फेसायदान

फेसायदान

आता फेसबुकात्मके देवे । ना वाग्यज्ञे वैतागावे ।
तोषोनि पोस्टीस द्यावे । फेसायदान हे ॥१॥

जे अनेकांप्रती जळे । कळे तरी ते ना वळे ।
तया परस्परांचे लळे । लागावेजी ॥२॥

आयड्यांचे घमेंड जावो । कंपूबाजी अस्त पावो ।
जो जे वांछील तैसा लाहो । प्रतिसादो ॥३॥

तू खाजवी पाठ माझी । मीही खाजवितो मग तुझी
ऐसी सांठगाठ खुजी । जावो लयासी ॥४॥

काव्यत्त्वही जे रसहीन । ललीतही जे तथ्यहीन ।
तरीही रसिक सज्जन । सोयरे होतु ॥५॥

कुणी नर असो वा नारी । नसो तयी लेखणी विखारी ।
अनवरत फबुवरी । नांदो संवादू ॥६॥

चला साहित्यिकांचे गावी । तया ऐकवू कविता काही ।
काव्य आमुचे “रटाळ” नाही । समजाविण्याशी ॥७॥

काही पोस्टी अर्थाविन । हीन भासती सर्वांगिन
जैसी कुणी अलंकारहीन । सुवासिनी ती ॥८॥

काव्य म्हंजे नोय रद्दी । नाकळे जया न चित्तशुद्धी
तयांस द्यावी शुद्धबुद्धी । रे फेसबुक्या ॥९॥

किंबहुना सर्वज्ञानी । ऐसा कोणी स्वत:स मानी ।
पाजीजो तयास पाणी । बुक्कीत एक्या ॥१०॥

आणिक वंगाळ लेखणे । अश्लिल शब्द विशेषणे
योजिल अश्लाघ्य दुषणे । पुच्छ तया फ़ुटावेजी ॥११॥

येथं म्हणे श्रीफेसबुकाय । हा होईल दान अभय।
येणे वरे बुकेफेसाय । नाचते झाले ।।१२।।

– गंगाधर मुटे ‘अभय’
============

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

॥सांगा तुकारामा : अभंग-४॥

 

धाडा तुकोराया । विठूला सांगावा ।
मायेचा कांगावा । उतू आला ॥१॥

नासले सकळ । तन मन धन ।
मिथ्या जन गण । वेढीयले ॥२॥

विलासी लोळती । द्रव्याचे सोयरे ।
अनाठायी मरे । कामनिष्ठी ॥३॥

विव्देषाचा डोंब । कैसा परतावा ।
स्नेहाचा ओलावा । क्षीण झाला ॥४॥

वैष्णवाचे चित्त । झुंडीची मुसंडी ।
सावजाला धुंडी । मिथ्यावादी ॥५॥

नाही उपवासी । नाही एकादशी ।
अभय द्वादशी । सोडियेली ॥६॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१८/०७/२०१६

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

॥सांगा तुकारामा : अभंग-३॥

 

सांग तुकोराया तुझा । विठू कुठे मेला? ।
कर्जापायी भक्त त्याचा । स्मशानात गेला ॥धृo॥

पुजा, अर्चा, भक्तिभाव । आरतीचे ताट ॥
सर्वकाळ सत्संगाची । सोडली ना वाट ॥
तरी का रे अल्पायुषी । श्वास बंद केला ॥१॥

जित्रुपाचा दोर हाती । ओठी विठू नाम ॥
रात्रंदिन पाण्यावाणी । गाळलाय घाम ॥
तरी का रे चोपडला । कुंकवाने शेला ॥२॥

तुझा देव, धर्म तुझा । शोषकांचा साथी ॥
घोर, दु:ख, हीनता, गरिबी । पोशिंद्याचे माथी ॥
कळेना अभय कैसा । विठूचा झमेला ॥३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(१७/०७/२०१६)

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

॥सांगा तुकारामा : अभंग-२॥

 

