Category मराठी भाषा
या या भुलाबाई : हादग्याची गाणी
या या भुलाबाई : हादग्याची गाणी
(१)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात हिरवी चोळी
हिरव्या चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडले दाणे
भुलोजी राणे घरी नाही,घरी नाही.
(२)
या या भुलाबाई, आमच्या आळी,तुमच्या आळी
तुमच्या अंगात लाल चोळी
लाल चोळीवर बसला मोर,बसला मोर,
बसल्या मोरावर सांडला बुक्का
भुलोजी अप्पा घरी नाही,घरी नाही.
(संकलन-गंगाधर मुटे)
आज स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.
१५ एप्रिल, मराठी साहित्यसम्राट स्व. सुरेश भट यांचा जन्मदिवस.
अजरामर साहित्यनिर्मीतीकार कविवर्य सुरेश भट यांना आदरांजली आणि सादर वंदन.
………………………………………………
हरफनमौला सुरेश
गाण्याचा गळा व गाण्यात रुची या गोष्टी सुरेशमध्ये आहेत; हे आमच्या आईच्या (ती. कै. शांताबाई भट) ध्यानात आले. म्हणून सुरेशच्या गाण्यातील रुची वाढावी, काही माहिती व्हावी यासाठी तिने एक बाजाची पेटी (विश्वास कंपनी, कोलकाता) आणली आणि त्याला संगीताची मुळाक्षरे व बाराखडी शिकविणे सुरू केले. आमची आई ही स्वत: चांगली पेटी वाजवायची व तिला संगीताची जाण होती. पुढे काही वर्षांनंतर सुरेशला पद्धतशीर गाणे शिकविण्यासाठी प्रल्हादबुआ नावाचे संगीत शिक्षक आमच्या घरी येत असत. त्याची गाण्याची आवड व प्रगती पाहून आमच्या वडिलांनी (ती. कै. डॉ. श्री. रं. भट) एच. एम. व्ही.चा एक ग्रामोफोन (चावीवाला) आणला होता.
ते सुरेशसाठी दर आठवडय़ातून एक रेकॉर्ड विकत आणत. आमच्या वडिलांना चांगले संगीत ऐकण्याचा नाद होता. त्यामुळे सुरेशला संगीतात आवड निर्माण झाली. पुढे तो एका बॅण्डपथकामध्ये काही दिवस होता आणि तेथेच तो बासरी वाजविणे शिकला. तो आजारी पडायचा तेव्हा अंथरुणावर असताना तो तासन्-तास बासरी वाजवित असे.
मराठी पारिभाषिक संज्ञा आणि संज्ञावली कोश
-चेतना प्रधान, विभागीय सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय
इ. स. १९६०मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर इ. स. १९६४मध्ये महाराष्ट्र शासनाने मराठीला राजभाषेचा कायदेशीर दर्जा प्राप्त करून दिला. इंग्रजी राजवटीत मराठी भाषेला राजाश्रय नव्हता. ज्ञानार्जनाचे प्रमुख साधन म्हणजे भाषा. केवळ विकासासाठी नव्हे तर अस्तित्वासाठी सुद्धा भाषेला ज्ञानभाषेचा दर्जा यावा लागतो. यासाठी शास्त्रीय व तांत्रिक शिक्षणाचे माध्यम मराठी असणे आवश्यक होते. ज्ञानभाषा म्हणजे ज्ञानार्जनाची, ज्ञानसंवर्धनाची व ज्ञान देण्याची भाषा. यामध्ये पहिली अडचण अशी होती की, शास्त्रीय व तांत्रिक विद्या शाखांसाठी आवश्यक असलेला पारिभाषिक शब्दसंग्रह उपलब्ध नव्हता. सर्व विद्यापीठांतून समान व एकरूप परिभाषा वापरली जावी यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक होते.
Continue reading
मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी
मराठीभाषा : शुद्धी आणि समृद्धी
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.द.भि.कुळकर्णी यांनी त्यांच्या भाषणामध्ये भाषा शुद्धी आणि समृद्धतेच्या अनुषंगाने काही मौलीक विचार व्यक्त केले आहेत. त्यावर अधिक चर्चा होऊन भाषालेखनासंबधात काही निटनेटके,सुस्पष्ट आराखडे तयार होणे गरजेचे आहे.
