गाय,वाघ आणि स्त्री


गाय,वाघ आणि स्त्री

                     मुंबईच्या अभिव्यक्ती ग्रंथ न्यास या संस्थेतर्फे नुकताच “गझल : सुरेश भटानंतर” हा गझलेचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. अभिव्यक्ती ग्रंथ न्यास ही समग्र मराठी गझलेच्या उत्कर्षासाठी झटणारी जनमान्यता पावलेली संस्था. कविवर्य स्व. सुरेश भटानंतर जे गझलकार झालेत त्यांच्या निवडक गझलांचा या ग्रंथात समावेश करण्यात आला असून या ग्रंथात माझ्या तीन गझलांचा सुद्धा समावेश करण्यात आलेला  आहे. मी गझल लिहायला लागल्यापासून आजपर्यंत काही दिग्गज गझलकारांनी मी गझलेमध्ये जसा आशय व्यक्त करतो, तो गझलियतशी मेळ खात नाही, असे म्हणून माझ्या गझलेला कमी लेखण्याचा जो प्रकार केला, त्या पार्श्वभूमीवर माझ्या गझलांचा या संग्रहात समावेश झाल्याने माझ्या गझलेतील ग्रामीण आशयाला या निमित्ताने जनमान्यतेची अधिकृत पावतीच मिळाली आहे.

                     दोन वर्षापूर्वी मराठी गझल या काव्यप्रकाराशी माझी पहिल्यांदा ओळख झाली. कवितेपेक्षा गझल हा काव्यप्रकार पूर्णपणे भिन्न असतो. लयबद्धता हा गझलेचा प्राण असतो. तंत्रशुद्धतेच्या चौकटी काटेकोरपणे सांभाळूनच गझल जन्माला येते. मुक्तछंद किंवा छंदमुक्ततेला गझलेत काहीही स्थान नसते. वेगवेगळ्या तर्‍हेचे पाचपेक्षा जास्त विषय एकाच रचनेत प्रभावीपणे हाताळण्यासाठी गझलेसारखा दुसरा पर्याय असूच शकत नाही. ह्या गोष्टी माझ्यावर एवढा मोठा प्रभाव पाडून गेल्यात की मला गझल या काव्यप्रकाराचे अक्षरशः वेड लागले आणि मी गझलेच्या प्रेमात पडलो.

                     गझल लिहिणे हे थोडे कलाकुसरीचेच काम असते. काव्य स्फुरले तर कविता लिहिली जाऊ शकते, गझल लिहिली जाऊ शकत नाही. गझल हा तसा कृत्रिमरीत्या काव्य हाताळण्याचा प्रकार आहे. स्फ़ूर्तीमुळे एखाद्या लयबद्ध शेराची किंवा मतल्याची निर्मिती होऊ शकेल; पण उर्वरित चार किंवा त्यापेक्षा जास्त शेर मात्र मतल्यात निश्चित झालेल्या जमिनीला म्हणजे बहर (वृत्त), काफ़िया (यमक)  आणि रदीफ (अंत्ययमक) अनुसरून जाणीवपूर्वकच रचावे लागतात. मी तसा गझलेचा अभ्यासक किंवा फारसा वाचकही नाही; पण ज्या काही गझला माझ्या वाचण्यात आल्या त्यात ग्रामीण सुखदु:खाचे पदर असलेली गझल मला आढळलीच नाही. शेती आणि शेतकरी या शब्दांचा गझलेशी दूरान्वयानेही संबंध मला तेव्हाही आढळला नाही, आजही आढळत नाही. अरबीतून फारसीत व फारसीतून उर्दू भाषेत दाखल झालेला हा काव्यप्रकार आता सर्वच भारतीय भाषांत दाखल होऊ पाहत आहे. मराठी भाषेतही गझल हा काव्यप्रकार बर्‍यापैकी रुजलेला आहे. सर्वसाधारणपणे “शराब आणि शबाब” याविषयाभोवतीच पिंगा घालणार्‍या पारंपरिक गझलेला मराठी गझलेने फाटा देऊन सामाजिक आशयाची झालर दिली असली तरीसुद्धा विशिष्ट साचेबंद आशयाच्या बाहेर पडून मराठी मातीचा सुगंध पुलकित करण्यार्‍या आशयाकडे झेप घ्यायची उत्कंठा मराठी गझलेत अजूनही जागृत झाल्याचे जाणवत नाही. ज्या देशातला बहुसंख्य समाज अनादीकाळापासून शेती याच एकमेव व्यवसायावर गुजराण करीत असला आणि स्वतः अर्धापोटी राहून इतरांना पोटभर जेवू घालत असला तरी शेतीक्षेत्राचे वास्तववादी चित्र प्रतिबिंबित करण्यात जिथे संपूर्ण साहित्यक्षेत्रानेच शेतीक्षेत्राची उपेक्षा केली तिथे नवख्या मराठी गझलेला दोष देण्यात अर्थ नसला तरी या दिशेने पाऊल टाकण्याचे प्रयत्न न होणे, ही मात्र साहित्यक्षेत्राला फारशी शोभादायक बाब खचितच नाही. गझलेला शेतीच्या बांधवर आणून सोडायचे असेल तर त्यासाठी कोणीतरी गझलकार पुढाकार घेईल याची वाट पाहात बसण्यापेक्षा आपणच गझल लिहिण्याचा प्रयत्न का करू नये? अशी माझी भावना झाली आणि मी गझल लिहायचे ठरवले.

