सर्व प्राणिमात्रांचा विचार करता केवळ मनुष्यामध्येच विचार करण्याचा अंगीभूत गूण आहे. विचार करणे हे जर मनुष्यप्राण्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य असेल तर प्रत्येक मनुष्य आपापल्या कुवतीनुसार विचार करतच असतो, ही अत्यंत स्वाभाविक बाब आहे. माणसाचा चेहरा केवळ काही इंच परिघाच्या आकाराचा असूनही कोट्यवधी जनतेमध्ये परस्परभिन्न असू शकतो आणि स्वतःचे वेगळेपण राखून असतो तर अमर्याद आणि सीमांचे बंधन नसलेला विचार कोट्यवधी जनतेचा एकसारखा कसा असू शकेल? त्यातूनच “जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती” असतात तसेच “जितक्या व्यक्ती तितके विचार” हे समीकरण आपोआपच तयार होते.
प्रत्येक मनुष्याचा चेहरा, आवाज, चालणे, बोलणे इतरांपेक्षा वेगळे असते. जसा मनुष्य चेहऱ्यावरून ओळखता येतो तसेच त्याच्या बोलण्यावरून व चालण्यावरूनही ओळखता येतो. निसर्गाची विविधताच इतक्या विविध अंगाने, रंगाने व ढंगाने नटलेली आहे की या विविधतेचे कोणत्याही एका सूत्रात वर्गीकरण करणे अवघडच नव्हे तर अशक्यप्राय आहे म्हणूनच प्रत्येक व्यक्ती हा अनन्यसाधारण असतो, असे मान्य करावेच लागते.
मनुष्याच्या काळजातील अंतरंग सुद्धा परस्परभिन्न असतात. विचार आणि विचार प्रकटीकरणाची ढबही आगळीवेगळी असते. लेखनशैली बघून त्या लेखाचा लेखक कोण असेल हे अभ्यासू वाचक सहज ओळखू शकतो. एखादी कविता वाचल्यावर ती कविता कोणत्या कवीची असेल हे जाणकार रसिक ओळखू शकतो. कोणत्याही व्यक्तीला स्वतःचा चेहरा किंवा चेहऱ्यावरील भाव बदलून जशी चेहऱ्याची ओळख लपवता येत नाही तसेच अंतरंग सुद्धा लपवता येत नाहीत. जोपर्यंत मनुष्य अबोल असतो तोपर्यंत ठीक पण एकदा बोलायला लागला की त्याच्या मनात काय दडले आहे ते उघड व्हायला लागते. विचार व्यक्तिसापेक्ष असल्याने अभिव्यक्ती सुद्धा व्यक्तिसापेक्षच असते. सुरुवातीला परस्परभिन्न विचार आपसात मेळ खात नसेल तर सर्व विचारांनी एकत्र बसून भेळ खाल्ली तर काही मुद्द्यांवर एकमत होऊन वैचारिक मेळ साधला जाऊ शकतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मान्य करून परस्पर विचारांचा आदर केल्यास वैचारिक समन्वय साधने अजिबात अवघड नसते.
कोणत्याच व्यक्तीचे अंगभूत विचार कधीच बदलत नसतात पण संस्कार, प्रबोधन अथवा तत्सम मार्गाने विचारांची दिशा बदलता येते. विचाराने स्वभाव घडवता येतो. पण त्याहीपेक्षा सभोवतालच्या परिस्थितीचाच सर्वात जास्त प्रभाव विचारधारेवर पडत असतो. परिस्थितीनुसार न वागल्यास जीवन जगणेच कठीण होत असल्याने परिस्थितीशी सर्वांना जुळवून घ्यावेच लागते आणि जगण्याच्या जीवनशैलीनुसार विचार कळत-नकळत आपोआप बदलत जातात. कधीकधी आधीच व्यक्तिसापेक्ष असलेला विचार परिस्थिनुसार आणखीनच कडवे स्वरूप धारण करतो. त्यातूनच जहाल विचारांना खतपाणी मिळून विचार एकांगी होत जातात. ”मी म्हणतो तेच सत्य” इथपर्यंत ठीक असते, त्याला विचारांचा ठामपणा किंवा स्वतःबद्दलचा आत्मविश्वास असे गोंडस नाव देऊन दुर्लक्ष करता येईल पण ”मी म्हणतो तेच सत्य बाकी म्हणतात ते सर्व चुकीचे” या अतिरेकी पातळीवर जेव्हा विचार पोचतात तेव्हा त्या विचाराची जागा विचाराऐवजी हेकेखोरपणाने घेतलेली असते. एकदा का हेकेखोरपणा विचारात आला तर ती व्यक्ती स्वतःही शांतचित्ताने झोपू शकत नाही आणि इतरांनाही शांतचित्ताने झोपू देत नाही. अशा व्यक्तींची डोकेदुखी झेंडूबामने थांबत नाही आणि झोपेसाठी झोपेच्या गोळ्याही उपयोगी पडत नाही. विचार प्रवाही असल्याने परिवर्तनशील असतात. त्यामुळे चर्चा करून विचारांचे आदान-प्रदान केल्यास विचार अधिकाधिक प्रवाही व प्रगल्भ होण्यास मदत होते. चर्चेने आपण बाळगत असलेले विचार पारखता येतात, संवादाच्या पातळीवर तपासता येतात.
जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्या-घेतल्याने मती शुद्ध होते
विचार हेच समाज प्रबोधनाचे साधन आणि वैचारिक उत्क्रांतीची रेशीमवाट असल्याने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान होणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्ती अनन्यसाधारण असल्याने कोणताही विचार सरसकटपणे सर्वांना मान्य होऊ शकत नाही. एखादा विचार एकाला योग्य वाटेल तर तोच विचार दुसऱ्याला अयोग्य वाटू शकतो. अमान्य असलेल्या विचारांना विचारानेच प्रत्युत्तर दिले पाहिजे. विचाराची लढाई विचारानेच व प्रबोधनाची लढाई प्रबोधनानेच लढली पाहिजे. विचार स्वच्छ व स्पष्ट असतील तर चिडचिड न होता डोके शांत आणि शाबूत राहण्याची शक्यता आपोआपच बळावत जाते.
– गंगाधर मुटे आर्वीकर
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग ५ – दि. २२ फेब्रुवारी, २०२० – ” …तर विचार प्रवाही होतात”

