गंधवार्ता….. एका प्रेताची!

गंधवार्ता….. एका प्रेताची!

“दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss”
                     असा आर्त टाहो कानावर आदळताच आपल्या कामात मग्न असलेला भरत खाडकन भानावर आला. नजर उचलून पाहताच त्याला समोर जे दृश्य दिसलं ते पाहून तो हादरून गेला. काहीतरी भयानक विपरीत घडलंय याची जिवंत वार्ता घेऊन ती बातमीच त्याच्याकडे धावत येत होती.
                  भरत गव्हाणकर म्हणजे एक उच्चविद्याविभूषित आणि तेवढंच सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व. बुद्धिमत्तेच्या बळावर गावामध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचंच, असा मनाचा पक्का हिय्या करून शहर सोडून गावात राहायला आलेला. चांगली महिन्याकाठी भरपूर वेतन आणि भत्ते देणारी शासकीय नोकरी सोडून दिली आणि शेतीमध्ये नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्याला इतिहास बदलायचा होता पण इतिहास बदलला नाही उलट इतिहासाचीच पुनरावृत्ती झाली, इतिहासानेच त्याचे जीवन बदलून टाकले. गावात आजवर जे इतरांच्या बाबतीत घडत होतं तेच भरत गव्हाणकरच्या बाबतीत घडलं. शेतीतून काही वरकड मिळकत मिळविण्याऐवजी, बापा-आज्याने पोटास गांजवून जे काही नगदी चार पैसे, सोनं-नाणं लेकासाठी जमवून ठेवलं होतं, तेही शेतीत गमावून बसला होता. सर्व बॅंकाचा थकबाकीदार झाला होता. खाजगी सावकारांनी त्याच्यासाठी दरवाजे केव्हाच बंद केले होते. थोडक्यात सांगायचं तर “हातावर आणणे आणि पानावर खाणे” येथपर्यंत त्याची प्रापंचिक हालत हलाखीची झाली होती. पण नियतीचे वार सोसूनही न डगमगता त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणारा भरत तेवढ्याच ताकदीनिशी येणार्‍या भविष्याशी समर्थपणे लढत होता. आर्थिक स्थितीने खचला असला तरी त्याच्या मनमिळाऊ स्वभावाने आणि लोकांच्या सुखदु:खात समरस व्हायच्या त्याच्या गुणवैभवामुळे मात्र गावांत त्याला खूप मानमरातब मिळायला लागला होता व गावकरी त्याच्याकडे आदरभावाने पाहायला लागले होते.
शेतीची संपूर्ण कामे करून झाली की उरलेल्या फावल्या वेळात रेडिओ,टीव्ही दुरुस्ती करून चार पैसे मिळवायचे असा त्याने नवा जोडधंदा सुरू केला होता. त्यामुळे दोन सांजेशी गुजराण व्हायला थोडा हातभार लागला होता.
                  त्यादिवशीही तो असाच एक टीव्ही दुरुस्ती करीत बसला होता. संपूर्ण टेबलभर व्हॉल्व, कंडेन्सर, कॅपॅसिटर, मल्टीमिटर अस्ताव्यस्त पडलेले होते. बाजूलाच लालभडक झालेला तप्तगरम कैय्या(सोल्डरिंग मशीन) व २४० व्होल्टचा विद्युत प्रवाह इकडेतिकडे पळवत नेणारे अर्धवट अवस्थेत खुले असणारे वायर्स सभोवताल पसरले होते.
भरत शांतचित्ताने टीव्ही दुरुस्त करण्यात मग्न झाला होता. आणि तेवढ्यातच त्याच्या कानावर एक आर्त टाहो येऊन आदळला.
“दाsssदा, भाऊ गेलाsssss रेsssssss”
                  पिसाटल्यागत सुसाट वेगाने, जिवाच्या आकांताने टाहो फ़ोडत शेवंता धावत आली आणि त्याला काही कळायच्या आतच त्याच्या गळ्याला बिलगली.