                     मी गझल लिहायचे ठरविले तेव्हा तंत्रशुद्धता आत्मसात करणे ही अभ्यासाने साध्य करण्यासारखी बाब आहे, याची मला जाणीव होती. मुख्य प्रश्न होता आशयाचा. आलंकारिक भाषेत शारीरिक प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी गझल लिहिणे हा माझा प्रांत नव्हता. तरुण, तरुणी, प्रेमरस, प्रेमभंग किंवा तिचा गजरा, तिच्या नजरा, तिचे चालणे, नटकणे, लचकणे, गालात खळी पडणे या विषयावर एवढ्या गझला लिहिल्या गेल्या आहेत की मी आणखी पुन्हा याच विषयावर गझल लिहावी असे मला वाटत नाही. आधीच कुण्यातरी गझलकाराने लिहिलेल्या ओळींची मोडतोड करून किंवा शब्दांची अदलाबदल करून शेर किंवा गझल रचायची आणि ती आपल्या नावावर खपविण्यासाठी लागणार्‍या वृत्तीची माझ्याकडे वानवा आहे. शिवाय शेती आणि ग्रामीण जीवन हाताळता येत नसेल तर गझल लिहायची हौस तरी कशासाठी बाळगायची? हा मला पडलेला प्रश्न.


                     
गझलेतील लयबद्धता, वृत्ताची हाताळणी, यमकाचे नादमाधुर्य आणि एकाच गझलेत पाचपेक्षा जास्त वेगवेगळे विषय हाताळायची संधी, हे गझलेने मला वेड लावण्याचे मुख्य कारण होते. त्यामुळे गझल लिहिण्याचा मोह काही केल्या टाळताही येईना. शेवटी ठरले की आपण जे काही लिहायचे, ते शेतीविषयाला अनुसरूनच लिहायचे. गझलेतील आशयाच्या प्रांतात सुद्धा चिरयौवणी ललनेचे मोहक डोळे किंवा शरीरसौंदर्य प्रकटीत करणार्‍या अवयवाऐवजी आपल्याच शेतातील वांगे, टमाटर, आंबे, चिक्कू, पेरू, गाय, बैल, वासरू इत्यादींना सोबत घेऊन गझलप्रातांत शिरायचे. निर्णय झाला आणि लेखनी उचलली. पहिल्याच प्रयत्नात थोडीशी सूट घेतलेली आनंदकंद या वृत्तातील माझी पहिलीवहिली गझल आकारास आली…. 

गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

फुलल्या फुलास नाही, थोडी तमा कळींची
एका स्वरात गाणे, साथीत गात नाही.

रंगात तू गुलाबी, रूपात का भुलावे
वांग्या तुझ्या चवीला, मुंगूस खात नाही.

खांद्यास नांगराचा का भार सोसवेना ?
प्राशू नको विषा रे, देहास कात नाही

अभयात वाढलेली, वाचाळ राजसत्ता
राजा पहूडलेला, राजत्व ज्ञात नाही.

                     ही गझल सहा संकेतस्थळावर प्रकाशित केल्यावर रसिकाकडून जोरदार स्वागत झाले. पहिलीच गझलरचना असल्याने कौतुकही झाले पण; दबक्या आवाजात का होईना, भाषाशुद्धता व तंत्रशुद्धतेतील दोन निकष पाळले गेले नसल्याची खंतही व्यक्त झाली. देण्या ऐवजी देण्यास आणि जोजविण्या ऐवजी जोजविण्यास असे असायला हवे होते आणि तसे केले तर वृत्त बिघडणार होते. दुसरा मुख्य नियम असा की, मतल्याच्या किंवा शेराच्या पहिल्या ओळीत विषयाची प्रस्तावना व दुसर्‍या ओळीत पहिल्या ओळीत जी प्रस्तावना व्यक्त झाली असेल तिचा प्रभावी समारोप असायला हवा. शेरातील दोन ओळींचा परस्पर संबंध असायलाच हवा. त्यामुळे 


गायीस अभय देण्या, वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या, सूर्यास हात नाही.

                     हा मतला डोक्यावरून डोक्यावरून गेल्याच्या किंवा काहीही अर्थच लागत नसल्याच्या प्रतिक्रिया उमटल्यात. त्या निमित्ताने थोडक्यात या मतल्या मागची पार्श्वभूमी उलगडण्याचा मी प्रयत्न केला. माझ्या मते त्या मतल्याचा अर्थ खालीलप्रमाणे असू शकतो.