==========
आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.
==========

माणसाचा नव्हे साधनांचा विकास – भाग ४

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग ४
माणसाचा नव्हे साधनांचा विकास
शारीरिक, मानसिक थकवा घालवण्यासाठी पुरेशी विश्रांती मिळावी म्हणून शासकीय कर्मचार्‍यांसाठी पाच दिवसांचा आठवडा, असा नुकताच शासनाने निर्णय घेतला. पण दिवसभर टेबलाच्या आसऱ्याने खुर्चीवर बसून इकडल्या फाइल तिकडे हालविणाऱ्या (कामचुकार?) लोकांना थकवा येतो, ही संकल्पना सर्वसाधारणपणे शारीरिक कामे करणाऱ्यांना अजिबात मान्य होऊ शकत नसल्याने विषय चेष्टेचा ठरतो कारण सुखासीन जीवन हे शारीरिक दुर्बलतेचे कारण असते हेच जवळजवळ सर्वांना अमान्य असते.
महिलांचे सक्षमीकरण, सबलीकरण करणे अशा तऱ्हेचा विचार सुद्धा अधूनमधून उचल खात असतो पण सबलीकरण, सक्षमीकरण म्हणजे नेमके काय? याचे उत्तर कुणाकडेच नसते. सर्वसाधारणपणे सर्व सोयी-सुविधा पुरवल्या की सक्षमीकरण होते असा काहीसा तर्क त्यामागे असतो. सोयी-सुविधांनी शारीरिक सक्षमीकरण, सबलीकरण होण्याऐवजी उलट खच्चीकरणच होत असते, याचे भान कुणालाच नसते.
मानवी उत्क्रांतीच्या प्रवाहात माणसाचा प्रचंड वेगवान गतीने प्रगती आणि विकास झाला, असा एक सार्वत्रिक समज आहे पण माणसाने खरंच प्रगती किंवा विकास केला काय? याचा आढावा घेण्याची कुणीच तसदी घेऊ इच्छित नाही. जर आढावा घेतला तर जे निष्कर्ष निघतात ते अगदीच उलट निघतात. आदिमानव अवस्थेपासून तर सद्य अवस्थेपर्यंत मानवाची प्रगती होण्याऐवजी केवळ अधोगतीच झालेली आहे. काळाच्या ओघात दिवसेंदिवस माणसाची उंची कमी होत गेली, शरीरयष्टीचा घेर कमी होत गेला, वारा, ऊन, पाऊस, थंडी आणि नैसर्गिक बदलाशी जुळवून घेण्याची प्रतिकारशक्तीही कमी होत गेली हे ऐतिहासिक सत्य आहे. बौद्धिक विकास म्हणावा तर तसेही काही दिसत नाही. प्रगल्भता, विवेक, तारतम्य, कल्पनाशक्ती या पातळीवरही मनुष्याने प्रगती केली अशा काहीही पाऊलखुणा आढळत नाहीत. पौराणिक काळात राम, रावण, बिभीषण, लक्ष्मण होते तीच स्थिती आजही कायम आहे. माणसातला रावण मेला नाही आणि रामही जागा झालेला नाही. मानवी वृत्तीचे त्या वेळेस जे प्रमाण असेल तेच प्रमाण आजही कायमचे कायमच आहे. चोर-लुटेरे-डाकू-चरित्रहीन काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत. सभ्य-सज्जन-शीलवान-चरित्रवान काही प्रमाणात तेव्हाही होते; आजही आहेत.
माणसाचा विकास, प्रगती वगैरे काहीही झालेली नाही. केवळ मानवी अवस्था बदलली. वास्तुशिल्प, शिल्पकला, हस्तकला आणि वाङ्मय या क्षेत्रातील पूर्व कामगिरी बघून तर आज अचंबित होऊन चमत्कारिक वाटायला लागते. शारीरिक, आत्मिक अथवा बौद्धिक विकास वगैरे काहीही झालेला नाही. जो विकास झाला तो मनुष्यजातीचा विकास नसून केवळ साधनांचा, तंत्र आणि यंत्राचा विकास आहे. साधने जसजशी विकसित होत गेली तसतशी मानवी अवस्था बदलत गेली. समाजव्यवस्था सुद्धा कधीही निर्दोष नव्हती. ती सदैव एका सदोष अवस्थेकडून दुसऱ्या सदोष अवस्थेकडे सरकत राहिली. प्रगत तंत्र आणि साधनांच्या विकासामुळे मनुष्याचे ऊन, वारा, पाऊस, थंडी, वादळ, वातावरणातील बदल यापासून कृत्रिम संरक्षण झाले, जगणे आरामी-हरामी झाले, कष्टाची कामे सुसह्य आणि सुलभ झाली पण याच प्रगतीमुळे मनुष्याचा निसर्गाशी संपर्क तुटल्याने नैसर्गिक प्रतिकारक्षमता आणि सहनशीलता कमी झाली.
सर्व साधनसामुग्रीचा लाभ घेत घेत ऐषोआरामात जीवन कंठण्याच्या शैलीमध्ये प्रसूतीच्या वेळी सिझरिंगचे प्रमाण वाढत असताना नैसर्गिक अवस्थेतील समाजशैली मध्ये मात्र अजूनही तशी वेळ ओढवलेली नाही. माझी एक कष्टकरी रक्ताची नातेवाईक गरोदर असूनही एकटीच शेतात कामाला गेली होती. अकस्मात प्रसूती कळा सुरू झाल्याने तिथेच बाळंत झाली. तिने स्वतःच्या हाताने स्वतःचेच बाळंतपण उरकले. लेकरू ओट्यात घेतले आणि एकटीच शेतातून दोन किलोमीटर अंतरावरील गावातल्या घरी स्वतः चालत चालत आली. आता मायलेकी दोघेही धडधाकट आहेत. ज्यांनी बालपणापासून सायकल, बस अथवा कोणत्याही साधनांचा वापर केला नाही ती माणसे वयाच्या नव्वद-पंच्याण्णवव्या वर्षी सुद्धा चार-पाच किलोमीटर अंतर सहज पायी चालू शकतात, अशी अनेक उदाहरणे आपल्याला आपल्या सभोवताली दिसतात.
शोधात सावलीच्या असा घात झाला
की दिशा शोधण्यातच उभा जन्म गेला
निसर्गापासून गरजेपेक्षा जास्त विलगीकरण, अंतर राखले आणि सोयीसुविधांचा अतिरेक झाला तर माणसाचे जगणे सुसह्य होण्याऐवजी असह्य होऊन निसर्गानेच निर्माण करून ठेवलेल्या आयुष्याच्या रेशीमवाटा हळूहळू काटेरी वाटेत रूपांतरित व्हायला लागतात.
– गंगाधर मुटे आर्वीकर
=========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग ४ – दि. १५ फेब्रुवारी, २०२० – माणसाचा नव्हे साधनांचा विकास

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी *fr* http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा – भाग ३

