शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही!

 

निसर्ग म्हणजे निसर्ग आहे आणि त्याची वर्तणूक सुद्धा निसर्गाला शोभेल अशी नैसर्गिकच असणार हे उघड आहे.  निसर्ग विविधतेने नटलेला आहे. विविधता हा निसर्गाचा स्थायीभाव आहे. निसर्गातला विविधता हा गूण काही कालचा किंवा परवाचा नाही. आपल्यासारख्या बुद्धीवंतांचा जन्म झाल्यानंतर निसर्गाने विविधतेचा गूण धारण केला असेल, असेही नाही. निसर्गाचा जेव्हा केव्हा जन्म झाला असेल तेव्हाच तो विविधतेचा जन्मजात गूण धारण करुनच जन्माला आला असणार, हेही उघड आहे.  ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्पष्ट असूनही यावर मते-मतांतरे व्यक्त होत असतील तर तीही नैसर्गिक वैविध्यतेच्या रचनात्मक मानसिकतेमुळेच होत असते, ही नैसर्गिक शाश्वत सत्यता सुद्धा आपण स्विकारलीच पाहिजे. पण तिथेही विविधताच आडवी येते आणि शाश्वत सत्यता स्विकारायला शतप्रतिशत मानसिकता कधीच तयार होत नसते.

 

भारतीय शेती निसर्गावर अवलंबून असल्याने शेतकरी गरीब आहे, हे विधान मी शाळा-कॉलेजात असताना ऐकण्यात आणि वाचण्यात इतके वेळा कानावर आणि डोळ्यावर येऊन आदळायचे की कानाचे पडदे फ़ाटायला बघायचे आणि डोळ्यातली बाहुली ठार गारद व्हायला बघायची. शाळा-कॉलेजात जाऊन शिकले-सवरलेले आणि ग्रंथ-कुराण-बायबल-वेद वाचून साक्षात ज्ञानाचे महामेरू झालेले इतके येरेगबाळे कसे बोलू आणि लिहू शकतात, याचे कायम कुतुहलमिश्रीत नवल वाटत राहायचे. मग या विधानाची शहानिशा करून आकलन करण्यासाठी मेंदूच्या भवती विचाराचे लोंदे गोळा व्हायचे. ते मेंदूभवती इतका पिंगा घालायचे की मेंदू पार गुळगुळीत होऊन पलिकडे काम करेनासा व्हायचा. कधीकधी मेंदू हँग झाला की मुद्दा निकाली न काढताच त्याला आहे तसाच अर्धवट आणि येरागबाळा सोडून मेंदूला फ़ॉर्म्याट मारून, नव्याने रिफ़्रेश मारून ताजेतवाने व्हावे लागायचे.

शाळा-महाविद्यालयात मिळवलेल्या ज्ञानाची शिदोरी गाठीशी घेऊन जेव्हा मी प्रत्यक्ष शेती करायला सुरवात केली तेव्हा पहिल्या सहा महिन्यातच पुस्तकीय ज्ञानातील विरोधाभास उघड व्हायला लागला. प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, प्रत्यक्ष ग्रामीण जीवन, पुस्तकीय ज्ञानातील पांडित्य व बोलघेवड्या पगारी तज्ज्ञांचे सल्ले हे दुरान्वयानेही आपसात एकमेकांच्या नातेसंबंधात लागत नाही, याची प्रचिती यायला लागली. शेती, शेतीतील गरीबी, गावाची दुर्दशा याची कारणे शोधतांना जी कारणे आढळली ती पुस्तकांशी, पुस्तकी पंडीतांच्या निष्कर्षाच्या आणि शिकवणीच्या थेट उलटी दिसत होती. डोहाकडे जाणार्‍याला वाचवण्यासाठी उदात्त हेतूचा देखावा करून सुचवले जाणारे मार्ग त्याला आणखी त्वरेने डोहाकडे नेणारे आणि कुठल्याही स्थितीत तो बुडलाच पाहिजे, अशी बेमालूमपणे पण प्रभावी व्यवस्था करणारेच आहेत, हे ज्या क्षणी लक्षात आले आणि खात्री पटली त्या क्षणीच प्रचलित पुस्तकी पंडीत, पारंपारिक ज्ञानाचे महामेरू आणि पगारी तज्ज्ञ यांच्यावरचा माझा विश्वास भुर्रकन उडून अवकाशात निघून गेला तो आजतागायतही परत आलेला नाही.

