मी






नमस्कार मित्रहो,
ही माझी छोटीसी दुनिया…
माझ्या छोट्याशा दुनियेत आपले मन:पुर्वक स्वागत..

मित्रहो,
मी हाडाचा ना कवी ना लेखक.
मी आहे एक हाडा-मांसा-रक्ताचा शेतकरी.
शेतकरी कुटूंबात जगतांना जे पाहीलं,अनुभवलं,
ते बरं-वाईट वास्तव प्रामाणिकपणे लिहायचा प्रयत्न करतोय.
त्यासोबत काही न उलगडलेली उत्तरे शोधायचा प्रयत्नही करतोय.
……………

मित्रहो,
            तीन हजारच्या आसपास लोकसंख्या असलेलं माझं एक छोटसं गाव. जन्म आणि बालपण येथेच गेलेलं. महाविद्यालयीन शिक्षण व त्यानंतर मार्केटींग क्षेत्रात नोकरी करतांना थोडाफ़ार काळ शहरात गेलेला. पण काही अपरिहार्यतेमुळे पुन्हा एकदा गावाकडे पावले वळली आणि येथे स्थायिक झालो तो कायमचाच.
           कविता,गाणी व भजने लिहिण्याची बालपणी खूप आवड होती. मजा वाटायची, आनंद लुटायचो पण बालपण संपायच्या आतच ’भाकरीचे प्रश्न’ निर्माण झालेत आणि ’भाकरीचा शोध’ घेता-घेता उरलेलं बालपण,तरूणपण यांची पुरती वाट लागली, अगदी जळून राख झाली. आणि त्यासोबतच कविता,गाणी व भजने लिहिण्याची ऊर्मी,प्रेरणा कुठे व कशी गहाळ झाली ते कसे म्हणुन कळालेच नाही.

“शोधात भाकरीच्या निम्मी हयात गेली
   स्वप्नेच वांझ झाली, तारूण्य जाळतांना.”

            अशी ’आयुष्य कोमात’ गेलेली अवस्था दोन-चार वर्षे नव्हे तर चक्क दोन तपाला पुरून उरेल एवढा काळ कायम होती.
काळाच्या प्रवाहात भाकरीचा प्रश्न सुटला. आयुष्यात जे जे हवे ते ते मिळाले. पण कविता करण्याची प्रेरणा मात्र करपूनच गेली होती. मी कवितेला अन् कवितेने मला पुर्णत: एकमेकांना विसरलोच होतो. पाऊलखुणा सुद्धा उरल्या नव्हत्या. याजन्मी भेटगाठ होईल असेही वाटलेच नव्ह्ते कधी.
एका अर्थाने आयुष्य संपलेच होते.
पण …..
काही दिवसापुर्वी अपघाताने मराठी संकेतस्थळ “मायबोली” वर गेलो. तेथे रमलो आणि चमत्कारच झाला. 
पुन्हा एकदा आयुष्याला नवा टर्निंग पॉईंट मिळाल्याचा भास होतोय. 
पुन्हा एकदा नव्या जोमाने “ते” बालपण परत आल्यासारखे वाटतेय. 
जीवनाचे सर्व रंग माझ्या भोवताली फ़ेर धरून नाचताहेत असा आभास होतोय.
आणि जी कविता खूप दूर निघून गेली होती ती आता खुणावत असल्याची स्वप्नेही पडायला लागलीय.
.
.
पण हे मी तुम्हाला का म्हणून सांगतोय? कशासाठी सांगतोय? आत्मस्तुती की आत्मगौरव? मनशांतीसाठी की मनमोकळे करण्यासाठी? निष्कारण बडेजाव की शब्दपाल्हाळ?
.
.
प्रश्न अनेक पण उत्तर मात्र एकच…..
.
.
         ही कहानी माझी एकट्याची नाही. या देशात सत्तर टक्के जनता ज्या तर्‍हेने जीवन जगत्येय ते पाहता ही बहूसंख्य घरातील कहानी आहे.
चार भिंतीच्या आत अशा कहाण्यांचा जन्म होतो आणि चार भिंतीच्या आतच कहानीचा शेवट.
अशा कहाण्यांना वाच्या फ़ुटावी. काही ठोस उपाययोजना व्हाव्यात अशा काहीशा भाबड्या आशेने या चार भिंतिच्या आतील दु;खाचे उदात्तीकरण करण्याचा एक इवलासा प्रयत्न.
.
.
मित्रहो,
आपणास माझे काव्य आवडले तरी आणि नाही आवडले तरीही प्रतिक्रिया अवश्य द्या…