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग ३
मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा
अन्न वस्त्र आणि निवारा ह्या माणसाच्या तीन मूलभूत गरजा एकदाच्या पूर्ण झाल्या की नंतरच माणसाचं खरंखुरं माणूस म्हणून आयुष्य सुरू होतं. सर्व सजीव प्राण्यासमोरचा प्राथमिक आणि मूलभूत प्रश्न स्वसंरक्षणाचा असतो, त्यानंतरच उदरभरणाची पायरी सुरु होते. मनुष्य आणिि त्याचे पाळीव प्राणी सोडले तर आजही स्वसंरक्षण हाच मुख्य प्रश्न अन्य प्राणिमात्रांच्या समोर कायमच आहे. त्यामुळेच स्वाभाविकपणे सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वसंरक्षणासाठी बचाव आणि आक्रमण हे दोन विशेष गुण आपोआपच विकसित झालेले आहेत.
गुणवैशिष्ट्यामध्ये मनुष्य हा सुद्धा इतर प्राण्यांपेक्षा फार वेगळा नसल्याने त्याच्यामध्ये सुद्धा बचाव आणि आक्रमण हे दोन्ही गूण निसर्गतःच विकसित झालेले आहे आणि इथेच नेमकी मानवतेची घाऊकपणे सदैव कुचंबणा होत आहे. माणसाचे नैसर्गिक शत्रू उदाहरणार्थ हिंस्त्र पशूपक्षी, वन्यप्राणी वगैरेपासून (वन्यप्राणी माणसाचे शत्रू नसून मित्र आहेत अशा दृष्टिकोनातून या मुद्याचा विचार करू नये. ज्याअर्थी मनुष्य हिंस्त्र पशूपक्षांना भितो आणि जीवाला धोका आहे असे तो स्वतः समजतो, त्या अर्थी शत्रू आहे असे गृहीत धरावे) माणसाच्या जीविताला अजिबात धोका उरलेला नाही. त्यामुळे माणसाच्या नैसर्गिक शत्रू सोबत लढाई करणे, त्यांच्यावर आक्रमण करणे ही संधी आता माणसाला उपलब्ध नाही. नैसर्गिक रित्या मिळालेली आक्रमणाची कला व्यक्त करण्यासाठी माणसाला शत्रू उरला नसल्याने त्याचा दुष्परिणाम असा झाला की माणूस आता माणसावरच आक्रमण करायला लागला. येथे एक उदाहरण नमूद करावेसे वाटते की, एकमेकाशी आपसात लढणारी प्राणिजात म्हणून कुत्री ही जात मान्यता पावलेली आहे पण जेव्हा त्यांच्यावर जर कुण्या अन्य प्राण्याने आक्रमण केले तर अशा स्थितीत सर्व कुत्री एकवटतात, एकजीव होतात आणि शत्रूशी लढतात. पण शत्रू नसेल तर मग मात्र सर्व कुत्री आपसातच भांडतात.
मनुष्यजातीचे गणितही त्यापेक्षा फार वेगळे नाही. माणसाच्या स्वभावात बचाव आणि आक्रमण ही दोन्ही कौशल्ये निसर्गदत्त आलेली आहेत. भूतकाळात झालेल्या लढाया, युद्ध यामागे माणसाचा आक्रमणकारी स्वभावच कारणीभूत आहे. भांडणतंटे सुद्धा आक्रमण व बचावाचे सौम्य स्वरूपच आहे. शाब्दिक आक्रमणाच्या पातळीवर बघितले तर तुरळक अपवाद सोडले तर प्रत्येक मनुष्य भांडखोर असतो. भांडण्यासाठी मनुष्य नवनवी कारणे शोधत राहतो. शत्रूशी तर भांडतोच पण शत्रू नसेल तर मग तो शेवटी मित्रासोबत तरी भांडणतंटा करून आपली हौस पूर्ण करून घेतो. बायकासुद्धा बायकांशी भांडतात. त्यांना सार्वजनिक नळावर किंवा पाणवठ्यावर भांडायची संधी उपलब्ध नसेल तर त्या निदान नवऱ्याशी तरी निष्कारण भांडून आपली हौस पूर्ण करून घेतात. पण त्यातही गंमत अशी आहे की आपण कुणालाही “तुम्ही भांडखोर आहात का?” असा प्रश्न विचारल्यास उत्तर नकारार्थीच येते. पण हे सत्य नाही. मनुष्यातील हेच दुर्गुण प्रामुख्याने संतांनी, समाजसुधारकांनी आणि महापुरुषांनी ओळखले होते म्हणून त्यांनी माणसाच्या तमोगुणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळे धर्म, पंथ, संप्रदाय, शाळा, विद्यापीठे वगैरे स्थापन केलीत. संतांनी भजने लिहून, प्रवचने करून माणुसकीची शिकवण देण्याचा प्रयत्न केला. पण सुधारक बदलत गेले पण माणूस काही सुधारला नाही. परिणामतः माणसामध्ये माणसाचे कमी आणि प्राणिमात्रांचेच गूण जास्त आढळतात.
अरे माणूस माणूस, जसा निर्ढावला कोल्हा
धूर्त कसा लबाडीने, रोज पेटवितो चुल्हा
कोल्ह्यासारखी लबाडी, सरड्यासारखी गरजेनुसार हवा तसा रंग बदलण्याची वृत्ती, बगळ्यासारखा ढोंगीपणा, सापाच्या विषासारखी विखारी भाषा, गाढवासारखा अविचारीपणा, माकडासारख्या कोलांटउड्या वगैरे माणसाला हमखास अंगवळणी पडलेले असते. काही केल्या अंगवळणी पडत नाही ती एकच भाषा म्हणजे मानवतेची भाषा. पण त्यातही गंमत अशी आहे की, जे निसर्गदत्त मिळते ते शिकावे लागत नाही व शिकवावेही लागत नाही कारण ती मूळ मानवी प्रवृत्ती असते. मानवी मूळ प्रवृत्ती अमानुष असते. माणसाला माणसासारखे जगायचे असेल तर मूळ मानवी प्रवृत्तीवर ताबा मिळवून मानवतेचा ध्यास धरणे, हीच मानवतेच्या कल्याणाची रेशीमवाट आहे; मानवतेच्या कल्याणासाठी दुसरी वाट उपलब्ध नाही.
– गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग ३ – दि. ८ फेब्रुवारी, २०२० – मूळ मानवी प्रवृत्तीवर हवा ताबा

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी  Fingure-Right  http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

 