मात नव्हे मैत्री

                  निसर्गावर मात करण्याच्या वल्गना हा आणखी एक असाच आगाऊपणा. एकंदरीत निसर्गाची प्रकृती एकजिनशी आणि वैश्विक आहे. विश्वाच्या एका भौगोलिक प्रदेशात घडलेल्या बदलाचा प्रभाव विश्वाच्या दुसर्‍या भौगोलिक प्रदेशात जाणवत असतो. वैश्विक रचना समग्र ब्रह्मांड रचनेशी संलग्नीत आहे, इतके जाणायला मनुष्य खगोलशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशात्रीच असला पाहिजे, हेही आवश्यक नाही. ब्रह्मांडाची परिमिती कुणालाच मोजता आली नाही आणि मोजता येणे शक्यही दिसत नाही. आकाशगंगेतील अंतर मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे परिणाम सुद्धा अत्यंत थिटे आहे. आकाशगंगेचे नुसते अंतर मोजण्याचीही कुवत नसलेल्या मनुष्यप्राण्याने थेट मात करण्याच्या गोष्टी करणे अत्यंत हास्यास्पद आहे. एकंदरित निसर्गाची आणि निसर्गावर प्रभाव टाकणार्‍या घटकांशी व्याप्ती लक्षात घेतली तर विभागवार किंवा प्रदेशवार निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणता येणे आपल्या आवाक्यात नाही. तंत्रज्ञानाने कितीही झेप घेतली तरी निसर्गाच्या प्रकृतीवर नियंत्रण आणणे कधीही शक्य होणार नाही, याचे भान विसरून चालणार नाही. सतरा वर्षे शाळा-महाविद्यालयात घालवली आणि जोडीला शे-पाचशे पुस्तके वाचल्याने ज्ञानग्रहनक्षमतेच्या कक्षा तेवढ्या रुंदावत जातात, निसर्गावर मात करण्याचे सामर्थ्य प्राप्त होत नाही याचे भान राखायलाच हवे.

हजारो वर्षापासून शेतकरी शेती करत आला पण त्याने निसर्गावर मात करण्याची भाषा कधीच केली नाही. त्याने निसर्गाशी जुळवून घेतले, निसर्गाशी मैत्री केली. निसर्गाला बदलायला भाग पाडणे मनुष्य प्राण्याच्या आवाक्यात नाही, याची जाणीव असण्याइतपत व्यावहारिक ज्ञान त्याचाकडे असल्याने तसा प्रयत्न त्याने कधीच केला नाही. याउलट तो स्वत: बदलला. निसर्ग कसा असतो, हे त्याने समजून घेतले एवढेच नव्हे तर त्याने स्वत:ला निसर्गानुरूप बदलवून घेतले. त्याने नैसर्गिक प्रकृतीला स्वत:च्या प्रकृतीत विलिन करून घेतले. रान केव्हा नांगरायचे, उदिमाला सुरुवात केव्हा करायची, पेरणी केव्हा करायची याचे वेळापत्रक त्याने निसर्गाला अनुसरून तयार केले. पेरणी केली अन पाऊस आला नाही किंवा अति पाऊस होऊन दुबारपेरणीची वेळ आली तर कधी कुरबूर केली नाही, आदळआपट केली नाही आणि निसर्गाला कधी दोष तर दिलाच नाही. पुन्हा नव्याने तयारी केली आणि दुबार पेरणी केली. कधी ओला दुष्काळ पडला, कधी कोरडा दुष्काळ पडला, कधी एका पावसाच्या कमतरतेने पीक करपून गेले, कधी अति पावसाने अथवा महापूराने शेत पिकासहित खरडून गेले, कधी वादळाने तर कधी गारपिटीने पीक धाराशायी केले पण शेतकरी अश्रू ढाळत बसला नाही आणि निसर्गाच्या नावाने शिमगा करत डांगोराही कधीच पिटला नाही. त्याने निसर्गाला मित्रासारखीच वागणूक दिली आणि निसर्गाला त्याच्या विविधतेसह आनंदाने स्विकारले. पावसाने उघडीप दिली किंवा खंडवृष्टीची स्थिती निर्माण झाली तेव्हा शेतकर्‍याने निसर्गाला बोल लावला नाही तर त्याची आराधना केली. कधी कमरेला बेडूक बांधून वरुणदेवतेला प्रसन्न करायचा प्रयत्न केला, कधी सर्व गावकर्‍यांनी एकत्र येऊन मारोतीच्या पाळावर अभिषेक केला तर कधीकधी सामुहिक सदावर्त करून देवासमोर नैवद्य ठेवला आणि गावातील सर्व गोरगरीब गावकर्यांना यथेच्छ जेवनाचा पाहूणचार दिला. शेतकर्‍याने पेरणीसाठी मातीचा, पीक जगवण्यासाठी पाण्याचा, कचराकाडी जाळण्यासाठी अग्नीचा, धान्य उफ़णण्यासाठी वायुचा, उदीमासाठी वृक्षाचा खुबीने वापर केला आणि निसर्गदत्त संसाधनाचा पुरेपूर कौशल्यानिशी वापर करत व निसर्गाशी सलोखा राखत आपली शेती फ़ुलवत ठेवली. इतिहासाच्या कोणत्याच कालखंडात शेतकर्याने निसर्गाला शत्रू मानून त्याच्यावर मात करण्याची भाषा वापरल्याच्या यत्किंचितही पाऊलखुणा आढळत नाही.