 २७ फ़ेब्रुवारी २०१०                                                                                गंगाधर मुटे 
————————————————————————
संपर्क :        गंगाधर मुटे                                                                            
                   मु.पो - आर्वी छोटी – ४४२३०७
                   त. हिंगणघाट  जि.वर्धा. 

ईमेल :       ranmewa@gmail.com 
————————————————————————

37 comments on “मी

  1. गंगाधराव : उत्तम जमलाय बॉग!!! आपल लिखाण आपला आयुष्याबद्दलचा अनुभव अन दृष्टीकोन दाखवत.. असेच लिहीत रहा ..खुप खुप शुभेच्छा !!!

    सस्नेह :

    गिरीश कुलकर्णी

  2. मुटेसाहेब,

    ब्लॊग आवडला….आणि तुमचं मनमोकळं मनोगतही फ़ार भावलं.
    तुमचे अनुभव, कल्पना इथे लिहायला मनापासुन शुभेच्छा !

    सस्नेह
    प्रकाश काळेल

  3. एका मराठी शेतकऱ्याचा स्वत:चा ब्लॉग असू शकतो. यावर माझा विश्वासच बसत नाहिये.
    तुम्हाला मन:पूर्वक शुभेच्छा….

  4. मुटेसाहेब, तुमचा ब्लॉग आवडला.. तुम्ही शेतीवर (कधीकधी जरा अतीच :) ) लिहिता माबोवर ते पण आवडते.. कवितांच्या बाबतीत मी जरा ’जड’ असल्याने फारसा फिरकत नाही.. अधिक उत्तम कविता लिहा..

  5. मुटे साहेब एक मदत हवी होती.
    मीम वर व्यनी केला आहे. लवकरात लवकर पहा अन लिहा.

    आधिच धन्यवाद.

  6. Gangadharjee, tumachya Ma. Bo. warahya kavita etc me nehami wachate…kharach khup uuchch darja che lihita tumhi…ani tumachya likhanamadhe khup vividhata ahe….shubhechchha !! (mhanaje aamhala hee bharapur navin wachayala milel :) )

  7. गंगाधरजी,तुमचे लिखान मी मायबोलीवर नेहमी वाचते.
    खुप छान आणि उच्च दर्जाचे लिहिता तुम्ही.
    तुमच्या लिखानामध्ये खुप विवीधता आहे…
    शुभेच्छा…!!
    (म्हणजे आम्हालाही नविन वाचायला मिळत राहील. :) )

  8. मुटेसाहेब,

    मला तुमचा ब्लॉग आवडला. तुमच्या कविताही हलक्या-फुलक्या आहे.
    तुमचा शेतातील अनुभव, तुमची मराठी भाषेविषयीची तळमळ ती तुमच्या कवितांतुन जाणवते..
    असेच भरपुर लिहा….
    तुम्हाला हार्दिक शुभेच्छा..!

    श्रीवर्धन, पुणे.

  9. नमस्कार. मला तुमच्या कविता आवडल्या. तुमच्या देशभक्तीपर कवितेला compose करून मी हि कविता compititionla पाठवू का. त्यासाठी तुमची parmission हवी आहे.उत्तराची वाट पाहते. thank U. ( मला आवडलेली कविता – रे जाग यौवना रे.)