मी साहित्यीक नाही,पण अधून-मधून गद्य-पद्य लिखान करण्याची उर्मी काही पिच्छा सोडत नाही त्यामुळे फ़ुटकळ स्वरूपात का होईना लिखान चालूच असते त्यामुळे मी साहित्यीक नसलो तरी साहित्यापासून अलिप्तही नाही.
भाषेची शुद्धता आणि समृद्धी या दोन्ही अंगाचा विचार करतांना दोन्ही बाबी लवचिक असल्या तरच दोन्हीचा समन्वय साधून भाषाविकास साधला जाऊ शकेल.
शुद्धतेचा ध्यास हवा पण भाषेच्या समृद्धीसाठी नवनविन शब्दांचा स्विकार करण्यासाठी दरवाजे सताड उघडे असले पाहीजेत. परभाषेतील काही शब्द मायभाषेत वापरतांना निसंकोच वापरले गेले पाहीजेत कारण त्या शब्दांना मराठीत पर्यायी शब्द असेलच याची शाश्वतीच नसते. जसे की एन्डोसल्फ़ान, सायपरमेथ्रीन, पॅरासिटामॉल वगैरे. तर काही शब्दांना मराठीत पर्यायी शब्द तयार केले जाऊ शकते जसे की सॉफ़्टवेअर,हार्डडिस्क, ब्लॉग वगैरे. पण ह्या संशोधनाचा उगम ज्या भाषेत झाला असेल, सहाजीकपणे त्याच भाषेतील शब्द प्रथम सर्वश्रुत होतात.ब्लॉग या शब्दाने जेवढा लवकर बोध होईल तेवढा बोध अनुदिनी या शब्दाने होणार नाही हे उघड आहे. तरी पण हे मराठीशब्द शक्य तेवढे वापरायलाच हवे. मात्र तसा अट्टाहास धरणे फ़ारसे लाभदायक ठरणार नाहीत.
याउलट मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या मराठी बोली बोलल्या जातात. त्या स्थानिक बोलीभाषा असल्यातरी समृद्ध आहेत.प्रत्येक बोलीभाषेचे स्वत:चे शब्दभांडार आहेत. स्वत:ची ढब,ठेवन आहे. या बोलीभाषेमध्ये असे अनेक शब्द आहेत की त्याला पर्यायी शब्द प्रमाणभाषेमध्ये आज उपलब्ध नाहीत.उदाहरणार्थ,
विदर्भात मुख्यत्वे वर्हाडी आणि झाडी भाषा बोलली जाते हे सर्वश्रुत असले तरी नागपुर,वर्धा आणि आसपासच्या क्षेत्रात जी भाषा बोलली जाते ती ना झाडीबोली आहे ना वर्हाडबोली आहे,तर ती स्वतंत्र बोलीभाषा आहे. ज्याला मी नागपुरी बोली म्हणतो. ही नागपुरीबोली सुद्धा परिपुर्ण,समृद्ध बोली आहे. या बोलीत बोलतांना एखादा शब्द नसल्याने मी कुठे अडखळलो अथवा जे म्हणायचे होते तसे सक्षमपणे बोलताच आले नाही, असे कधी घडल्याचे मला स्मरत नाही. पण या बोलीमधील चांगले- चांगले शब्द सुद्धा प्रमाणभाषेत आलेले नाहीत.
उदा :- टोंगळा,घोटा,वज,हिडगा,गंज,गुंडी,कोपर,भेद्रं,चारं,टेंबरं,धान,आंबिल,सुतना,मनिला,खकाणा,भोकणा,
लमचा,इच्चक,चेंगड,सांडशी,बुहारा,पिलांटू,बंबाड,लल्लाऱ्या,माहुरा,बोथर,टालगी,जित्रुब,पहार,बाज,
जुप्न,सुदा,नावकुल,नावनाव,बंदा,सप्पा,सिद्दा,अध्धर,दाल्ला,ऐनक,बेकुब,मेकुड,आव,कवटा,खाती,
कंदोरी,शायवान,तुत्या,इरित,वार्त,वार्ती हे सर्व अर्थबोधक शब्द असूनही यापैकी बहूतांश शब्दांना प्रमाणभाषेत अजिबात पर्यायी शब्द नाहीत.