कुटनितीचा खेळ

              मग निसर्गावर मात करण्याची आणि शेतीतील अठराविश्व दारिद्र्याशी निसर्गाच्या लहरीपणाशी सांगड घालून निसर्गालाच जबाबदार धरण्याची भाषा आली कुठून? या प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे. उत्तर जटील नसले तरी कुटील नक्कीच आहे. शेतकर्‍यांच्या मर्जीनुसार आणि पिकांच्या गरजेनुसार पाऊस कोणत्याच युगात पडल्याची शक्यता नाही आणि यानंतर पुढे येणार्‍या युगातही पडणार नाही, हे शेतकर्‍याला निसर्गत: मान्य असल्याने तो त्याच्या गरिबीला निसर्गाला जबाबदार धरत नसला तरी अन्य कोण जबाबदार असेल याचीही कल्पना त्याला नाही आणि नेमकी इथेच शेतकरी समाजाची गोची झाली. शेतीत दारिद्र्य आहे हे खरे आहे पण ते कशामुळे आहे, याचे नेमकेपणाने उत्तर शेतकरी समाजाला माहित नसल्याने त्यांचा “नरोवा कुंजरोवा” झाला.

शेतकरी समाजातील याच संभ्रमाचा फ़ायदा अनुत्पादक वर्गाने नेमकेपणाने उचलला. डाकूंचे, चोरांचे किंवा भामट्यांचे बरे होते. कुठलेही तत्वज्ञान न सांगता किंवा कारणमिमांसा न करताच बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करत ते शेतमाल फ़ुकटातच लुटून न्यायचे. मात्र ऐतखाऊ, अनुत्पादक व बिगरशेतकरी वर्ग यांच्याकडे बळाचा किंवा चौर्य कौशल्याचा वापर करण्याची क्षमता नसल्याने म्हणा किंवा त्यांना समाजात सामाजिक प्रतिष्ठा असल्याने म्हणा, त्यांना अशा राजरोसपणे लुटीच्या मार्गाने जाणे शक्यच नव्हते आणि म्हणून शेतीमध्ये उत्पादित होणारा माल फ़ुकटात मिळणेही अशक्यच होते. मग या सर्वांनी मिळून कुटनितीचा डाव खेळणे सुरू केले. जेव्हा जेव्हा थेट दोन हात करणे अशक्य असते तेव्हा तेव्हा समोरच्या बाजुला परास्त करण्यासाठी कुटनितीचा अवलंब करण्याला बहुतांश शास्त्रांची मान्यता असल्याने शेतमालाच्या लुटीसाठी या मार्गाचा अवलंब करणे सर्वांनाच सोईचे वाटले असावे. शेतमाल कमीत कमी दरात उपलब्ध होत राहण्यासाठी शेतकर्‍यांना त्यांच्या गरिबीचे खरे कारण कळू न देता त्यांची वेगवेगळ्या पद्धतीने दिशाभूल करत राहणे सर्वांना फ़ायदेशीर ठरले असावे. शेतकरी आळशी, कामचोर, उधळ्या, अज्ञानी आहे, परंपरागत पद्धतीने शेती करणारा, नव्या तंत्रज्ञानाचा वापर न करणारा आहे त्यामुळे तो गरीब आहे किंवा शेतीच्या दुर्दशेला निसर्गाचा लहरीपणा कारणीभूत आहे, अशा सामुहिक जनमानस तयार करणार्‍या संकल्पनांचा वापर शेतीमालाला मिळणार्‍या अत्यल्प भावाच्या मुद्याला बगल देण्यासाठी कुटनितीक शैलीने पद्धतशीरपणे करण्यात आला असावा, हे उघड आहे.