            क्षणभर भरत हादरलाच. काहीतरी अघटित घडल्याच्या शंकेच्या कारणापेक्षाही सभोवताल विखुरलेल्या जिवंत विजप्रवाहाच्या खुल्या तारा हे हादरण्यामागचे प्रमुख कारण होते. शिवाय टीव्हीमध्ये पिक्चर ट्यूब प्रकाशमान व्हावी म्हणून “पॉवर सेक्शन” भागात प्रचंड दाबाची विद्युतशक्ती तयार होत असते. नेमका तेथे जर मानवीस्पर्श झाला तर थेट मृत्यूच किंवा शरीराचा किमान एखादा अवयव/भाग कायम निकामी होण्याची हमखास खात्रीच.
                   शेवंता गळ्याला बिलगल्याने तिच्यासोबत त्याचाही तोल डळमळलाच होता. त्यामुळे शरीराचा कोणताही भाग कधी विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येईल सांगता येत नव्हते. पण असे म्हणतात की आणीबाणीच्या क्षणी माणसाची विवेकबुद्धी शांत असली तर आलेल्या प्रसंगावर मात करण्यासाठी संकट धावून येण्याच्या वेगापेक्षा जास्त वेगाने बुद्धी संरक्षणाचे शस्त्र शोधायला लागते आणि क्षणार्धात उपायाचे मार्ग सुचायला लागतात. आणि तेच झाले. भरतने एकही क्षण न दवडता स्वतःचा तोल सावरून दोन्ही हाताने शेवंताला अलगद छातीपर्यंत उचलून घेतले आणि तिथून बाहेर आला.
तोवर बाहेर पन्नास-साठ लोकांचा जमाव जमला होता. कुणीतरी धावत जाऊन ग्लासभर पाणी आणून शेवंताला पाजले. पण शेवंताच्या तोंडून भाऊ….भाऊ….. भाऊ यापुढे शब्दच फुटेना.
“आवं तोंडानं सांग की, काय झालं त्ये” एक आजीबाई समजावणीच्या स्वरात बोलली.
“जे व्हाचं आसन त्ये झालं एकदा, आमालेबी माहीत होऊ दे ना, का झालं त्ये” सरस्वती काकू
“ताई नुसते रडून काय होणार? थोडा धीर धरून सांगा की आम्हाला” भरतची पत्नी अर्चना.
 आता शेवंताने स्वतःला सावरले होते, त्यामुळे थोडावेळ स्तब्धता पसरली.
आणि शेवंता सांगायला लागली. 
“मी वावरात कापूस वेचत व्हती. बाजूच्या रस्त्याहून एक फटफटी गेली. माह्या माहेरचा त्या फ़टफ़टीवर बसलेला मांगचा माणूस म्होरच्याले डगर्‍याने सांगत व्हता की अर्जुन आणि त्येची बायको दोघबी मेल्येत म्हून. म्या आइकलं आनं त्येला डगर्‍याने आवाज देल्ला, पण थे लई दूर निघून गेले व्हते.”
“अगं मग तो अर्जुन म्हणजे तुझाच भाऊ असेल कशावरून. दुसरा कोणीही असू शकते. तू तसं फारसं काही मनाला लावून घेऊ नकोस” भरत समजावणीच्या स्वरात सांगायला लागला.
“म्या बी थेच म्हंते. उगच दोरीले साप म्हणून भुई कायले ठोपट्टे बाप्पा?” सरस्वती काकूंनीही भरतचीच री ओढली.
“नाय नाय, माहा आत्मा गाही देत्ये की कायबी तरी इपरीत झालंच हाय, थे काय नाय. दादा तू लवकर फटफटी काहाड. आपल्याले लगबगीनं गेलं पाह्यजे” एका हातात पदराचा शेला घेऊन डोळे पुसत शेवंता बोलत होती.
                  शेवंताचं माहेर सोनेगाव फारसं लांब नव्हतं. केवळ १३ किमी अंतरावर. शेवंताचा भाऊ अर्जुन म्हणजे भरतचा वर्गमित्र. त्यामुळे सोनेगाव भरतच्या परिचयाचाच गाव. भरतने डोळ्यासमोर सोनेगावचं दृश्य उभं करून गावात दुसरा कोणी अर्जुन असावा काय, याचा शोध घेतला पण या अर्जुन व्यतिरिक्त दुसरा कोणी अर्जुन डोळ्यासमोर येईचना. म्हणून भरतच्या हृदयगतीचे ठोके जोरजोराने धोक्याची घंटा वाजवायला लागलेच होते.
भरतकडे मोटरसायकल नाही आणि त्याला शेवंताला घेऊन लगोलग सोनेगावला जाणे आवश्यक आहे, हे ताडून सरपंच विश्वासदादांनी आपली होंडा आणून समोर उभी केली आणि चाबी भरतच्या हातात देत म्हणाले.