तुझ्या विठ्ठलाचा । कैसा दुजाभाव ।
चारीमुंड्या गाव । चीत केले ॥१॥

रानातलं पाणी । उद्योगानं नेलं ।
उभं पीक मेलं । पाण्याविना ॥२॥

धरणाचा साठा । शॉवरात गेला ।
तिथं श्वान न्हाला । शैम्पुसवे ॥३॥

इथं पाण्यासाठी । शोधती टँकरं ।
धावुनी लेकरं । दुडुदुडू ॥४॥

तिथे शौचासाठी । फिल्टरले जळ ।
माळ्यावरी नळ । चुलीपाशी ॥५॥

इथे पिण्यासाठी । क्षारयुक्त पाणी ।
गढुळाचे धनी । गावकरी ॥६॥

लक्ष अब्जावधी । करोडोचा निधी ।
वाढवी उपाधी । शहरांची ॥७॥

ठेऊनिया कमी । शेतीमाल भाव ।
ध्वस्त केला गाव । पिळुनिया ॥८॥

गावही भकास । भकास मारुती ।
घामाची आहुती । व्यर्थ गेली ॥९॥

तिथे ऐश्वर्याचा । सुख, चैनी, भोग ।
सातवा आयोग । सेवेसाठी ॥१०॥

इथे दारिद्र्याचे । सर्वत्र साम्राज्य ।
कर्जाचेच राज्य । आम्हावरी ॥११॥

गाव म्हंजे जणू । दुभत्याची गाय ।
खरडूनी साय । रक्त पिती ॥१२॥

सांगा तुकोराया । अभय एवढे ।
कुणाला साकडे । घालावे गा? ॥१३॥

– गंगाधर मुटे “अभय”
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
१६/०७/२०१६

पायाखालची वीट दे….!

पायाखालची वीट दे….!

 

पंढ़रीच्या पांडुरंगा
तुझ्या चरणी ठाव दे
तीर्थप्रसाद काही नको
शेतमालास भाव दे

दुर्दशेने फस्त केल्या
रानाकडे ध्यान दे
शहरावाणी खेडे होईल
असे थोडे ज्ञान दे

हृदयामध्ये राम आणि
मुखामध्ये नाम दे
सूट-माफी-सवलत नको
घामासाठी दाम दे

पाऊस पाणी येऊ दे
शेत माझे न्हाऊ दे
चोच फुटल्या अंकुरांना
दोन घास खाऊ दे

संपत्तीच्या वृद्धीसाठी
लालसेचा रोग दे
शेतीमधल्या कष्टालाही
वेतनवाला आयोग दे

देवा मला चारदोन
सवंगडी धीट दे
हरामींना कुटण्यासाठी
पायाखालची वीट दे

वास्तवाच्या शोधासाठी
डोकं थंडगार दे
लढवैयांच्या लेखणीला
‘अभय’ आणि ‘धार’ दे

– गंगाधर मुटे ‘अभय’
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

लोकशाहीचा अभंग

लोकशाहीचा अभंग

आपुलिया हिता । असे जो जागता ।
फक्त त्याची माता । लोकशाही ॥

कष्टकरी जणू । सवतीचे पुत्र ।
वटारते नेत्र । लोकशाही ॥

पुढारी-पगारी । लाडके जावई ।
माफियांची ताई । लोकशाही ॥

संघटन, एकी । मेळ नाही ज्यांचे ।
ऐकेचना त्यांचे । लोकशाही ॥

मिळवुनी माया । जमविती धाक ।
त्यांची घेते हाक । लोकशाही ॥

वापरता तंत्र । दबाव गटाचे ।
तालावरी नाचे । लोकशाही ॥

सत्तापिपासूंच्या । द्वारी मटकते ।
रस्ता भटकते । लोकशाही ॥

चार पिढ्या सत्ता । एका कुटुंबाला ॥
म्हणू कशी हिला । लोकशाही? ॥

जनता ‘अभय’ । निर्भयाने व्हावी ।
ताळ्यावर यावी । लोकशाही ॥

                            – गंगाधर मुटे
————————————————
सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा….!
————————————————

जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)


जा रे कान्हा नटखट : गौळण (नाट्यगीत)


राधा : जा रे कान्हा नटखट, तू सोड माझे मनगट
         मोडेन तुझी खोड कान्हा सारी रे
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥१॥ 


कृष्ण : तू मस्त मदनाची नार, गोमटी झुंजार
           बोलीचालीत अंगार सखे, भरला गं
           तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥२॥


राधा : अधरी धरुनी पावा, का रे धून छेडीते?
          सुरांच्या लहरीने, धुंदी मज जडते
         नंदाच्या नंदलाला, रंगीला रंगलाला
         मुरलीचा मोह नच पाडी रे 
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥३॥


कृष्ण : गार गार वारं वाहे, बहरिले अंग
          वेणुच्या नादाने का न होशी दंग?
          वेडीच्या वेडलगे, जिवीच्या जिवलगे
          शुन्यात ब्रह्म कसा भरला गं?
          तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥४॥


राधा : निळे-निळे आकाश, निळा माझा शालू रे
         हिरवे हिरवे शिवार, हिरवी किनार रे
         खोडीच्या खोडकरा, प्रितीच्या प्रियकरा
         प्रितीची चाल नगं चाली रे
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥५॥ 