ग्राहकांची मानसिकता

            कोणत्याही व्यक्ती अथवा सामुहिक कुटुंबाचा जमा आणि खर्चाचा ताळेबंद जुळत नाही तेव्हा त्या कुटुंबाचा अर्थसंकल्प तोट्याचा तयार होतो. अर्थाच्या अनुलब्धतेमुळे साधनांच्या खरेदीवर एकतर मर्यादा येतात किंवा खरेदी अशक्य होते. घरात साधनांची त्यातल्या जिवनावश्यक गरजेच्या वस्तुंच्या खरेदीसाठी अथवा जिवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी क्रयशक्ती संपली की घरात जे चित्र तयार होते त्यालाच आपण दारिद्र्य म्हणत असतो. देशाचा, राज्याचा, कार्पोरेट क्षेत्राचा, सामाजिक क्षेत्राचा अर्थसंकल्प मांडण्याची व तर्‍हेतर्‍हेचे उपाय सुचवण्याची पात्रता असलेले लक्षावधी पगारी अर्थतज्ज्ञ या देशात मुबलक मिळून जातात. अर्थसंकल्पात तृटी दर्शविणारे व त्याचे लेखापरिक्षण करणे ऑडिटर सुद्धा लक्षावधी संख्येने मिळून जातात पण शेतीत गरिबी आहे कारण शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल एवढेही भाव मिळत नसल्याने शेतीचा अर्थसंकल्प तोट्यात जातो, असे ठासून सांगणारे अर्थतज्ज्ञ किंवा सी. ए मात्र दुर्मीळ असणे वरील कुटनितीचा परिणाम आणि पुरावा आहे.
             गणीताच्या भाषेत ०.५ च्या वरील सर्व किंमती १ च्या बरोबर तर ०.५ च्या आतील सर्व किंमती शुन्याच्या बरोबरीच्याच असतात. आज आपल्या देशात बहुतांश शेतमालाला एकूण उत्पादनखर्चाच्या निम्म्यापेक्षाही कमीच भाव दिले जातात. म्हणजे शून्य किंमतीत म्हणजेच फ़ुकटाच्या बरोबरीनेच शेतमाल हडपला जातो, हे गणीतीय सत्य सर्वांनीच स्विकारायला हवे. शेतीतील गरिबी संपवण्यासाठी शेतमालाचे उत्पादन खर्च भरून निघतील एवढे भाव मिळण्याखेरीज अन्य कुठलाही मार्गच अस्तित्वात नसल्याने शेतमाल स्वस्तात मिळाला पाहिजे, अशी मानसिकता आता ग्राहकांनीही बदलणे, काळाची गरज आहे.

– गंगाधर मुटे

(’जनशांती’नाशीक, दिवाळी अंकात प्रकाशित लेख)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

औंदाची शेती – २०१५

औंदाची शेती – २०१५

               १९-०६-२०१५
भल्याभल्यांचे, थोरामोरांचे सारे अंदाज वावटळीत उडवून यंदा पावसाने शेतीस योग्य अशी दमदार सुरुवात केली आहे. धोंड्याचे वर्ष (अधिकमासाचे) शेतीसाठी अनुकूल असते असा पारंपारिकपणे शेतकर्‍यांनी बाळगलेला समज खरा ठरावा, अशी आशादायक स्थिती आजच्या दिवसापर्यंत तरी खरी ठरली आहे.
औंदाची शेती

झिजत़ात रोज येथे, तिन्ही पिढ्या तरी पण;
दारिद्र्य-अवदसेच्या विळख्यात कास्तकारी

 *****************************************

औंदाची शेती

 

कपाशीची लागवड करण्याचा दिवस उजाडला आणि आपल्या लहानसान मुलाबाळासह शेतकरी आपल्या कर्तव्याला तत्पर झाला.
बालमजुरी कायद्याचं आमच्या लेकराबाळांना संरक्षणही नाही.
आणि
शेतकर्‍याची लहान लेकरं शेतावर राबली तरी शेतकर्‍यांचं काही वाकडं करण्याची ऐपतही कायद्यात नाही.
 (त्यांना स्वस्तात शेतमाल पाहिजे ना? मग शेतकर्‍याची मुलं शेतात फ़ुकटात काम करत असेल तर ते सार्‍यांना हवेहवेसेच आहे.)
*****************************************