“भरतराव तुम्ही शेवंताला घेऊन निघा लवकर आणि पोचल्यापोचल्या आम्हांस फोन करा.”
भरत आणि शेवंता सोनेगावात पोहचले तेव्हा गावातली निस्तब्ध शांतता आणि गावकर्‍यांचे पाणी उतरलेले चेहरे पाहून भरतची हृदयगती अधिकच वाढायला लागली होती.
आणि हे काय? अर्जूनच्या घरासमोर गर्दी?
ती घटनाच खोटी असेल किंवा दुसराच कोणीतरी अर्जुन असेल, अशी आतापर्यंत मनसमजावणी करत स्वतःस सावरणार्‍या शेवंताचा आता मात्र धीर सुटायला लागला होता.
गर्दीतून वाट काढत दोघेही कसेबसे अंगणात पोहचले. आणि ते दृश्य पाहून शेवंताने जिवाच्या आकांताने टाहो फोडला.
भाssssऊ हे का केलंssssssss रे ssss????
एखाद्या कठीण काळजाच्या माणसाचेही हृदय फाकून……वितळून पाणी-पाणी व्हावे, असेच ते दृश्य.
गळ्यात दोर लटकवून अर्जुन बोरीच्या झाडाला झुलत होता.
समोरच अगदी १५ फुटावर अर्जुनची बायको नीलिमा दोन्ही हात पसरून उपडी निपचीत पडली होती.
हे दृश्य पाहून भरतला भरून आलं. डोळ्यातून टपटप आसवे गळलीत.
                       पण हे असे का व्हावे त्याला कळेना. अर्जुनला गळ्यात फास लटकवून झुलताना पाहून नीलिमा त्याच्या दिशेने धावली असेल आणि धावता धावताच भावनांचा उद्रेक होवून अचानक हृदयगती थांबल्याने ती तेथेच पोटाच्या भारावर पडून गतप्राण झाली असावी. असा अंदाज त्याला आला पण अर्जुनचे काय? त्याने असा टोकाचा निर्णय का घ्यावा. अर्जुन तसा वाघासारख्या निधड्या छातीचा. विद्यार्थीदशेपासूनच खूप उन्हाळे-पावसाळे सोसलेला. बिनापुस्तकाने वर्गात आला म्हणून गुरुजीने ’गेट आऊट’ म्हणताच “गुरुजी, मी काही वर्गात बेडाबिस्तर घेऊन मुक्कामाला आलेलो नाहीये. ५ वाजले की जाणारच आहे. पण प्रथम मला हे सांगा की, पैशाअभावी पुस्तक घेतले नाही हा काय मोठा गुन्हा ठरतो? तुम्ही मला अभ्यासाचे प्रश्न विचारावे, मी उत्तर देऊ शकलो नाही तर अवश्य ’गेट आऊट’ होईन. पण पुस्तक नाही म्हणून ’गेट आऊट’ हे मी मान्य करणार नाही” असे गुरुजींच्या डोळ्याला डोळे भिडवून सांगणारा अर्जुन आत्महत्या करेल, हे भरतच्या गळी उतरत नव्हतं. पण समोर वास्तव होतं.
“कालच तालुक्याला गेला होता. मुन्नीसाठी शाळेचा ड्रेस आणायला” अर्जुनचा मित्र श्रीकांत सांगत होता.
“म्हणाला की अडत्याला उसनवार पैसे मागतो. पण त्याने दिलेच नसणार. तो तरी कसा देईन? यंदाचे सर्व पीक त्याला देऊनही कर्ज फ़िटलेच नव्हते. बॅंका आणि सावकाराची तर दमडीही चुकता करू शकला नव्हता. दुकानदाराने किराणा तर कधीचाच थांबवलाय. गेल्या वर्षी कोरडा आणि यंदा ओला दुष्काळ.”
                        मुन्नी. अर्जुनला दोनच मुली. मुन्नी मोठी, आठवीत शिकत असलेली आणि शब्दाली लहान, जेमतेम अकरा महिन्यांची.
                          मुन्नीला ड्रेस एकच. तोच शाळेचा आणि तोच घरी वापरायचा. सातवीची शाळा सुरू झाली तेव्हा घेतलेला. मुन्नीने ड्रेसचे नाव काढले की तिला १५ ऑगष्ट सांगायचा, नंतर दिवाळी सांगायची. दिवाळी उलटून गेली की २६ जानेवारी सांगायचे. असाच नित्यक्रम चालला होता दीड वर्षापासून. आणि एवढे दिवस निभावूनही नेलेत. पण आता ड्रेसच्याच आयुष्याने दगा दिला. विहिरीचे पाणी भरतेवेळी घागर उचलताना चर्रकन उभी रेघ घेऊन शर्ट फाटलं. तशी मुन्नीही समजदार, सुईदोरा घेऊन तिने लगेच शिवून घेतलं. पण ते शर्ट तिला घराबाहेर पडू देईना. चारचौघीत मिसळू देईना, शाळेतही जाऊ देईना.