सुखासीन आयुष्याचा राजमार्ग – भाग २

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग २
सुखासीन आयुष्याचा राजमार्ग
एकंदरीतच सजीव प्राण्यांचा विचार केला तर केवळ मनुष्यजात हीच एकमेव अशी प्राणीजात आहे की ती चराचर सृष्टीतील अन्य प्राणिमात्रापेक्षा अत्यंत शारीरिक दुर्बल अशी प्राणिजात आहे. स्वसंरक्षणासाठी मनुष्याकडे कोणतेही शारीरिक सामर्थ्य नाही. त्याला वाघासारखा तीक्ष्ण नखे असणारा पंजा नाही, रेड्यासारखे शिंगे नाहीत, हत्तीसारखे दात नाहीत, हरणासारखी पळण्याची गती नाही, पक्षासारखे हवेत उडता येत नाही, माकडासारखे झाडावर चढता येत नाही आणि उंदरासारखे बिळात लपताही येत नाही. त्याला स्वसामर्थ्याने स्वतःच्या अवयवांच्या बळावर इतरांवर आक्रमण करता येत नाही, इतकेच नव्हे तर स्वतःचे रक्षण देखील करता येत नाही. जंगली श्वापदे जाऊ द्या; साध्या मुंगीपासून, मधमाशीपासून किंवा उंदरा-मांजरापासून देखील त्याला स्वतःचा बचाव करणे अवघड आहे. तरीही अत्यंत दुर्बल अशा मनुष्यप्राण्याने संबंध प्राणिमात्रावर साम्राज्य प्रस्थापित केले कारण इतर शक्तिशाली प्राण्यांकडे नसलेली विचार करण्याची एकमेव अद्भुतशक्ती मनुष्याकडे आहे आणि तिचाच वापर मनुष्यजातीने आपल्या उत्क्रांतीसाठी करून घेतला. विचारशक्तीच्या बळावर मनुष्याने साधनांची, आयुधांची निर्मिती केली आणि त्याचा उपयोग स्वसंरक्षणासोबतच इतरांवर आक्रमण करण्यासाठी करून समग्र प्राणी जगतावर स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित केले. मनुष्यजातीच्या उत्क्रांतीचा इतिहास हा त्याच्या साधनांच्या निर्मिती व विकासाच्या उत्क्रांतीचा इतिहास आहे
शारीरिक दुर्बल असल्यानेच स्वसंरक्षणासाठी मनुष्याला मेंदूचा उपयोग करणे भाग पडले. त्यातूनच त्याला साधने निर्माण करण्याची कला अवगत झाली. जो सर्वात जास्त शारीरिक दुर्बल, कमजोर अथवा हीन असतो त्यालाच वेगवान क्रांतिकारी उत्क्रांतीची गरज भासते आणि ज्याची सतत उत्क्रांती सुरू असते तोच बदलत्या स्थितीत बदलत्या काळात खंबीरपणे टिकून राहतो. भूतलावरील डायनासोरसारखे अनेक शक्तिशाली प्राणीजात लोप पावत असताना माणसाने मात्र स्वतःची मानवजात केवळ टिकवूनच ठेवली नाही तर अधिकाधिक उत्क्रांत करत नेली. हत्यार सादृश्य साधनांची निर्मिती करून स्वसंरक्षणाचा परिघ प्रशस्त करणे हा त्याचा साधन निर्मितीचा पहिला टप्पा होता. प्राथमिक अवस्थेत अन्न, वस्त्र आणि निवारा यापैकी वस्त्र आणि निवारा ह्या दोन्ही बाबीचे महत्त्व केवळ स्वसंरक्षणापुरतेच मर्यादित होते. पण कालांतराने त्याच्या स्वसंरक्षणाचे प्रश्न सुटत जाऊन निर्धोक पातळीवर पोहोचला लागल्याने त्याची विचार करण्याची पद्धत स्वसंरक्षणावरून अन्य बाबीवर केंद्रित व्हायला लागली. संरक्षणासाठी निर्माण केलेली साधने त्याला आपोआपच शिकारीसाठी उपयोगी पडून त्याचा उपयोग अन्न मिळवण्यासाठी सुद्धा व्हायला लागला.
अन्न, वस्त्र व निवाऱ्याचे प्रश्न सहज सुटून आयुष्यात किंचितशी स्थिरता आल्यानंतर त्याच्या डोक्यात सुखासीन आयुष्याची कल्पना घर करत गेलेली असावी. पण याच सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेने मनुष्यजातीची जितकी हानी केली तितकी हानी अन्य कोणत्याही संकल्पनेने खचितच केली नसेल. रानटी अवस्थेपासून तर एकविसाव्या शतकापर्यंतचा मनुष्यप्राण्याचा स्वभाव बघितला तर मनुष्यप्राणी कधी एकलपणे तर कधी समूहाने सुखासीन आयुष्याच्या संकल्पनेच्या सभोवतीच पिंगा घालण्यात आपली सर्व शक्ती खर्ची घालत असल्याचे अधोरेखित होते. स्वतःचे व स्वतःच्या समूहाचे सुखासीन आयुष्य अधिकाधिक निर्धोक करण्यासाठीच एखादी अमेरिका एखाद्या इराकला बेचिराख करून टाकते. सुखासीन आयुष्याची प्रेरणाच दोन टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध, दोन समूहांमध्ये दंगल, दोन पक्षांमध्ये सत्तेची लढाई किंवा दोन देशांमध्ये विनाशकारी विध्वंसक रक्तपात घडवून आणत असते. अण्वस्त्रांच्या वापराने मनुष्यजातीचे अस्तित्वच संपुष्टात येऊ शकते इतके माहीत असून सुद्धा शंभर वेळा पृथ्वी निर्मनुष्य करू शकेल इतक्या अण्वस्त्रांची निर्मिती स्वतः मनुष्यप्राणी करून ठेवत असतो.
माणसाची उत्क्रांती माकडापासून झाली किंवा नाही हा मुद्दा बाजूला ठेवला तरी मनुष्यजातीच्या विचारशैलीमध्ये मर्कटचेष्टा हा स्थायीभाव असतो. ह्या मर्कटचेष्टापायीच मनुष्यप्राणी सुखासीन आयुष्याच्या शोधात सदैव भटकत असतो आणि नव्याने नवनवी संकटे स्वतःवर ओढवून घेत असतो. मनुष्य कधी नराचा नारायण, कधी नारायणाचा नर, तर कधी नराचा वानर होत राहतो. आधी युद्ध मग बुद्ध, पुन्हा युद्ध पुन्हा बुद्ध. हीच वारंवारिता त्याच त्याच क्रमाने वारंवार दृग्गोचर होत राहते. हे असे दृष्टचक्र सुद्धा सृष्टिचक्रासारखे अव्याहतपणे सुरू राहते.
धमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
राग, लोभ, मोह, माया, मत्सर, क्रोध यावर नियंत्रण मिळवून प्रेम, शांती, अहिंसा आणि परस्पर सद्भाव हीच खरीखुरी आयुष्याची रेशमी पाऊलवाट आहे आणि एकमेव रेशमी राजमार्ग सुद्धा हाच आहे. अगदी निःसंशयपणे!
– गंगाधर मुटे आर्वीकर
==========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”
भाग २ – दि. १ फेब्रुवारी, २०२० – सुखासीन आयुष्याचा राजमार्ग