औंदाची शेती

पेरते व्हा!
पेरते व्हा!
*****************************************

औंदाची शेती

 याला आमचेकडे फ़साटी म्हणतात.
तुमच्याकडे काय म्हणतात.
शेतकी पुस्तकात याला काय पर्यायी शब्द आहे?
*****************************************

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन

नमस्कार मित्रहो,

        आज माझ्या “वाङ्मयशेतीचा” ४ था वर्धापनदिन. मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, सकाळी ८.२९ वाजता http://www.baliraja.com आणि http://www.gangadharmute.com संकेतस्थळाचा शुभारंभ करण्यात आला.
      मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे या दोन्ही संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

पिढ्यान्-पिढ्यापासून शेतकर्‍यापर्यंत जो-जो आला तो-तो शेतकर्‍याला सल्ला द्यायला किंवा अक्कल शिकवायलाच आला. एका दाण्यातून हजार दाणे निर्माण करणार्‍याला शुद्र व बेअक्कल गाढव समजून त्याला कोणी बोलुच दिले नाही, त्याचे ऐकण्याची तर गोष्टच दूर…! सर्व मुद्रीत आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे शेतीच्या शोषणाची समर्थकच असल्याने त्याला प्रसारमाध्यमात स्थान मिळाले, तेही नगण्यच. पण आता इंटरनेट शेतकर्‍यांचा मदतीला आलंय. या माध्यामाने सर्वांना एक जागतिक दर्जाचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय.

नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. एका सार्वजनिक संकेतस्थळावर १-२ लेख लिहिल्या नंतर तेथे घमासान चर्चायुद्ध झ इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही. माझ्या आंतरजालावरील वावराला आता उणेपुरे साडेपाच वर्ष होत आहेत.या साडेपाच वर्षात माझे शेतीविषयक लेखन २० लाखापेक्षा जास्त  वाचकापर्यंत पोचले आहे, ही फ़ार समाधानाची बाब आहे.

     मी आंतरजालावर लेखन सुरू केले तेव्हा मला स्पष्ट जाणीव होती की मी ज्यांच्यासाठी लिहिणार आहे तो आंतरजालावर उपस्थित नाही. तो आपल्या शेतात घाम गाळत शेतीकाम करण्यात गुंतलेला आहे आणि जो आंतरजालावर उपस्थित आहे तो बहुतांशी बिगरशेतकरी आहे. सातबारा नावाने असणे आणि प्रत्यक्ष शेतीवर पोट असणे या दोन वेगवेगळ्या अवस्था आहेत. दोन्ही अवस्थांचे हितसंबंध जवळजवळ परस्पर विरोधी आहेत. शहरात अथवा खेड्यात राहून शासकिय, निमशासकीय, खाजगी कंपंन्यामध्ये नोकरी करणारा अथवा व्यापार, उद्योग करणारा शेतकर्‍याचा मुलगा असला तरीही त्याला सुध्दा बिगर शेतकरी समाजासारखेच एका रुपयाला चार किलो कांदे, एका दिवसाच्या वेतनात वर्षभर कुटुंबाला पुरेल एवढे अन्नधान्य मिळाले तर हवेच असते. शेतीत पिकणारा माल स्वस्तात स्वस्त मिळवणे हा आपला निसर्गदत्त अधिकार आहे, हीच त्याचीही मनोभावना असते.
     अशा विपरित स्थितीत शेतमालाच्या रास्त भावाला मध्यवर्ती स्थानी ठेवून केलेले लेखन फ़ारसे पसंत केले जाणार नाही, याची मला खात्री  होती पण माझे लेखन पसंत केलेे जाते किंवा नाही यापेक्षा शेतकर्‍यांचे गार्‍हाणे आणि शेतीचे अर्थकारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणे जास्त महत्वाचे आहे, माझे लेखन केवळ लेखन नसून प्रबोधनयज्ञ असणार आहे, याचीही मला जाणीव असल्याने माझा वैचारिक किंवा भावनीकगोंधळ उडाला नाही. त्यामुळे माझ्या लेखनाचे समर्थन आणि टीका मला स्थितप्रज्ञपणाने स्विकारता आल्या.   या प्रवासात माझ्या gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला २०१० आणि २०१२ चा सलग दोनदा स्टार/एबीपी TV चा विश्वस्तरीय “ब्लॉग माझा” पुरस्कार मिळाला.