तेव्हा अर्जुन म्हणाला होता.
“अगं मी नाहीतरी २६ जानेवारीला घेणारच होतो. आता २४ तारखेला तालुक्याला गेलो की आणतोच बघ.”
                        पण नियतीला हे मंजूर नसावे. सारे प्रयत्न विफल ठरले होते, आणि तो तालुक्याहून रिकाम्या हाताने परतला होता.
                          हे सर्व कळलं आणि भरतचं हृदय भरून आलं. त्याला टाहो फोडावासा वाटला. धाय मोकलून गडबडा लोळावंस वाटलं. पण त्याची प्रतिष्ठा आडवी होऊन त्याला तसं करू देईना. क्षणभर त्याला वाटलं की हे सर्व खोट्या प्रतिष्ठेचे बुरखे टराटरा फाडून फेकून द्यावे आणि यथेच्छ रडून घ्यावे, अगदी मन हलके होईस्तोवर. पण त्याने परत एकदा स्वतःला सावरले. भावनेवर ताबा मिळाल्याचे बघून हळूच श्रीकांतला विचारले.
“शब्दाली कुठाय?”
श्रीकांत काहीच बोलला नाही, बाजूच्या एका खोलीकडे चालायला लागला.
शब्दाली… ११ महिन्याची पोर ती. तिला नर्मदाकाकू मांजरीच्या पिलासोबत खेळवत होत्या. शब्दालीने त्या पिलाच्या मिशा धरल्या की ते पिलू मान हलवायचे. आणि मनीम्याऊची मान हलतांना पाहून शब्दाली खदखदा खिदळायची.
                         हे दृश्य पाहून परत एकदा भरतच्या मनात कालवाकालव झाली. हिला सांगायला हवे की तिच्या डोईवरचे सर्व छप्पर उडून गेले आहे. ती अनाथ झाली आहे, पोरकी झाली आहे. आज शब्दाली दोन्ही पंखांनी उघडी पडली आहे. हे कुणीतरी शब्दालीला सांगावे असे त्याला वाटले. पण हे सांगायचे कसे?
शब्दात सांगावे तर तिचे कान ग्रहण करण्याच्या योग्यतेचे नव्हते.
डोळ्यांनी दाखवावे तर दृश्याचे पृथक्करण करून मेंदूस अर्थ पुरवण्याइतपत तिच्या जाणीवा पक्व नव्हत्या.
मग तिला श्वसनेंद्रियामार्फ़त गंधवार्ता तरी कळली असावी का?
जडदेहातून प्राण निघून गेला की मग केवळ प्रेतच उरत असते. प्रेताचे वय जसजसे वाढत जाते तसतशी प्रेतातून निघणार्‍या गंधाची तीव्रताही वाढत जाते. आणि त्या गंधाला स्वत:ची अशी एक ओळखही असते.
मग तो गंध तरी शब्दाली पर्यंत वार्ता घेऊन आला असेल काय?
नाहीच. कारण शब्दालीच्या जाणीवांची क्षमता एकतर या सर्व जाणीवांच्या अलीकडे किंवा पलीकडे तरी असणार. आता भरतलाही पुन्हा एकदा भरून आले, आणि तो पुटपुटला.
“अरे कुणी तरी तिची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे…….”
आणि आतापर्यंत खिदळत असलेली शब्दाली जोराने रडायला लागली. पण तिच्या रडण्याचे कारण तिला आईबाबांच्या निधनाची वार्ता कळली म्हणून नव्हते तर भरतने मोठ्याने फोडलेल्या कर्णभेदी टाहोला दचकून घाबरल्यामुळे होते.
“अरे कुणी तरी शब्दालीची आईबाबांसोबत शेवटची भेट करून द्या रे…….” असे भरत शब्दात पुटपुटायला गेला आणि यावेळेस त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडण्याऐवजी एक कर्णभेदी टाहोच बाहेर पडला होता.
…………………………..*  गंगाधर मुटे  *……………………………..