टोमॅटोला भेद्र हा पर्यायी शब्द प्रमाणभाषा का स्विकारीत नाही हे गौडबंगालच आहे.
असे नविन शब्द प्रमाणभाषेत रूजविने फ़ारसे कठीन काम नाही. लिखान करतांना ते वापरले पाहीजेत आणि सर्वांना कळावे यासाठी तळटीप देऊन अर्थ दिले पाहीजेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी मराठीभाषा शुद्धी आणि समृद्धतेची अपेक्षा व्यक्त केली तर त्यासाठी सर्वांनी काही ना काही प्रयत्न करून अमलात आणले पाहीजेत आणि त्या पदाची बुज राखली पाहीजे. तोच त्या पदाचा यथोचित सन्मान ठरेल असे मला वाटते.
गंगाधर मुटे
भाषेच्या गमतीजमती-भाग-२
भाषेच्या गमतीजमती-भाग-२
आमच्याकडे बोलतांना-लिहितांना “मला जाग आला” असे म्हणतात.
मी पण तसेच म्हणतोय.
पहिल्यांदा मी सुरेश भटांचे “पहाटे पहाटे मला जाग आली” हे गीत ऐकले तेव्हा भटांचे भाषाविषयक ज्ञान कमजोर आहे असाच माझा समज झाला होता.
पण जेव्हा ”जाग” हा स्त्रीलिंगी शब्द आहे हे कळले तेव्हा माझीच बंडी उलार झाली.
आमच्या नागपुरी गावरान भाषेत जाग या शब्दाला “चेव” हा पर्यायी शब्द आहे आणि तोच वापरात आहे.
त्यामुळे “मला चेव आला” हे गांवढळ वाटले तरी शुद्ध वाक्य आहे.
तसेच “तो जागा आहे काय?” या ऐवजी “तो चेता आहे का?” असे म्हणतात.
पण जसजसा अशिक्षित समाज शिक्षितांच्या सानिध्यात यायला लागला तसतसे त्यांनी नवनवे शब्द ऐकून जाणिवपुर्वक आत्मसात केलेत. शब्द शिकता आलेत पण व्याकरण बोंबलले. कारण त्यांनी
“मला चेव आला” हे वाक्य फक्त शब्दबदल करून “मला जाग आला” असे उच्चारले.
आणि शुद्ध बोलण्याच्या नादात मुळात शुद्ध असलेलं वाक्य अशुद्ध करून टाकलं.
.
करू जाता काय, उलटे झाले पाय. आहे ना गंमत?
मी पण तसेच म्हणतोय. काय करणार? माझ्या सभोवताल सगळेच “जाग आला” असे म्हणत असतांना मी एकट्यानेच “जाग आली”
असे म्हणायचे ठरवले तर ते मलाच “वाटोळे” बोलल्यासारखे वाटते.
.
गंगाधर मुटे
भाषेच्या गमतीजमती – भाग-1
भाषेच्या गमती-जमती भाग-1
दोन महिण्यापुर्वीपर्यंत मी व्याकरणामध्ये फारच ढ्यॅ होतो हे तुम्ही जाणताच. माझ्या कवितांमधील व्याकरणाच्या चुका शोधून “त्यांनी” मला कसं धुतलं,पिळलं आणि वाळायला घातलं याचे तुम्ही जीते-जागते, चालते-बोलते साक्षीदार आहात. मात्र माझ्या व्याकरण अज्ञानामागे “हा विषय रटाळ” आहे एवढेच कारण नाही तर या विषयीची पराकोटीची चिड हे एक प्रमुख कारण आहे.