कृष्ण : ना निळे अंबर, ना हिरवी किनार गं
          वितभर दुनियेचा, मोह पसारा गं
          तन-मन मज देई, रज-तम दूर नेई
          प्रितीने भोग सारा सरला गं
       तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥६॥


राधा : तन-मन कृष्णा तुला, समर्पित केले रे
         रज-तम मुरलीधरा, आज वर्ज्य केले रे
         येरे येरे कान्हाई, प्रितीचा पंथ दावी
         प्रणयाचा खेळ आज खेळी रे
         मला समजू नको भोळीभाळी रे ……॥७॥ 


कृष्ण : अशा रितीप्रितीने, शरण कुणी येईन
          प्रितीचा खेळ खेळून, पंथ तया दाविन
          अरविंद गीत गात, नाद घुमे गोकुळात
          प्रितीने जीव सारा तरला गं
          तुझ्या पदराला हात राधे धरला गं …॥१॥


                                          गंगाधर मुटे
…………………………………………….
(१९८० चे सुमारास लिहिलेली गौळण)

चोरटा मुरारी – गौळण

चोरटा मुरारी – गौळण





        शिंके हा तोडी, माठ हा फ़ोडी
        सांगा याला कोणी
        कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥धृ०॥



शेला पागोटा काठी हातात
अवचित येवुनिया घुसतो घरात
खिडकी हा तोडी, काचा हा फ़ोडी
बांधा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥१॥



        यमुनेचा चोरटा, मथुरा मुरारी
        पकडाया जाता, होतो फ़रारी
        चव हा चाखी, ओठ हा माखी
        टांगा याला कोणी
        कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥२॥



व्दारकेचा व्दाड, ऐकेना कुणाशी
अरविंद मागे लोणी, हरी चरणाशी
कमरेशी बांधा, पायाशी टांगा
कोंडा याला कोणी
कान्हा रे माझ्या माठात नाही लोणी… ॥३॥



                                                 गंगाधर मुटे
………………………………………………………………
१९८०-८५ च्या सुमारास लिहिलेली गौळण
………………………………………………………………

चेंडू मारियेला

चेंडू मारियेला

            यशोदे तुझा कृष्ण निराला
            राधेश्याम! चेंडू मारियेला
            कशी जावू यमुने तीराला
            घनश्याम! चेंडू मारियेला …. ॥धृ०॥


रंगी श्रीरंग, नरनारी संग
मारी पिचकारी, भिजवितो अंग
दिसरात हर जागियेला …. ॥१॥


            रगडी गुलाल, गळा,मान,गाली
            राधा लाल लाल, शरमिली झाली
            चराचर सुर लाजियेला ….॥२॥


माधवाचा घोष, जाहला जल्लोष
बेधुंद नाचताती, मुरलीचा जोष
अरविंद क्षण पाहियेला …. ॥३॥


                                      गंगाधर मुटे
…………………………………………..
(१९८०-८५ चे सुमारास लिहिलेली गौळण)

वेणी सोडुनिया : गौळण

वेणी सोडुनिया : गौळण

          गुपचिप आला हा उघडोनी ताला
          झोपेमधी होते याने रंग टाकीला
          गौळण सांगे राधा, गौळणीला …. ॥धृ०॥
.
नाही गडे याचा, जराही भरोसा
नख मारूनिया दिला, पदराला खोसा
बेगी बेगी येतो, चिमटेची घेतो
वाकड्या, सुदामा, पेंद्या संगतीला ….. ॥१॥
.
          करुनिया चाल, डिवचितो गाल
          वेणी सोडुनिया आत, भरतो गुलाल
          असा चक्रपाणी, कोणा ना जुमानी
          चिंबाचिंब भिजवितो पैठणीला ….. ॥२॥
.
कुणी गडे याला, जरा समजावा
बोलताती सासू दीर, मार किती खावा
वळणाचा घाट, हा अडवितो वाट
अरविंद पाहे सखे, ब्रह्मलीला ….. ॥३॥
.
                                    गंगाधर मुटे
……………………………………………
१९८० च्या सुमारास मी लिहिलेली एक गौळण. ’’गौळण” एक लोभसवाणा काव्यप्रकार. गोकुळात श्रीकृष्णाने गोपिकांसमवेत ज्या कृष्णलीला केल्यात त्याचे रसभरित गेयरूपी वर्णन म्हणजे ’’गौळण”. पवित्र आणि वासनारहित प्रेमाचे प्रतीक म्हणजे “गौळण”. पण या काव्यप्रकाराची फारशी दखल साहित्यक्षेत्राने घेतलेली नसावी.
जाणकारांनी या काव्यप्रकाराविषयी अधिक प्रकाश टाकला तर आवडेल.
……………………………………………