गंधवार्ता

गंधवार्ता

दोर गळ्यात लटकवून
बाप झुलतोय झाडावर
माय निपचित पडलीय
हृदय फाटता धरतीवर

बाळ खिदळतंय मनीसंगे
मिशा तिच्या धरता-धरता
नाही जराही त्याला
कसलीsssच गंधवार्ता

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….

आता काही देणे घेणे उरले नाही

 आता काही देणे घेणे उरले नाही

१) तृप्ततेची चमक

तुझ्यात मी? की माझ्यात तू? नाही माहीत
तरीपण आपले छानपैकी यमक जुळत आहे
दिले फ़ाटक्या हातांनी तुला मी… तेवढ्यानेच
तृप्ततेची चमक तुझ्या नजरेत खेळत आहे

जिथे झालेय मीलन मनाचे मनाशी
तिथे रूप-स्वरूपाला काही अर्थ उरले नाही
हे नाशवंत काये..! मला तुझ्याशी
आता काही देणे घेणे उरले नाही…..!!
***
२) मर्यादा सहनशीलतेची

तू “काय रे” म्हणालास, मी “नमस्कार” म्हणालो
तू “चिमटा” घेतलास, मी “आभार” म्हणालो
तू “डिवचत” राहिलास, मी ”हसत” राहिलो
तू “फाडत” राहिलास, मी “झाकत” राहिलो

माझी सोशिकता संपायला आली.. पण
मर्कटचाळे, तुझे काही सरले नाही
बस कर मित्रा, हा घे शेवटचा रामराम माझा
तुझे-माझे… आता काही… देणे घेणे…. उरले नाही
***
३) आत्मप्रौढी
मी फ़ूले मागितली, तू काटे दिलेस
फ़ुंकरी ऐवजी धपाटे दिलेस
तुझ्या पौरुषी अहंकारात
माझे अस्तित्वच नाकारले गेले
तुझ्या आत्मप्रौढी समोर
माझे आत्मक्लेश पुरले नाही
म्हणून मलाही तुझ्या अहंमन्यतेशी
आता काही देणे घेणे उरले नाही…..!!
***
४) फ़टाकडी

तू आलीस आणि घुसलीस
हृदयाची सारी दारे ओलांडून
थेट ……. हृदयाच्या केंद्रस्थानी

तू असतेस….. तेंव्हा तू असतेस
तू नसतेस….. तेंव्हाही तूच असतेस
मला कसे एकटे म्हणुन सोडतच नाहीस तू

त्यामुळे.. हो त्याचमुळे…..”त्या फ़टाकडीशी”
माझे आता, काही देणे घेणे उरले नाही…..!!
***

 ५ ) हे मृत्यो..!

जगायचे होते ते जगून झाले
करायचे होते ते करून झाले
द्यायचे होते ते देऊन झाले
घ्यायचे होते ते घेऊन झाले….!

हे मृत्यो..! तुला यायचे असेल तर ये
कधीही…..; तुझ्या सवडीने
तुला टाळावे असे आता कारण उरले नाही
आता काही देणे घेणे उरले नाही…..!!

६) आयुष्याची दोरी

आयुष्याच्या दोरीची अंतिम किनार
माझी मला दिसायला लागली
जीव घाबरा अन् नाडी मंदावून
श्वासेही घरघरायला लागली

बराच पुढे निघून आलोय मी आता
रामनाम सत्याशिवाय काही उरले नाही
मोह,माया; मद,हेवा; काम-क्रोध यांचेशी
मला आता काही देणे घेणे उरले नाही

                                        गंगाधर मुटे
………………………………………………….

मी गेल्यावर ….?

मी गेल्यावर ….? 

मी गेल्यावर माझे कोण, कशाला गुण गाईन?
मी तरी जातांना कुणास काय देऊन जाईन?

जरी माझी कातडी जाड असेल गेंड्यासारखी
पण तिची चप्पल बनते ना खेटर
केसापासून ना वारवत, ना चर्‍हाट
ना उब देणारं स्वेटर.
मी कसा कुणाच्या चिरकाल स्मरणात राहीन?

हाडेही माझी कणखर आहेत खरी
पण आयुर्वेदात उपयोग शून्य
मी मात्र मिरवत आलो
देहाचे लावण्य
स्वर्गवाले मजकडे का आतुरतेने पाहीन?

नसलो काही देणार तरी जातांना
नवमण लाकडांची राख आणि
आणखी प्रदूषित करणार
हवा आणि पाणी
जीवेभावे का कोणीतरी श्रद्धांजली वाहीन?