बाईत आणि गायीत मला नेहमीच एक साम्य आढळत आले आहे.
दोघीही शारीरिक अंगाने अबलाच. स्वबळावर स्वसंरक्षणास असमर्थ.
निसर्गाने सर्व सजीवांना नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत स्वबळावर स्वसंरक्षण करून प्राण वाचविण्यासाठी काही जन्मजात काही ‘हत्यारे आणि ढाली’ दिल्या आहेत.
उदाहरणार्थ, उंदराला बिळात घुसता येते, मांजरीला बिळात घुसता येत नाही त्यामुळे उंदराचे रक्षण होते.
याच अर्थाने मांजरीला भिंतीवर चढता येते, कुत्र्याला भिंतीवर चढता येत नाही.
या झाल्या उंदीर आणि मांजरीच्या स्वसंरक्षणाच्या ढाली.
याच प्रमाणे आपल्या दात आणि नखांचा वापर करून कौशल्याने अन्न मिळविण्यासाठी उपयोग करणे हे झाले उंदराचे हत्यार.
त्याच प्रमाणे मांजर शिकार मिळविण्यासाठी ज्या ज्या अवयवांचा वापर करते ते झाले मांजरीचे हत्यार.
मुद्दा अधिक स्पष्ट होण्यासाठी २-३ उदाहरणे बघूयात.
हरणाला वाघ-सिंहापेक्षा आणि सशाला त्याच्या शत्रूपेक्षा अधिक वेगवान वेगाने पळता येते.
माकडाला झाडावर चढता येते. मोराला बचावापुरते उडता येते.
मुद्दा एवढाच की बचावासाठी सजीवाकडे नैसर्गिकरीत्या हत्यार/ढाल/कौशल्य यापैकी काहीतरी नक्कीच आहे.
मात्र मानव जात आणि त्याचे बहुतेक पाळीव प्राणी यांचेकडे निसर्गत: यापैकी काहीही नाही.
निदान मानवाकडे बुद्धी आणि साधने बनविण्याची कला तरी आहे.
मानवाने बुद्धीचा वापर करून साधने बनविली आणि त्या साधनांचा हत्यारासारखा उपयोग करून संपूर्ण सजीव सृष्टीवर हुकुमत मिळविली. हातात साधन नसेल तर मानवाएवढा दुर्बल कोणीच नाही. विनाहत्याराने मनुष्य साध्या मधमाशीसोबत सुद्धा लढू शकत नाही. साधनविरहीत माणसाला, कावळासुद्धा पराजित करू शकेल.
पण गायीचे काय? गाय पूर्णतः संरक्षणासाठी मानवावर अवलंबून.
कल्पना करा. (कल्पना काय फक्त कवींनीच करायच्या? आणि रसिकांनी फक्त टाळ्या वाजवायच्या?)
कल्पना करा की जर उद्या मानवाला गाय निरूपयोगाची आणि परवडेनाशी वाटली तर माणूस गायीचा त्याग करणार. कारण नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभावच.
गायीवरचे प्रेम, भूतदया वगैरे दिखावाच. जर तसे नसते तर गाय फक्त शेतकर्‍यांच्याच दारात नसती दिसली.
गाय दिसली असती कलेक्टर, मंत्रालय, राजकीय पक्षांची कार्यालये वगैरे ठिकाणी गाय बांधलेली आढळली असती आणि सकाळी उठून कलेक्टर शेण सावडतांना आणि मुख्यमंत्री दूध काढताना आढळले असते.
मग नकोशा गोष्टीचा बिनदिक्कत त्याग करणे हा मूलभूत मानवी स्वभाव असलेल्या माणसाने गायी पाळणे बंद केले तर काय होईल? गायीचे काय होईल?
वाढत्या यांत्रिकीकरणाने बैलांची गरज संपत चाललेली.
दुधाच्या किंमती आवाक्यात आहे तोपर्यंत ग्राहक दूध पिणार.
यदाकदाचित दुधाचे भाव ५०० रु. प्रतीलीटर झालेत तर निव्वळ गायीच्या प्रेमापोटी दूध खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या किती?
जर अशी स्थिती उद्भवली आणि दुधाचा धंदा न परवडणारा झाला तर कोणी कशाला गायी पाळतील? मग अशा विपरीत परिस्थितीत माणूस गायीचा त्याग करणारच.
मग गायीचे काय होईल? कशी जगेल बिचारी?
जंगलात ती शत्रूपासून स्वसंरक्षण करू शकत नाही कारण गायीला ना बिळात घुसता येत, ना झाडावर चढता येत, ना हवेत उडता येत, ना अती वेगाने पळता येत. शत्रुशी दोन हात करायला ना दात ना नखे, ना हत्तीसारखे शक्तिशाली सोंड.
शेपटी आणि शिंगांची ताकत व धार उत्क्रांतीच्या प्रवाहात क्षीण झालेली.
मग ती स्वबचाव कशी करेल?
तेव्हा तिला तिच्या संरक्षणार्थ गरज पडेल एका बलशाली सहकार्‍याची. मग तो सहकारी कोण?
गायीला जेवढे नैसर्गिक शत्रू आहेत त्या सर्वांना पराभूत करून गायीला जीवदान, अभय देण्याची शक्ती केवळ सिंह, वाघापाशीच. सिंह, वाघाशिवाय गायीचे रक्षण कोणीच करू शकत नाही.
आणि नेमकी येथेच बंडी उलार होते.
जो गायीचे रक्षण करू शकतो तोही तिचा शत्रूच.
गाय वाघाकडे अभय मागण्यास गेली तर वाघोबा तिला अभय देण्याऐवजी तिच्यामध्ये आपले खाद्य शोधणार.
भूक शमविण्याची वस्तू या नजरेने पाहणार.
ज्याच्याकडे आश्रयाला जावे तोच काळशत्रू ठरणार.
कारण..
वाघाकडे जे दात आहेत ते गायीला खाण्यासाठीच…
तिचे प्राण वाचवू शकेल, अभय देऊ शकेल, असे दात वाघाजवळ आहेतच कुठे?
ज्याच्याकडून रक्षणाची अपेक्षा केली जाऊ शकते तोच जर भक्षक ठरणार असेल तर………….
म्हणून गाय आणि स्त्री या दोघीत याच अनुषंगाने विचार केला तर दोघींच्याही व्यथा सारख्याच वाटतात मला.