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

जगणे सुरात यावे – भाग १

“आयुष्याच्या रेशीमवाटा” – भाग १
जगणे सुरात यावे
“असा बेभान हा वारा, नदीला पूर आलेला” हे गीत कानावर पडलं की आपण सुरेल अशा तालासुरांमध्ये पद्याऐवजी गद्य तर ऐकत नाही ना, असे काहीसे वाटायला लागते. सुर आणि पद्य यांच्यामध्ये जे सुरेल नाते आहे ते नाते सुर आणि गद्य यांच्यात मेळ खात नाही असे जाणवत राहते. तालासुरात गाणे म्हणजेच संगीत नसते. अगदी वृत्तपत्रातला एखादा लेख सुद्धा चाल लावून संगीतबद्ध करता येईल पण त्यातून जो नाद निर्माण होईल तो खचित सुरमयी नसेलच. शब्दांना सुरात सजवले आणि लयीत गुंफले म्हणजे शब्दांना सुर येतोच असे नाही तर त्यासाठी शब्द सुद्धा सुरमयी व शब्दरचना ओघवती असणे अनिवार्य असते.
लय हा जसा संगीताचा आत्मा तद्वतच मानवी आयुष्याचाही आत्मा आहे. जीवनात लय नसेल तर आयुष्य बेसूर होऊन जाते. संगीतातच किंवा संगीतामध्येच नादमाधुर्य तयार होते, असेही नाही. मुळात स्वतः शब्दच गद्य किंवा पद्य असतात. तसेच एकापेक्षा अधिक शब्दांचा समूह देखील स्वतः लयीची निर्मिती करत असतो. वाक्य सहज उच्चारताच आपोआप लयीत येऊन नादमय माधुर्य तयार होत असते. कोमल शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला मृदू, मृदुभाषी, सोज्वळ व सात्त्विक संवादाचे स्वरूप येते. याउलट कठोर, जहाल, भडक शब्द घेऊन वाक्यरचना केली तर अभिव्यक्तीला भेसूर, बीभत्स, कर्कश व शिवराळ संवादाचे स्वरूप येते. त्यामुळे आयुष्याचा प्रवाह आनंदमयी व आल्हाददायी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आपले उठणे, आपले चालणे, आपले बोलणे, आपले वागणे, सारे काही लयबद्धंच असायला हवे.
खरंतर मनुष्यच नव्हे तर साऱ्या सजीव सृष्टीचा स्वभाव निसर्गतः लयबद्धतेला प्राधान्य देणाराच असतो. वाघाची डरकाळी असो की गायीचे हंबरणे, पाखरांची किलबिल असो की कोकिळेची कुहूकुहू सारे कसे लयबद्धच असते. जंगलातील रातकिड्यांचा आवाज देखील नादब्रह्माची निसर्गतः निर्मिती करणाराच असतो. इतकेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन बघितले तर आपल्याला सहजपणे दिसतेय की निर्जीवामध्येही लयबद्धतेला प्राधान्य असतेच. झऱ्यांचे झुळझुळ वाहणे व त्यातून उत्पन्न होणारा आवाज हा नादब्रह्माचा आविष्कारच असतो.
अणुरेणू सहित साऱ्या विश्वाचा पसारा जर लयबद्धतेशी, नादमाधुर्याशी जवळीक साधणारा असेल तर मग नेमका मनुष्यप्राण्यामध्येच गद्यप्रकार किंवा गद्यस्वभाव आला तरी कुठून? जन्माला येताना माणसाचे रडणे लयीमध्येच असते आणि नादमाधुर्य निर्माण करणारेच असते. याचाच दुसरा अर्थ असा की, मनुष्याची मूळ अभिव्यक्ती लयबद्धतेशी इमान राखणारीच असते; पण पुढे मनुष्य जसा वयाने मोठा होत जातो तसतसी त्याची जडणघडण निसर्गदत्त अभिव्यक्तीशी फारकत घेत जाते. त्याच्यावर लादले जाणारे अनावश्यक कृत्रिम संस्कार, बेगड्या सभ्यतेच्या पायात लटकलेल्या बेड्या आणि संस्कारक्षम वर्तणुकीचे निकष यामुळे मनुष्य आपल्या मूळ स्वभावापासून दूर जातो व जन्मतः मिळालेली लय गमावून बसतो. लोक काय म्हणतील या भीतीने त्याचे गुणगुणणे बंद होते, लोक हसतील या भीतीने चालताना त्याचे पदलालित्य नाहीसे होते, आपण फार सभ्य आहोत असे इतरांना दाखविण्याच्या नादात त्याचे बोलणे पूर्णतः गद्य होऊन जाते. कालांतराने मनुष्य हळूहळू पूर्णतः बदलून जातो; इतका गद्य होऊन जातो की त्याला आपल्या इवल्याश्या बाळाशी पद्यमय गुंजारव करायला सुद्धा त्याची जीभ धजावत नाही, कारण आपल्याला आपले सभ्यत्व धोक्यात येण्याची भीती वाटत असते आणि इथेच मनुष्य आपल्या आयुष्याची लय हरवून बसतो. कर्तव्यनिष्ठ, समाजनिष्ठ जीवन जगताना आपण आपल्या आयुष्यातील आनंददायी जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगण्यापासून फार दूर गेलेलो आहोत, इतके सुद्धा मग स्वतःच्या लक्षात येत नाही.
समाजनिष्ठ जीवन जगणे आणि आनंदनिष्ठ जीवन जगणे यामध्ये फार तफावत आहे. आनंददायी, चैतन्यदायी जीवन जगण्यासाठी माणसाने स्वतःला लयीत आणलं पाहिजे.
वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान व्हावे
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात यावे
आयुष्य लयीत आणण्यासाठी मनसोक्त हसलं पाहिजे, मनसोक्त रडलं पाहिजे, मनसोक्त खेळलं पाहिजे, मनसोक्त गायलं पाहिजे, मनसोक्त नाचलं पाहिजे, मनसोक्त उडलं-बागडलं पाहिजे; इतकेच नव्हे तर कधी कधी मनसोक्त कुदलंही पाहिजे. यातच आनंददायी उल्हसित जीवन जगण्याच्या प्रेरणा सामावलेल्या आहेत.
– गंगाधर मुटे
===========
महाराष्ट्र टाईम्स मध्ये दर शनिवारी गंगाधर मुटे यांचे सदर लेखन “आयुष्याच्या रेशीमवाटा”

भाग १ – दि. २५ जानेवारी, २०२० – जगणं सुरात यावं

==========

आजवरचे सर्व भाग वाचण्यासाठी *fr* http://www.baliraja.com/ar या लिंकवर क्लिक करा.

==========

 

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत

१८ नोव्हेंबर २०१७ : महाराष्ट्र टाईम्स । मुंबई

चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
संमेलनाध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड

कल्पनाविश्वात रमणाऱ्या आभासी शेतीसाहित्याचा शेतीमधल्या प्रत्यक्ष वास्तवाशी काही संबध उरला आहे किंवा नाही याचा शोध घेण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या शेतीअर्थशास्त्र व नवतंत्रज्ञानाच्या जाणिवा समृद्ध करण्यासाठी आणि मराठी साहित्यक्षेत्राकडून कृषिजगताला असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी बुधवार, ३१ जानेवारी २०१८ रोजी पु. ल देशपांडे कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे चौथ्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी डॉ. विठ्ठल वाघ भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते अभिजित फाळके यांनी तर अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.
शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरुप धारण केले आहे पंरतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह आणि उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाहीत. अगदी साहित्यक्षेत्रसुद्धा या प्रश्नाकडे गंभीरतेने पाहत आहे असे आढळून येत नाही. मागील तीन वर्षातील सततच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीने शेतकरी हतबल झालेला असतानाच विद्यमान सरकारच्या फसव्या कर्जमाफीने शेतकरी आणखीनच हवालदिल झालेला आहे. जवळजवळ सर्वच शेतमालाचे भाव केंद्रशासनाने निर्धारित केलेल्या हमीभावापेक्षाही (MSP) कमी दराने बाजारात विकले जात आहे. शेतकरी देशोधडीस लागत असतानाही समाजाचा आरसा समजल्या जाणाऱ्या साहित्यक्षेत्रात मात्र वास्तवाचे प्रभावीपणे चित्र प्रतिबिंबित होताना दिसत नाही, ही बाब साहित्यक्षेत्रातील उदासीनता अधोरेखित करणारी आहे.
साहित्यक्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन नागपूर येथे तर २०१७ मध्ये तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते.
या मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणाऱ्या हौश्या-गौश्या-नवश्यांचा जमाव यापुरतेच मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्तारासाठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे आणि सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पीढी निर्माण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्याचा उद्देश या संमेलन आयोजनामागे आहे.
या संमेलनात “आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण”, “स्वामिनाथन आयोग: शेतीला तारक की मारक?”, “शेतकरी विरोधी कायद्यांचे जंगल, “सावध! ऐका पुढल्या हाका”, अशा विविध विषयावरील एकूण ४ परिसंवाद राहणार असून या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ इत्यादी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे. संमेलनात शेतकरी गझल मुशायरा व शेतकरी कवी संमेलन अशी दोन स्वतंत्र सत्रं ठेवण्यात आली आहेत.
संमेलनाच्या आयोजनासाठी नियोजन समिती, व्यवस्थापन समिती, आयोजन समिती, आणि स्वागत समिती अशा चार समित्या गठीत करण्यात आल्या असून या समित्यांचे अध्यक्ष म्हणून अनुक्रमे प्रा. भुपेश मुडे, प्रा. रमेश झाडे, प्रा. कुशल मुडे, व जनार्दन म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.

संपादकीय : अंगारमळा : खरा शेती साहित्यिक कोण?

संपादकीय : अंगारमळा – वर्ष १, अंक २ : मार्च २०१७खरा शेती साहित्यिक कोण?

शेतकर्‍यांची बाजू घेऊन लढण्यार्‍या लढवैय्यांसाठी हातात नांगर धरल्याची अनुभूती असणे नक्कीच महत्त्वाचे असले तरी अनिवार्य नाही. एखाद्याच्या नावाने सात-बारा असला किंवा तो प्रत्यक्षात शेतीत राबत असला म्हणजे तो शेती आणि शेतकर्‍यांचा हितचिंतकच असतो, असेही समजण्याचे कारण नाही. इथे स्वार्थ आणि परमार्थाचे व्दंद उभे राहते. शेतीची बाजू घेऊन लढायचे असेल तर निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कटिबद्धता महत्त्वाची असते. स्वत: शेतीवर राबून शेतीवर उपजीविका असणार्‍याला शेतकरी म्हणता येईल; नव्हे तोच खराखुरा शेतकरी. पण शेतकरी असला म्हणजे तो समग्र शेतीच्या भल्यासाठी वैश्विकतेच्या भावनेतून सद्भावना बाळगून असतोच, शेतीचे प्रश्न सुटून समग्र शेतकर्‍यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे जीवन खेचून आणणारे व्यवस्था परिवर्तन व्हावे असा व्यापक विचार करत असतोच, असा गैरसमज करून घेण्याचेही कारण नाही. शेती कसणे हा त्याचा व्यवसाय आहे, कदाचित अन्य कोणतेच पर्याय त्याच्यासमोर उपलब्ध नसल्याने नाईलाजाने उपजीविकेचे साधन म्हणून शेती कसत राहणे व मरता येत नाही म्हणून जगत राहणे अथवा जगण्याच्या सर्व वाटा समाप्त झाल्या तर स्वत:चे जीवन संपवण्यास सिद्ध होणे, हीच एकंदरीत शेतकर्‍याची जीवनशैली झाली आहे, असेही म्हणता येईल.
मात्र शेतीची बाजू मांडायची असेल तर शेतकरी असणे किंवा नसणे फारसे महत्त्वाचे नाही. मागील ३० वर्षाचा इतिहास तपासला तर नेमके हेच आढळून येते. ज्यांच्याकडे सातपिढ्यापासून शेती नव्हती, शेतीच्या उत्पन्नावर उपजीविका अवलंबून नव्हती, शेतकर्‍यांच्या पोटी जन्मही घेतला नव्हता तरी त्यांनी “शेतकर्‍याच्या आयुष्यात सुखाचा व सन्मानाचा दिवस उजाडावा” म्हणून घरादारावर तुळशीपत्र ठेवून शेतकरी आंदोलनात स्वत:ला झोकून दिले होते, अनेकांनी स्वत:च्या आयुष्याची होळी आणि संसाराची राखरांगोळी केली होती, हजारो तुरुंगात गेले होते, हजारोंनी निधड्या छातीवर पोलिसांच्या लाठ्या झेलल्या होत्या. शेकडोंनी बंदुकीच्या गोळ्यांसमोर स्वत:ची छाती आडवी धरली होती. मात्र त्याच वेळी स्वत:ला शेतकरी म्हणवणारे करोडो शेतकरी पुत्र मात्र शेतकरी आंदोलनाशी प्रतारणा करत आपापल्या जातीच्या पुढार्‍यांचे धोतर धूत बसले होते. हा अगदी ताजा इतिहास आहे.
विषय शेतकरी आंदोलनाचा असो किंवा शेती साहित्य चळवळीचा. वास्तव कटु असले तरी ते स्वीकारलेच पाहिजे. शेतकर्‍याच्या पोटी जन्म घेतला असला किंवा नावाने सात-बारा असला तरी हा निकष लावून कोणत्याच निष्कर्षाप्रत पोचता येत नाही. फक्त सातबारा नावाने असला म्हणजे तो शेतकरी आंदोलक ठरत नाही; तद्वतच शेती साहित्यिकही ठरत नाही. संबंधित व्यक्तीची शेती विषयासोबत असलेली बांधिलकी, शेतीच्या अर्थवादाचा अभ्यास, कटिबद्धता आणि प्रसंगी त्यासाठी सर्वस्व पणाला लावू शकणारी त्यागी वृत्तीच इथे महत्त्वाची; भले मग तो शेतकर्‍याच्या घरात जन्मलेला असो अथवा नसो! लेखणीतून व्यक्त होणारा आशय शेतीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा आहे की शेतीचा प्रश्न आणखी किचकट करून शेतीच्या शोषकांना पोषक ठरणारा आहे यावरूनच साहित्यिकाची जातकुळी ठरवली गेली पाहिजे.

