भाषेच्या गमतीजमती-भाग-२

भाषेच्या गमतीजमती-भाग-२

आमच्याकडे बोलतांना-लिहितांना “मला जाग आला” असे म्हणतात.
मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा मी सुरेश भटांचे “पहाटे पहाटे मला जाग आली” हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा ”जाग” हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला “चेव” हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे “मला चेव आला” हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.
पण जसजसा अशिक्षित समाज शिक्षितांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
“मला चेव आला” हे वाक्य फक्त शब्दबदल करून “मला जाग आला” असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
मी पण तसेच म्हणतोय. काय करणार? माझ्या सभोवताल सगळेच “जाग आला” असे म्हणत असतांना मी एकट्यानेच “जाग आली”
असे म्हणायचे ठरवले तर ते मलाच “वाटोळे” बोलल्यासारखे वाटते.

.
गंगाधर मुटे

भाषेच्या गमतीजमती – भाग-1

भाषेच्या गमती-जमती भाग-1
दोन महिण्यापुर्वीपर्यंत मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ होतो हे तुम्ही जाणताच. माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून “त्यांनी” मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जीते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे “हा विषय रटाळ” आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चिड हे एक प्रमुख कारण आहे.
त्याचं काय झालं…
पाचव्या-सहाव्या इयतेत असतानाची गोष्ट. प्रशांतने इंग्रजीच्या मास्तरांना एक शंका विचारली. की Cut म्हणजे कट असे होते तर Put म्हणजे पट असे का होत नाही किंवा Put म्हणजे पुट होत असेल तर Cut कुट का होत नाही? यावर मास्तरांनी उत्तर देण्याऐवजी रागाने लाल होऊन असा काही जरब असलेला जबरी नेत्रकटाक्ष टाकला की प्रशांत हादरलाच. एवढा हादरला की त्याच्या हृदयाचे पाणी-पाणी झाले. त्याच्या हृदयाचे एवढे पाणी झाले की ते त्याच्या सदर्‍याखालून ओघळत ओघळत डाव्या पायाच्या आधाराने चक्क जमिनिवर उतरले.
व्याकरण एवढे जहाल आणि निर्दयी असते असे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आणि “ह्रुदयाचे पाणी होणे” याचा अर्थही समजला.
त्यामुळे व्याकरणविषयक कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी कधिच कुणाला विचारले नाही आणि म्हणुन माझे व्याकरण कच्चे राहीले.
खालील शब्दांचा मला अजुनही निटसा उलगडा झालेला नाही.
१) पायात चप्पल घालायची की चपलेत पाय घालायचे?
२) अंगात सदरा घालायचा की सदर्‍यात अंग घालायचे?
३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?
४) हातात बांगड्या भरायच्या म्हणजे पोत्यात धान्य भरतो तशा भरायच्या?
असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.
जाणकारांनी उत्तरे द्यावीत.