माझा साडेपाच वर्षाचा लेखाजोखा :-

माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या खालीलप्रमाणे :-

०१) http://www.baliraja.com  बळीराजा डॉट कॉम – (२,८५,७१०)

०२) http://www.gangadharmute.com   माझी वाङ्मयशेती – (२,७५,८४२)

०३) gangadharmute.wordpress.com – रानमोगरा – (८८,४००) – सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.

०४) www.sharadjoshi.in – योद्धा शेतकरी – ( ७३,०२५)

०५) baliraja.wordpress.com – बळीराजा – ( ८३,३३८ )

०६) gangadharmute.blogspot.com – शेतकरी विहार – ( ३६,९४७ )

०७) gangadharmutespoem.blogspot.in – माझी कविता – (१६,६३४)

०८) marathigazal.wordpress.com – माझी मराठी गझल – ( १६,९११ )

०९) shetkari-sanghatana.blogspot.com – शेतकरी संघटना – (६,७९६)

१०) ranmewa.blogspot.in – रानमेवा – (३,५२२)

एकूण वाचन संख्या – ८,८७,०९७

खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही. मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे उघड आहे.

०१) www.facebook.com/gangadharmute

०२) www.youtube.com/gangadharmute

०३) www.shetkari.in

०४) sharad-anant-joshi.blogspot.in

०५) www.twitter.com/gangadharmute

०६) www.facebook.com/groups/kawita

०७) www.facebook.com/my.net.farming

०८) www.facebook.com/groups/baliraja

०९) www.maayboli.com/user/26450/created

१०) www.misalpav.com/user/8199/track

११) www.mimarathi.net/user/382/mytrack

१२) www.sureshbhat.in/user/1099/track

      एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

Thank you Mr Internet!

– गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १

स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही – भाग १


              “येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही” अशी उद्‍घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट “पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल,” असा आकाशवाणी/दुरदर्वशनर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे, अशी स्थिती आहे.

             एकदा तर “पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले – शेतकरी चिंताग्रस्त” असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.

           आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.

       कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या  संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेती करणारा प्रत्येक शेतकरी हा त्याच्या शेतीपुरता हवामान शास्त्रज्ञच असतो. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो असे त्याने वर्नुषावर्षे अनुभवातून हवामानाचे दर्शन घेतलेले, त्यामुळे त्याचा या बाबीवर विश्वास असतो. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधिक विश्वासाहार्य नक्कीच असतात.

        हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.

        पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.

मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:

१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
———————
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
———————
३) foreca
http://www.foreca.com
——————-
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
——————
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
———————–
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
———————–
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
——————————-
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
——————————–

        यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असतात. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.

         या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्‍याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास “शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस” असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. “पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे” हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशाचाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत? एवढा तरी विचार करायला आपण शिकणार आहोत की नाही?
            मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
        हवामानशास्त्राच्या बाबतीत आपण इतर देशांपेक्षा शेकडो वर्षांनी मागे आहोत, हे दिसतेच आहे. हरकत नाही पण; इतर देशांच्या पुढे जाण्याचा, बरोबरी करण्याचा किंवा महाशक्ती बनण्याचा मुद्दाही सोडा, शेतीला थोडाफ़ार हातभार लागेल  एवढे तरी हवामानशास्त्र विकसित करण्यासाठी आमचे शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि वेळोवेळी निव्वळ पुस्तकी ज्ञानाच्या आधारे शेतीविषयात नको तेव्हा, नको ती लुडबुड करणारी विद्वान मंडळी काही हातपाय हालवणार आहेत की नाही, हाच कळीचा मुद्दा आहे.

      स्वातंत्र्योत्तर भारतातील शास्त्रज्ञ, सत्ताधारी आणि पुस्तकी ज्ञानाच्या महामेरू विद्वान मंडळींना स्वातंत्र्याचे हवामान मानवणार नाही, याचा अदमास जर महात्मा गांधींना जर तेव्हा आला असता तर त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला असता किंवा नाही, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

( क्रमश: )
पूर्वप्रकाशित दि : 22/07/2011
                                                                                                                  – गंगाधर मुटे
—————————————————————————————————————-

अच्छे दिन आनेवाले है – १


अच्छे दिन आनेवाले है – १

सारा देश म्हणतो, मोदी आलेत ना! अच्छे दिन आनेवाले है.