– गंगाधर मुटे
२०/०२/२०१६

************************************************
पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
***********************************************
अंगारमळा वार्षिक वर्गणी – रु.१५०/-
वर्गणी ऑनलाईन भरण्यासाठी:
A/c Name – ANGARMALA
A/c No – 0202002100027538
Punjab National Bank Branch – Hinganghat (Wardha)
MICR Code – 442024005 IFSC Code – PUNB0020200

वर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:
अंगारमळा
मु.पो.आर्वी (छोटी)
ता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड – ४४२३०७

Angarmala

४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : नियोजन

४ थे अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलन : नियोजन

नमस्कार मंडळी,

        आज १ जुलै २०१७. वर्षाचा सहा महिन्याचा पूर्वार्ध संपला आणि आजपासून उत्तरार्ध सुरु झालाय. ४ थ्या अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचे म्हणता-म्हणता अन्य कामाच्या धबडग्यात चक्क चार महिने निघून गेलेत. जरा उशीर झाला असला तरी पुढील कामाचा थोडा वेग वाढवून आपल्या लेट गाडीचा टाइम भरून काढणे अशक्यही नाही. चला तर मग आजपासून आता चवथ्या संमेलनाच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल विचार करुयात आणि कामाला लागुयात.

        २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे पहिले, २० व २१ फ़ेब्रुवारी २०१६ ला नागपूर येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात दुसरे आणि २५ आणि २६ फ़ेब्रुवारी २०१७ ला गडचिरोली येथील संस्कृती सांस्कृतिक सभागृहात तिसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन सुखरूप आणि यशस्वीरित्या पार पडले, त्याबद्दल सर्व सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. 

       आता चवथे संमेलन विदर्भाबाहेर मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद येथे घ्यायचे नियोजित असून त्याकरिता  पुढील प्रयत्नाची दिशा ठरवून वाटचाल करण्यासाठी आणि पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी आपले अभिप्राय आणि सुचना महत्वाच्या ठरणार आहेत.
  • तीन साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनानंतर आता अ. भा. शेतकरी साहित्य चळवळीच्या संघटनात्मक बांधणीला सुरुवात करणे आवश्यक झाले आहे. पहिल्या टप्यात जिल्हानिहाय संपर्क प्रमुख किंवा जिल्हा संपर्क मंडळ नेमायचे आहे. या कार्यात स्वतःची पदरमोड करून स्वेच्छेने कार्य करु इच्छिणार्‍यांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर १५/०७/२०१७ पूर्वी संपर्क साधावा.
  • अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या आर्थिक व्यवहार व ताळेबंद हिशेबाकरिता दोन वर्षापूर्वी “शेती अर्थ प्रबोधिनी” ही संस्था नोंदणीकृत करण्यात आली आहे. सबब पुढील सर्व आर्थिक व्यवहार पारदर्शीपणाने संस्थेच्या मार्फतच चालतील. इच्छुक व्यक्ती/संस्था/प्रतिष्ठन यांच्याकडून देणगी स्वरुपात निधी स्विकारला जाऊ शकतो. इच्छुकांनी abmsss2015@gmail.com या इमेलवर संपर्क साधावा.   

    मोबाईलधारकासाठी खास : अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळीची सर्व माहिती सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी “युगात्मा परिवार” मोबाईल एप डाउनलोड करा. 
  • http://play.google.com/store/apps/details?id=com.andromo.dev633912.app614211

    आपल्या सुचनांचे स्वागत आहे. 

आपला स्नेहांकित

गंगाधर मुटे 

संस्थापक अध्यक्ष 
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य चळवळ
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

एक लेख एका आत्मप्रौढीचा!

आत्मस्तुती किंवा आत्मगौरव मानवी जीवनात निषिद्ध मानल्या गेला आहे. स्वत:च स्वत:चे कौतूक करणे तर अशोभनीयच. अगदी ग्रामीण जनजीवनात सुद्धा अशा वर्तनाला “अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे” अशा वर्गवारीत ढकलले गेले आहे. अगदी आत्मचरीत्र लिहायचे असेल तरी लेखकाने आपल्या आयुष्यातील बर्‍या-वाईट दोन्ही प्रकारच्या घटनांचा उहापोह करावा, अशी अपेक्षा असते. पण तरीही आयुष्यात कधीकधी अनपेक्षितपणे असाही प्रसंग येतो की आपलाच आपल्याला अभिमान वाटायला लागतो. आपण सहज म्हणून केलेले कार्य अनपेक्षितपणे अपेक्षेबाहेरची फ़लनिष्पती देऊन जाते. अशावेळी आपलाच आपल्याला वाटणारा  अभिमान अहंकार नसतो. त्यामागे असते केवळ आपल्या हातून घडलेल्या कार्याची कृत्यकृत्यता आणि श्रमसाफ़ल्यता.

अशाच एका प्रसंगाविषयी आज लिहायचा मोह न आवरल्यामुळे आत्मस्तुतीचा दोष स्विकारुन मी लिहित आहे.

 १२ डिसेंबर २०१५ ची ती सकाळ. वेळ ९ च्या आसपासचा. पुण्यावरून माझे मित्र श्री प्रसाद सरदेसाई यांचा एक अचानक मोबाईल कॉल आला. ते कापर्‍या स्वरात म्हणाले,

“मुटे सर, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले का?”

          शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांची प्रकृती अनेक दिवसापासून  चांगली नव्हती हे मला माहित होते. ते अत्यवस्थ असल्याचा १० नोव्हेंबर २०१५ ला दुपारी संदेश आल्याने रवीभाऊ काशीकर, सरोजताई काशीकर, सुमनताई अग्रवाल, शैलजाताई देशपांडे, पांडुरंग भालशंकर आणि मी लगोलग रात्रीच्या फ़्लाईटने पुण्याला जाऊन रुबिया हॉस्पीटलमध्ये त्यांची भेट घेऊन आलो होतो. ते अत्यवस्थ होते आणि वैद्यकीय उपचाराला त्यांचे शरीर फ़ारसे प्रतिसाद नव्हते. एवढे मला माहित होते. नंतरच्या काळात संपर्क माध्यमातून प्रकृती “यथास्थिती” असल्याचे संकेत मिळत होते. पण अगदीच ताजी म्हणावी अशी माहिती माझ्याकडे नसल्याने मी म्हणालो,

“ नाही. यासंदर्भात ताजी माहिती माझ्याकडे नाही” मी.

“शरद जोशी इज नो मोअर” असा तिकडून प्रसाद सरदेसाई यांचा रडका आवाज ऐकताच माझ्या काळजात धस्स झाले. विश्वास बसत नव्हता पण सरदेसाई सरांनी दिलेली बातमी खोटी असण्याचीही शक्यता नव्हती. मी तातडीने मोबाईलवर नंबर डायल केला.

“सरोजताई, साहेबांच्या प्रकृत्तीबद्दल काही कळले काय?” मी.
“माझं काल रात्रीच बोलणं झालं प्रकृती………”
मी मध्येच सरोजताईंचे बोलणे थांबवून म्हटले.
“आज काहीतरी विपरित बातमी आहे, तुम्ही तातडीने पुण्याला संपर्क करावा”

            इतके बोलून मी लगेच फ़ोन कट केला. नंतर लगेच श्री वामनराव चटप व श्री राम नेवले यांना फ़ोन केला. त्यांनाही काहीच माहिती नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पुण्याला संपर्क करुन माहिती मिळवावी, असे सुचवले. घरी बायकोला सांगून टीव्हीवर मराठी बातम्यांचे चॅनेल आळीपाळीने सतत बदलून काही बातमी येते का ते बघत राहायला सांगीतले.
            पुण्याला फ़ोन करून म्हात्रे सर किंवा देशपांडे सरांशी संपर्क करावा व नक्की काय ते खात्री करून घ्यावी, असा विचार करत असतानाच तिकडून तितक्यात सरोजताईंचाच फ़ोन आला. त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत नव्हते. आता बोलण्याची गरजही संपलीच होती. मग फ़ोनवर दोन्हीकडून अक्षरश: ओक्साबोक्सी रडारड सुरु झाली. ९-१० मिनिटानंतर मी स्वत:ला सावरायचा प्रयत्न केला पण त्यात यश येईना म्हणून बोट लाल बटनेवर ठेवले आणि फ़ोन कट केला.