हसू फ़ुलवलं नाहीच आजवर
कधी कुणाच्या चेहर्‍यावर
मात्र नुसतच रडवणार
जातांना-गेल्यावर
स्वयंप्रेरणेने कोण मग खांद्यावर घेईन?

केले असतील सत्कर्म
पण असतील दोन-चार
तेवढ्याने थोडंच उघडणार
स्वर्गाचं दार
काहीतरी कर अभय
जेणेकरून मुक्तिमार्ग जरा सुलभ होईन…!

                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….

हताश औदुंबर

हताश औदुंबर

ऐल तीरावर लाल शिरावर,लुकलुकता घेऊन
निळा पांढरा थवा चालला, रजःकण पांघरून
ढोलं-चौघडे, बोल बडबडे, खाकी गर्दी पुढे
सरावल्यांची पोपटपंची, गगन भेदुनी उडे

पैल तीरावर पत्र घरावर, तुळशीचे ठेवून
बेत शिजविला,देह निजविला, काळघुटी घेऊन
अभागीनीचे कुंकूम पुसता, अचेतन ती पडे
पोशिंद्याचा बाळ भुकेला, तिच्या उराशी दडे

दोन तीरांना अभये धारा, विलगे निरंतर
पाने गाळुनी मुंडण करितो, हताश औदुंबर

                                          गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
(“त्या” सर्व हजारो स्वर्गिय शेतकर्‍यांना
भावपुर्ण श्रद्दांजलीसह सादर समर्पित.)

……………………………………………..

आईचं छप्पर

.आईचं छप्पर.

कडाक्यात भांडतात
मेघ गडगड करून
भरून येते नभाला
अश्रू ढाळते वरूण …!

अश्रू बनती गारा
वादळ तांडव करी
गारठल्या हवेसवे
विजेस हिंव भरी …!

हिंव भरल्या विजेस
ताप चढवी गारा
तिला पांघराया
छप्पर नेतो वारा …!

छप्पर उडल्या संसारात
ब्रह्मपुत्रा वाहते
तेल मिरची शिदकुट
पाण्यावरती पोहते ….!

पोहतांना पुस्तक वही
सरस्वती भिजते
माती करून जीवाची
चूल उल्हे निजते ….!

गरजत्या पावसात
चोळी झबले न्हाती
पदराखाली लेकरं
कवटाळती छाती ….!

                      गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….

( शिदकूट = मोजक्या काळासाठी पुरेल एवढी अन्नसामग्री)
( उल्हा = एकप्रकारची कच्च्या मातीची चुलच पण लाकडा ऐवजी कोळशाचा जाळ घालतात.उल्हाचूल.)

औंदाचा पाऊस

औंदाचा पाऊस

सायबीन झालं पोटलोड, पराटी केविलवाणी
कोमात गेलं शिवार सारं, व्वा रे पाऊसपाणी ……!!

उन्हाळवाही-जांभूळवाही, शेती केली सुधारीत
बी-बेनं खत-दवाई, बीटी आणली उधारीत
नवं ज्ञान, नवं तंत्र, उदीम केला पुरा
पावसाच्या उघाडीनं, स्वप्न झालं चुरा
खंगून गेली कपाशी, बोंड बोरावाणी ……!!

बेनारचा बाबू म्हणे कापूस नाही बरा
औंदा पेर सायबीन, बरकत येईन घरा
नाही उतारा तिलेबी, खासर उलार होते
रोग झाला गेरवा,एकरी दीड पोते
बिनपाणी हजामत, चीत चारखानी ……!!

सायबाचं दप्तर म्हणते, पीक सोळा आणे
अक्कल नाही तूले म्हून, भरले नाही दाणे
विहिरीत नाही पाझर, नयनी मात्र झरे
किसाना परीस कईपट, चिमण्या-पाखरं बरे
भकास झालं गावकूस, दिशा वंगळवाणी …..!!

                                         गंगाधर मुटे
………… **………….. **………….**…….
ढोबळमानाने शब्दार्थ :
पोटलोड = जमिनीतील अपुऱ्या ओलाव्यामुळे
दाण्याची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच शेंग पक्व होणे.
पराटी = पऱ्हांटी,कपाशीचे झाड.
बेनार = कृषी विषयक सल्ला देणारा शासकीय विभाग
खासर = बंडी, शेतीमाल वाहतुकीसाठी बैल
जुंपून वापरावयाचे साधन.
गेरवा = तांबेरा नावाचा रोग, झाडाची पूर्ण वाढ न
होता पिक कापणीला येते.
खासर उलार होणे = लाक्षणिक अर्थाने व्यवस्था
कोलमडणे. घडी विस्कटणे
……………………………………………..