.
.
मात्र, अच्छे दिवस कुणाला येतील हे समजून घेण्यासाठी येणार्‍या पुढील दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. चित्र स्पष्टच आहे.
– कदाचित कांदा आणखी स्वस्त होईल. खाणारा खिदळणार आणि पिकवणारा बोंबलणार.
– आमच्या मायमाऊलीची चूल फ़ुंकायची स्थिती काही बदलणार नाहीये. गॅस वापरणाराला आणखी सबसिडी दिली जाईल पण …
.
आमच्या मायबहिनी सरपण गोळा करायला, डोईवर मोळी वाहायला आणि शेवटी चूल फ़ुंकायलाच जन्माला आल्या, असाच बुद्धीवाद्यांचा आणि राज्यकर्त्यांचा दृढ समज आहे. आणि यातून सुटका आणि यावर सबसिडी कालही नव्हती … उद्याही नसणार आहे.
.
आगामी काळात असेच काहिसे चित्र बघायला मिळेल. 
आणि ज्यांच्या हाती लेखनी, माईक ते म्हणतील……
अच्छे दिन आनेवाले है…..! 

*    *    *    *

विकास म्हणजे नेमके काय हो?
विकास म्हणजे औद्योगीक आणि तत्संबंधी विकासच ना?
कॉंग्रेसवाल्यांनी शेतीतील कच्चा माल लुटून औद्योगीक विकास केला.
नवे सरकार सुद्धा हेच करणार की वेगळे काही करणार?

*    *    *    *

 “पुरेशी मजुरी नसणे” आणि “अन्नधान्य स्वस्त असणे” यामुळे असंघटीत कामगार क्षेत्रात काम न करण्याची वृत्ती बळावत चालली व शेतीमध्ये मजूर मिळणे कठीण होत चालले. वेठबिगाराप्रमाणे किंवा कमी मोबदल्यात घाम गाळायला तयार न होणे, हे तसे चांगलेच लक्षण मानावे लागेल. ज्या दिवशी शेतकरी शेतीत काम करणे थांबवतील किंवा स्वत:पुरतेच पिकवेल, वरकड पिकवणार नाही, तो दिवस शेतीला सुबत्ता आणण्यासाठीचे पहिले पाऊल पडणारा पहिला दिवस ठरेल. तो दिवस लवकर यावा. (पण तसा दिवस कधिही येण्याची शक्यता नाहीये.)

*    *    *    *

सर्वांच्या जिभांचे चोचले पूर्ण करण्याची आणि सर्व भुकेल्या पोटांना भरपेट खाऊ घालण्याची जबाबदारी जर शेतकर्‍यांनी घ्यायची असेल तर शेतकर्‍यांच्या जीवनात दोन दिवस सुखाचे यावे, अशी सदिच्छा बाळगायला “खाणार्‍यांच्या” बापाचे काय जाते? निदान त्याच्या कमरेचे धडूते पळवायचे नाही, एवढी “अक्कल” तरी बिगरशेतकरी जनतेला केव्हा येणार?

दोन वर्षापूर्वी कांदा महाग झाला तेव्हा पाकिस्तान मधून कांदा आयात केला होता. तो राहूल गांधी, सोनिया गांधी, मनमोहनसिंग, अडवाणी, मोदी, मोहन भागवत, उद्धव ठाकरे आणि डावे-उजवे यांनी “सर्वानुमते” गोड मानून खाल्लाच होता ना?

निदान पाकिस्तानचा कांदा पाकनिष्ठ आहे म्हणून त्याला नाकारणारा या देशात एकसुद्धा स्वदेशीप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी “मायचा लाल” जाहिररित्या पुढे का आला नसावा?

शेवटी “शेतकर्‍यांचे मरण हेच राज्यकर्त्यांचे धोरण” हेच खरे असते ना?

                                                                                                                      – गंगाधर मुटे 
*    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *    *
(तीन वर्षापूर्वीची एक गझल)

Onion

*    *    *    *

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

माझ्या वाङ्मयशेतीचे १२०० दिवस

नमस्कार मित्रहो,

                 आज २७ फेब्रुवारी, कवीवर्य कुसूमाग्रजांचा जन्मदिवस. हाच दिवस “जागतीक मराठी भाषा दिवस” म्हणून पाळला जातो. योगायोगाने आज माझ्याही आंतरजालावर वावरण्याला १२०० दिवस पूर्ण होत आहे.