”गायीस अभय देण्या,वाघास दात नाही
रजनीस जोजवीण्या,सूर्यास हात नाही.”

                                                                                                                            – गंगाधर मुटे
—————————————————————————————————

जात्यावरची गाणी

जात्यावरची गाणी

झपाट्याने काळ पालटला आणि जातं, पाटा व वरूटा काळाच्या पडद्या आड गेला. डिझेल-विद्युतवर चालणारी चक्की,पीठ गिरणी आली आणि जात्यावर दळणाची गरजच संपून गेली.
तसा तो काळ फ़ार जुना नाही. अगदी १९८० पर्यंत ग्रामीण भागात दळणासाठी ’जाते’ हेच प्रमुख साधन होते. महिलांच्या कष्टात भर घालणारे पण त्यानिमित्ताने दळतांना ओव्या गाऊन आपल्या मनातल्या भावनांना मोकळी वाट करून देणारे.
जात्यावरच्या गाण्यांना साहित्यिकमूल्य नसेलही पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी ती ही की,
फ़िरत्या जात्याला स्वत:ची अशी एक लय आणि नाद असतो, त्यामुळे कोणतेही गाणे, कोणत्याही चालीत म्हणत दळण दळणे शक्यच नाही. त्यासाठी ठराविक ठेका पकडणारेच शब्दच लागतात. ठराविक घाटणीचेच गीत हवे असते. अशी गीते कवी किंवा गीतकारांनी लिहिली नाहीत म्हणून आमच्या मायमाऊल्या त्यासाठी थांबल्या नाहीत.
कवी, गीतकार आणि संगीतकाराची भूमिका त्यांनीच चोख पार पाडली आणि ……
आणि घराघरात आकारास आले जात्यावरचे गाणे.
काही येथे दिली आहेत, बाकी यथावकाश देण्याचा प्रयत्‍न आहेच.

१) मायबापानं देल्ल्या लेकी,
वाटच्या गोसायाले
नित पलंग बसायाले

२) मायबापानं देल्ल्या लेकी,
नाही पाहिली जागाजुगा
लेक लोटली चंद्रभागा

३) मायबापानं देल्ल्या लेकी,
नाही पाहिले घरदार
वर पाहिला सुंदर

४) आली दिवाळी दसरा,
मी माहेरा जाईन
बंधु-भावाले ओवाळीन

५) माझं जातं पाटा आहे,
जन्माचा इसरा
मला भेटला भाग्यवंत सासरा

(संकलन : गंगाधर मुटे)
…………………………………..

झिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी

झिलपी बाई झिलपी : भुलाबाईची गाणी

झिलपी बाई झिलपी
झिलपी बसली नाहाले
शंकर गेले पाहाले
असे शंकर भ्याले
फ़ूलं वेचत गेले
फ़ुलात पडली अंबाई
नाव ठेवले भिमाई
भिमाईच्या टोपल्या
ठाई ठाई गुंफ़ल्या
एक ठाई हारपली
मामा घरी सापडली
असे मामा चोर
खिडकी आंबा गोड
खिडकी आंबा कोणाचा
रघुजीच्या राणीचा
रघुजीची राणी
भरत होती पाणी
मागून सुटली वेणी
धावा धावा कोणी
धावन तीचे धनी
धनी गेले ताकाले
इच्चू डसला नाकाले.