त्याचं काय झालं…
पाचव्या-सहाव्या इयतेत असतानाची गोष्ट. प्रशांतने इंग्रजीच्या मास्तरांना एक शंका विचारली. की Cut म्हणजे कट असे होते तर Put म्हणजे पट असे का होत नाही किंवा Put म्हणजे पुट होत असेल तर Cut कुट का होत नाही? यावर मास्तरांनी उत्तर देण्याऐवजी रागाने लाल होऊन असा काही जरब असलेला जबरी नेत्रकटाक्ष टाकला की प्रशांत हादरलाच. एवढा हादरला की त्याच्या हृदयाचे पाणी-पाणी झाले. त्याच्या हृदयाचे एवढे पाणी झाले की ते त्याच्या सदर्याखालून ओघळत ओघळत डाव्या पायाच्या आधाराने चक्क जमिनिवर उतरले.
व्याकरण एवढे जहाल आणि निर्दयी असते असे मला त्या दिवशी प्रथमच समजले. आणि “ह्रुदयाचे पाणी होणे” याचा अर्थही समजला.
त्यामुळे व्याकरणविषयक कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मी कधिच कुणाला विचारले नाही आणि म्हणुन माझे व्याकरण कच्चे राहीले.
खालील शब्दांचा मला अजुनही निटसा उलगडा झालेला नाही.
१) पायात चप्पल घालायची की चपलेत पाय घालायचे?
२) अंगात सदरा घालायचा की सदर्यात अंग घालायचे?
३) मामाची पत्नी मामी तर मेव्हण्याची पत्नी मेव्हणी का नाही?
४) हातात बांगड्या भरायच्या म्हणजे पोत्यात धान्य भरतो तशा भरायच्या?
असे अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहे.
जाणकारांनी उत्तरे द्यावीत.
माय मराठीचे श्लोक…!!
नमो मायभाषा! जयोस्तुss मराठी!
तुझे शब्द सान्निध्य माझे ललाटी
जडो ध्यास हा छंद व्यासंग बोली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
तुझे शब्दलालित्य सूरास मोही
तसा नादब्रह्मांस आनंद होई
सुरांच्या नभी सूरगंगा नहाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
जरी वेगळी बोलती बोलभाषा
अनेकांत एकत्व ही प्राणभाषा
असे भाग्य आम्हां मराठी मिळाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
असा मावळा गर्जला तो रणाला
तसा घोष “हर हर महादेव” झाला
मराठी तुतारी मराठी मशाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
“अभय” एक निश्चय मनासी करावा
ध्वजा जीव ओवाळुनी फ़डकवावा
सदा शब्द वाणीत ये सर्वकाली
घडो हे समस्ता! नमो मायबोली..!!
– गंगाधर मुटे “अभय”
…………………………………………………………..
(रानमेवा काव्यसंग्रहात प्रकाशीत. दि. १०.११.२०१०)
…………………………………………………………..
श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ आणि समुह यांनी माय मराठीच्या श्लोकाचे गायन केले.
गायक – विनायक वानखेडे
हवी कशाला मग तलवार ?
मकरंदाहुनि मधुर तरीही
शर शब्दांचे धारदार
तळपत असता जिव्हा करारी
हवी कशाला मग तलवार ?……!!
शब्दच असती कवच कुंडले
शब्दच चिलखत होती
शब्दच होती आयुधे ऐसी
नभास भेदुनि जाती
शब्द खड्ग अन् शब्द ढालही
परतवती ते हरेक वार…….!!
नवनीताहून मऊ मुलायम
कधी कणखर वज्रे
आसवांनी भिजती पापण्या
कधी खळखळ हसरे
हीनदीनांचे सांत्वन करिती
गाजविती दरबार….!!
भुंग्यासम शब्दांची गुणगूण
कधी व्याघ्राची डरकाळी
शब्द फटाके, शब्द फुलझडी
कधी नीरवता पाळी
जोषालागी साथ निरंतर
कधी विद्रोही फूत्कार ….!!
सृजनशीलता-करुणा-ममता
संयम विभूषित वस्त्रे
हजरजबाबी, तलम,मधाळही
परि कधी निर्भीड अस्त्रे
पांग फेडण्या भूचे अभये
तळहातावर शिर शतवार …!!
गंगाधर मुटे
………… **………….. **…………