शल्य एका कवीचे


शल्य एका कवीचे


तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनी
ओघवती, रसाळ, सोज्वळ त्याची काव्यवाणी……!

कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरात
रसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हात
आवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुले
हेलाविती तनू-मने, वृद्ध, तरुण, सानुले
शासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरी
समीक्षक म्हणती “असा न् होणे” कवी जन्मांतरी
प्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिता
प्रेमी युगुले रंगून गाती, त्याच्या प्रणयकविता
परी हृदयी शल्य एकची, कायम ही छलना
जीवनी त्याच्या, बनुनी प्रेमिका, ना ये कुणी ललना

“लाख दिलांच्या गळीचा ताईत” मिरवे बिरुदावली
गळात त्याच्या अजुनी नव्हती, एक वारू गावली
सांजसकाळी, ऐन दुपारी, ठाके ना त्याचे चित्त
खाण्यापिण्याशी मन लागेना, एवढ्याची निमित्त
जलात हलते पाय सोडूनी, गावी प्रेम गाणी
कधी येशील गे! रूपमोहिनी मम हृदयराणी
नित्य नेमाने असेच स्वप्न, उघड्या डोळ्या पडे
दचकणे, नेत्र मिचकने, क्षणाक्षणाला घडे
वर्षामागुनी अशीच वर्षे, वर्षे उलटली बारा
अढळ, निश्चल, अचल राहिला, सोसुनी ऊन वारा
प्रेमाराधना, त्याची अर्चना, आसमंता कळाली
प्रेम देवता प्रसन्न झाली, तपश्चर्या फळाली

एक दिवस टक लावूनी, होता क्षितिजाकडे
दूरवर दिसली, एक कामिनी, येत त्याच्याकडे
त्याचे हृदय हलले, अंतरंग फुलले, आली एक झुरझुरी
शहारले अंग, उठले तरंग, रसनाही थरथरली

पाहता अवखळ चंचला, जसा कनक कुंचला, काळीजा रूतला, तीर आरंपार
वाहता खळखळ झरा, जशी भोवळ गरगरा, येतसे तरतरा, झुळूक थंडगार

मग त्याला खात्री पटली
आजवर जी स्वप्नी नटली
मनःचक्षू जीस्तव झटली

ती हीच स्वप्नीची ज्वाला, जिवलग मंदारबाला
हुरूप असा की आला, मग बोलीला गहीवरुनी

मग उठती स्फूर्ती तरंग
त्या अद्भुत प्रतिभेसंग
प्रकटती इंद्रछटांचे रंग
त्याच्या वाणीमधुनी

हे सुंदरी, मदन मंजिरी, कपोल अंजिरी, अधर अंगुरी, अतिसुकुमार
चंचल नयना, मंजुळ मैना, कोकिळ गहिना, प्रीती ऐना, नासिका चिरंदार
रूप साजिरे, मुख गोजिरे, लावण्य लाजिरे, तारुण्य माजिरे, चालणे ठसकेबाज
जशी उमलली,चाफ्याची कली,झुलती रानवली,अल्लड सुकमली,मुसमुसता साज

देवे घडवली, मूर्त मढवली
साजे चढविली, सृष्टीच्या अमोल तारा
स्वप्न साकारा, आले आकारा
दे तू होकारा, होशील का अर्धांगी दारा?

रसभरी मस्केगिरी ऐकुनी, प्रिया ती हसली
जळात हलते पाय सोडूनी, पाषाणी बसली
मग हळूच वदली, अती मंद-मंद मृदुभाषी
जसे रुणझुण पैंजण की, गुणगुणती मधमाशी

तुम्ही घातले साकडे, बोलुनी बोल धाकडे
मनही आल्हादले गडे, पण बोलू कशी खोटी?
माझ्या रूपाचा रंग भिन्न, चिंता घोर चित्त विषण्ण,
कसा व्हावा प्रेमरंग मान्य व्याकुळल्या पोटी?
गडे स्वीकारू कसा? तवं प्रीतीचा वसा
तन्मयतेने असा? फुकाच्या शब्दे