(संकलन : गंगाधर मुटे)

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाईचे सासरे कसे?

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा

भुलाबाई भुलाबाई भासरे कसे गं भासरे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वंयपाकीन जशी गं स्वंयपाकीन जशी

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकडया सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे

(संकलन : गंगाधर मुटे)

एकच पापड भाजला : हादग्याची गाणी

एकच पापड भाजला : हादग्याची गाणी

एकच पापड भाजला,भाजला
चुलीमागे ठेविला,ठेविला
सासुबाईने पाहीला,पाहिला
कोरा कागद लिहिला,लिहिला
झुनझुन गाडी जुंतली,जुंतली
त्यात मैना बैसवली,बैसवली
काऊन मैना कोमावली,कोमावली
माहेराला पाठवली,पाठवली.

(संकलन-गंगाधर मुटे)

या या भुलाबाई : हादग्याची गाणी

या या भुलाबाई : हादग्याची गाणी

(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.

(२)

या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात लाल चोळी
लाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडला बुक्का
भुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.

(संकलन-गंगाधर मुटे)

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण : हादग्याची गाणी

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून

‘आई मला साप दे आणून, त्याचा चाबूक दे करून’
“असलं रे कसलं बाळा, तुझं जगाच्या वेगळं”

कृष्ण घालितो लोळण
आली यशोदा धावून
काय रे मागतोस बाळा
तुला देते मी आणून….

(शिरिष “मायबोलीकर यांचे सौजन्याने)

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा : हादग्याची गाणी

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडूदे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी
पारवत गुंजे गुंजावाणी
गुंजावाणी —च्या सारविल्या टिका
आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा (हे चाल बदलून)
कांदा चिरू बाई तांदूळ घ्या
आमच्या आया, तुमच्या आया
खातील काय दुधोंडे
दुधोंड्याची वाजली टाळी (हे म्हणताना टाळी वाजवायची)
आयुष्य दे रे वनमाळी

माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीच्या आडव्या लोंबी
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्ष
भोंडल्या तुझी बारा वर्ष
अतुल्या मतुल्या
चरणी चातुल्या
चरणीचे धोंडे
हातपाय खणखणीत गोंडे
एकएक गोंडा वीसावीसाचा
सार्‍या नांगर नेसायचा
नेसा ग नेसा बाहुल्यांनो
अडीच वर्ष पावल्यांनो

(शिरीष ‘मायबोलीकर’ यांचे सहकार्याने)

शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी

शिवाजी अमुचा राजा : हादग्याची गाणी

शिवाजी अमुचा राजा
त्याचा तो तोरणा किल्ला
किल्ल्यामधे सात विहिरी
सात विहिरींमधे एक एक कमळ
एक एक कमळ तोडीले
भवानी मातेला अर्पण केले
भवानी माता प्रसन्न झाली
शिवरायाला तलवार दिली
तलवार… घेऊनी आला…( इथे चाल बदल)
हिंदुंचा राजा तो झाला
हिंदुनी त्याचे स्मरण करावे
हादग्यापुढे गाणे गावें.
……………………………..
(आश्विनी डोंगरे यांचे सहकार्याने.)

लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी

लोणी खाल्लं कोणी : हादग्याची गाणी

नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंकाळ्यातलं/शिंक्यावरचं लोणी
खाल्लं कोणी खाल्लं कोणी
तेच खाल्ल वहिनींनी वहिनींनी….
आता माझा दादा येईलग येईलग
दादाच्या मांडीवर बसीनग/बसेनग
दादा तुझी बायको चोरटी चोरटी
असू दे माझी चोरटी चोरटी
दे काठी लाबं पाठी विसल्या
गुलाबाई माहेरच्या गोष्टी

(अरुंधती कुळकर्णी यांचे सहकार्याने.)