आता रडण्याखेरीज अन्य काही कार्य उरलेलेच नव्हते. बातम्या अजून सुरु व्हायच्या होत्या. निदान आणखी दोन तास तरी ही बातमी अधिकृतपणे जाहीर होण्याची व प्रसारमाध्यमांपर्यत पोचण्याची शक्यता नव्हती. बातमी अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना आणि वृत्त वाहिन्यांना शरद जोशींविषयीची माहीती, जीवनपट, छायाचित्र आणि व्हिडियो लागतील. ही सर्व माहिती प्रसारमाध्यमांना उपलब्ध करून देऊ शकेल असे शेतकरी संघटनेकडे एकच व्यक्तिमत्व होते आणि ते म्हणजे प्रा. सुरेशचंद्र म्हात्रे. संघटनेच्या सुरुवातीपासूनच म्हात्रे सरांनी केंद्रीय कार्यालय सांभाळले आहे. पण याक्षणाला ते माहिती पुरवायला नक्कीच उपलब्ध होऊ शकणार नव्हते. शिवाय शरद जोशींच्या प्रकृतीची बातमी प्रसारमाध्यमांपासून लपवून गोपणीयता राखल्याने प्रसारमाध्यमेही बेसावध असल्याने ऐन वेळेवर माहिती गोळा करणे त्यांनाही शक्य होणार नाही, याचाही नीटसा अंदाज येऊन गेला.

शरद जोशींच्या अत्यवस्थेविषयी कार्यकर्त्यांनाही फ़ारशी माहिती नसल्याने ही बातमी महाराष्ट्रासहित अन्य राज्यातील शेतकर्‍यांनाही धक्का देणारी असल्याने या बातमीचे महत्वही अनन्यसाधारणच होते. आता यासंदर्भात जे काही करायचे ते आपल्यालाच करायला हवे असे ठरवून  तातडीने लॅपटॉपवर बसलो आणि महाराष्ट्रासहित देशातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांना आणि दुरदर्शन वाहिन्यांना इमेलद्वारे माहीती पाठवायचा सपाटा सुरू केला.

तीन-चार इमेल जाईपर्यंत ठीक होते पण जेव्हा एकापाठोपाठ शरद जोशींविषयीची संपूर्ण माहिती, जीवनपट, आंदोलनाचा आढावा, छायाचित्र व व्हिडियो असलेले दहा-बारा इमेल त्यांचेकडे पोचले तेव्हा पत्रकारांना संशय येऊन काहीतरी नक्कीच वाईट बातमी असल्याचा त्यांनाही अंदाज येणे क्रमप्राप्त होते. मग माझा मोबाईल खणखणायला लागला. पुण्यावरून अधिकृत घोषणा न झाल्याने मी पत्रकारांना बातमीच्या सत्यतेचा दुजोरा देऊ शकत नव्हतो. मग मोबाईल मित्राच्या हाती दिला आणि सांगीतले की कॉल करणार्‍या सर्वांना सांग की मी सध्या अतिव्यस्त आहे त्यामुळे त्यांनी एक तासानंतर संपर्क करावा. मी मात्र माहितीचे इमेल पाठवणे सुरुच ठेवले.

मी पाठवत असलेल्या माहितीचा बाज लक्षात घेता बहुधा प्रसारमाध्यमांनाही पुरेसा अंदाज येऊन गेलेलाच असावा कारण मी फ़ोनवर उपलब्ध नाही म्हटल्यावर तिकडून इमेलवर रिप्लाय यायला लागलेत. रिप्लायला प्रतिसाद न देता मी नवीन माहिती पाठवणे सुरुच ठेवले.  त्याचा परिणाम असा झाला की अधिकृत घोषणा होताच दूरदर्शन वाहिन्यावर थेट सविस्तर बातम्याच सुरू झाल्यात. पुण्यापासून ८०० किलोमिटर अंतरावरील आर्वी छोटी सारख्या दुरवरच्या ग्रामीण भागातील ३००० लोकसंख्या असलेल्या गावात बसून मी दिवसभर राज्यभरातल्या कानाकोपर्‍यातील प्रसारमाध्यमांना हवी ती माहिती आणि साहित्य पुरवत होतो, ही आधुनिक संगणकीय व आंतरजालिय तंत्रज्ञानाची किमया होती आणि मी त्या अत्याधुनिक नवतंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून घेत होतो.  दिवसभर दूरदर्शन वाहिन्यावर आणि १३ तारखेच्या राज्यभरातील वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यामध्ये ५० ते ९० टक्के मजकूर मी पाठवलेलाच दिसत होता किंवा मीच चालवत असलेल्या http://www.sharadjoshi.inhttp://www.baliraja.com या संकेतस्थळावरुन तरी घेतलेला होता. शरद जोशींचा जीवनपट तर जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी मी जसा पाठवला तसाच्या तसाच छापला होता.

माझ्या एका छोट्याशा प्रयत्नाने व मी निर्माण करून ठेवलेल्या संकेतस्थळांमुळे शरद जोशींसारख्या युगात्म्याचे व्यक्तीमत्व सविस्तर माहितीसह जनतेपर्यंत पोहचू शकल्याने श्रमसाफ़ल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटून अभिमानास्पद वाटणे अगदीच स्वाभाविक आहे.

 – गंगाधर मुटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~
साप्ताहिक उदयकाळ “चैत्र विषेशांक-२०१७” मध्ये प्रकाशित.

सामान्य चायवाला

सामान्य चायवाला 

जिंकावया जगाला ऐटीत तो निघाला
मुलखात मुद्रिकेच्या अलगद शिकार झाला

मज रानटी समजला तेही बरेच झाले
कसदार रानमेवा मी चारतोच त्याला

ना घाम गाळला अन ना रक्त आटविले
कोणी कुणा पुसेना पैसा कुठून आला?

मी मेघ बाष्पधारी वणव्याकडे निघालो
लांबी-परीघ-रुंदी मोजत बसू कशाला?

धनवान इंडियाची बलवान लोकशाही
होतो प्रधानमंत्री सामान्य चायवाला

शिर्षस्थ पाखरांच्या चोची चरून झाल्या
की धाडतील नक्की आमंत्रणे तुम्हाला

ज्यांचे अभय पहारे ते मारतात बाजी
पुसणार कोण येथे निद्रिस्त जागल्याला?

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~