देवे घडविली मला, तसाच घडविला
बापू, माई आणिक भाऊ तान्हुला
सृष्टीचे अघटित चक्र, बापूला आले अंधत्व
आई पांगळी, दिले नियतीने मला पालकत्व
प्रश्न तोलाचा, लाख मोलाचा, उदरभरणाचा
घोट दुधाचा, ओठ तान्ह्याचा, सवाल जीवनमरणाचा
घरी उपाशी बसली सारी, रस्त्याला टक लावूनी
म्हटले “येते तान्हुल्या, थोडा दूधभात घेवूनी”
पदरी नाही अडकू-खडकू, कसे आणावे दूध कुठूनी?
तुम्ही माझा वेळ दवडला, तुमच्या कविता ऐकवूनी
उत्तम आहे तुमच्या कविता, मनही मस्त रमले
पण पोटातील काहूर माझ्या, जराही न् शमले

‘येत्ते मी आत्ता’ म्हणुनी, गेली निघूनिया तरतरा
ठेवूनी त्याच्या हातावरती, बेरंगी मोतीतुरा

त्या मोतीतुर्‍याच्या अजुनी नाही, फुटल्या प्रेम लाह्या
शोधीत आहे, तो वेडा बापडा, अजुनी प्रेम छाया

अभय रसिकहो, तुम्हांस दिसली, कुठे ती नयन मोहिनी,
द्यावा निरोप तिजला, तो कविराजा, वाट पाहतोय अजुनी……!

                                                                   गंगाधर मुटे
* * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** * ** 

घायाळ पाखरांस

घायाळ पाखरांस …
का गळाले अवसान या करांचे ?
का भासते मलूल फडफडणे या परांचे ?
आल्या अवचित कुठूनी अनाहूत गारा ?
तुला लोळविले भेदुनी तुझा निवारा …..!

दृढ हिकमतीने तू घरटे बांधियेले,
अगम्य कला गुंफुनी अध्धर सांधियेले,
विसरुनी भूकघास, प्राण ओतलास,
वादळात क्षणाच्या झाले सारे खल्लास …..!

गठन-विघटन असे सृष्टीचक्र,
उर्वीही कंपविते होतां दृष्टीवक्र,
उन्मळती तरूही जलप्रलयाने,
रे त्रागा अनाठायी, वियोग आशयाने ……!

सावर विच्छिन्न परं, घायाळ काया,
हो सिद्ध, धरी जिद्द, फिरुनी श्रमाया,
बाधित वेदनांनी, जरी ऊर धापे,
साधित काय होई, रुदन विलापे ? ……!

मेघ येती, विरती, पावती लयासी,
वारा, त्या गारा, अस्तल्या निश्चयासी,
न चिरंतन काही, क्षणभंगुर पसारा,
मग व्यर्थ का रे! शोक अंगीकारा ? ……!
  
रुदन, विलाप असे कायरत्व,
दान आर्जव दूषित याचकत्व,
सज्ज हो झुंजण्या, करुनी चित्त खंबीर,
विपत्तीशी टक्करतो, तोच खरा वीर……!

अनुकंपा, याचना, पसरणे हात,
त्यास म्हणतात मनुजाची जात,
तुम्हा पाखरांची स्वावलंबी पक्षीजात,
स्वसामर्थ्याने करावी अरिष्टावर मात …….!

सरोज तेथे पंक, फ़ूल तेथे काटा,
अवघड दुर्गम्य, होतकरुंच्या वाटा,
पार करुनी जाणे, विपत्ती सावटांना,
अंती जय लाभे, हिकमती चिवटांना ……!

सरसर शर सुटावा, चाप ओढताची,
धक धक उरी धडकी, नाद ऐकताची,
तसे तुझे उडणे, कापीत नभांगणाला,
जणू शूर शोभे, रणांगणाला ……!

पाट पाण्याचे थिरकत तरंग,
वरी विह्नंगावा तोऱ्यात राजहंस,
तसा तूही विहर, घे कवेत दिशांना,
नव्हे धरा रे ! गगन तुझा बिछाना ……!

घे शोध स्वत्व, त्याग आत्मग्लानी,
वाली तुझा तूची, बळ अंगी बाणी,
लाली भोर ल्याली, सरली निशा काळी,
“धडपड” हीच किल्ली, भविष्या उजाळी …!

घे अभय भरारी मित्रा,
घे एकदा भरारी……! 
घे एकदा भरारी……!! 



                                 गंगाधर मुटे

……….. **………….. **…………. **…………..