                नोव्हेंबर २००९ मध्ये मी अकस्मात आंतरजालावर आलो. आंतरजालावर १-२ लेख लिहिल्या नंतर इंटरनेटसुद्धा शेतकर्‍यांसाठी चांगले व्यासपीठ ठरू शकते, याची जाणिव झाली. एका क्लिकमध्ये आपले विचार सातासमुद्रापल्याड जगाच्या कानाकोपर्‍यात पोचू शकते, जगभरातील मराठी माणसांशी आपण संवाद साधू शकतो; या बाबींनी माझ्यावर एवढी भूरळ घातली की मी मग मागे वळून पाहिलेच नाही.

                मायबाप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माझी वांगेमय/वांगंमय शेती तोट्यात गेली असली तरी मायबाप इंटरनेट आणि रसिकांच्या कृपेने माझ्या वाङ्मयशेतीला मात्र चांगले भाव मिळत आहेत, हे संकेतस्थळावरील वाचक/वाचनांच्या संख्येवरून निर्विवाद सिद्ध व्हायला लागलेलं आहे.

मागील १२०० दिवसांचा लेखाजोखा :-

माझे संकेतस्थळ/ब्लॉग आणि कंसात वाचने/वाचकांची संख्या.

०१) gangadharmute.wordpress.com – माझी वाङ्मयशेती – (६३,९६५) –
                                                                             सलग दोनदा स्टार/एबीपी ब्लॉग माझा पुरस्कार प्राप्त.

०२) www.baliraja.com – बळीराजा डॉट कॉम – ( ५७,३९० ) 

०३) www.sharadjoshi.in – योद्धा शेतकरी – ( ३१,०७०)

०४) baliraja.wordpress.com – बळीराजा – ( २५,८०६  ) 

०५) gangadharmute.blogspot.com – शेतकरी विहार – ( १२,५०३ ) 

०६) gangadharmutespoem.blogspot.in – माझी कविता – (१४,५७२)

०७) marathigazal.wordpress.com – माझी मराठी गझल – ( ५,९०४ ) 

०८) shetkari-sanghatana.blogspot.com – शेतकरी संघटना – (३,२२५)

०९) ranmewa.blogspot.in – रानमेवा – ( २८०४ )
खालील संकेतस्थळावरील लेखन वाचकांची एकूण संख्या उपलब्ध नाही.
मात्र ती सुद्धा काही लाखाच्या घरातच असणार हे स्पष्ट आहे.

                एकूणच शेतीसाहित्य वाचनाबाबत असलेली वाचकांची उदासिनता आणि मुद्रित शेतीसाहित्याला दुर्मिळ असलेला नागरी वाचकवर्ग हा आजवरचा इतिहास लक्षात घेतला तर आंतरजाल हे शेतीविषयासाठी फार मोठे व्यासपीठ ठरू शकेल, याबद्दल आता माझ्यामनात तिळमात्रही शंका उरलेली नाही.

                                  Thank you Mr Internet!


                                                                                          – गंगाधर मुटे
—————————————————————————————–
Facebook
—————————————————————————————–

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका

कोण जाणे कोणासंग टाका भिडून व्हता…।
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

जवा पाय कसाबचे मुंबईमंधी पडले
“लालबत्ती” वाले तमाम घरामंधी दडले
तवा म्हणान माहा पारा असा काही चढला
दोन ढूशे मारून त्याले तोंडबुचक्या पाडला
पायापोटी तवा कसाब माह्या पडत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

सुराज्याचं सपन जवा शिवाजीले पडलं
इचिबैन तवा मले जाम स्फ़ूरण चढलं
मंग म्हणान माही तलवार अशी काही चालली
एका हिसक्यात सारी सेना धारातिर्थी पाडली
चूलीमागं औरंगजेब जीव लपवत व्हता… ॥
अन्
सपनातून जाग आली तं पलंग मोडून व्हता… ॥

रावणानं सीता चोरून लंकेमंधी नेली
तळपायीची आग माह्या मस्तकात गेली
तोडून त्याचे नऊ मुंडके, मी संग घेऊन आलो
पण; तवापासून मीच “अभय” दहातोंड्या झालो
काय करू, काय नाही; मले समजत नाही आता
अन्
सपनातून जाग आली तं घाम फ़ुटून व्हता… ॥

                                                  – गंगाधर मुटे
———————————————————