  10. शंतनुजी,पाषानभेदजी,श्रीवर्धनजी,मृणालजी
    सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

    मृणालजी,
    मेल केली आहे. न मिळाल्यास कळविणे. धन्यवाद..!!

  11. स्वप्नालीजी,
    तुमची कॉमेंट स्पॅम झाल्याने ती मला आज पहायला मिळाली.
    आपुलकीने प्रतिसाद दिल्याबद्दल आभारी आहे.

  12. Namste 1
    Jayant’la Anumodan !
    आपल्या शे्तीचे थोडे फोटो टाका ना !

  13. नमस्कार गंगाधरजी,
    मी सुद्धा वर्‍हाडातल्या एक शेतकर्‍याचा मुलगा.
    पण आता प्रौढ आहे. आपल्या कविता मी नेहमीच वाचतो व ऐकतो.
    आमच्या वेळी प्रो. देविदास सोटे वर्‍हाडी कविता लिहित असत.
    मला त्यांच्या कविता खूप आवडायच्या.
    पण बराच काळ नोकरीनिमित्त बाहेरदेशी असल्यामुळे मराठीशी संपर्क कमी झाला.
    मायबोलीशी संबद्ध कायम रहावा म्हणून बरेच प्रयत्न करत असतो.
    आपल्या कविता वाचन त्यातलाच एक. असो.

    आपला
    गणेश हजारे
    (1 September 2010)

  14. गंगाधरभौ,
    तुमची शेतकर्‍यांबद्दल असलेली कळवळ नेहमीच तुमच्या लिखाणातून दिसून येते. ती तशीच राहु देत. ज्यांनी शेतकर्‍यांचं जिवन जगलं आहे किंवा अनुभव तरी आहे त्यांना नक्कीच ती कळणार. शेती हा खरं तर एक व्यवसाय कारण इतर व्यवसायां प्रमाणेच यात गुंतवणूक, मेहनत ही करावी लागते नफा मिळवायला. परंतु नजीकच्या काळात हा व्यवसाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असेच दिसतेय. सरकारची धोरणे लहान शेतकर्‍यांना मदत करण्या ऐवजी, अश्या शेतकर्‍यांना शेतीपासून परावृत्त करण्याचीच दिसून येत आहेत.
    एके काळी भूदानाची चळवळ चालवून तसेच कसेल तो शेतकरी, तोच शेतमालक या धोरणाखाली जी थोडीफार शेतजमीन मजुरांना/गरीबांना मिळाली ती सुद्धा काढून घेण्याचं सध्याच्या सरकारांचं धोरण दिसून येतंय अर्थातच यात काही व्यक्तींचा आर्थिक फायदा होणे हाच त्या मागचा मुख्य उद्देश आहे.

    मला स्वत: ला तरी भविष्यकाळ चांगला दिसत नाहीय (लहान शेतकर्‍यांच्या अस्तित्वाबाबत). नाइलाजाने का होईना परंतु लहान शेतकर्‍यांना हळु हळु शेतीच्या व्यवसायातून बाहेर पडावे लागेल असे दिसतेय. जर जगायचे असेल, पुढील पिढीला जिवन द्यायचे असेल तर हा पर्याय स्विकारावा लागेल.

    निसर्ग चा समतोल बिघडत चाललाय, वाढत्या जागतीक उष्णतामानामुळे पावसाचं चक्र हे अनियमीत होणार, एक वर्ष कमी पाउस म्हणून पिक कमी परंतु खर्च जास्त, दुसरं वर्ष जास्त पाउस पिक वाया, नुकसान हे असं दोन तीनदा लागो पाठ झालं की लहान शेतकरी संपलाच.
    सरकार काय करणार हे सांगायला नकोच.

    या बाबतीतलं तुमचं लिखाण चालूच ठेवा. कोणाच्याही नकारार्थी प्रतिकीयांवर लक्ष देणे आवश्यक नाही.
    शेतकर्‍यांचा फायदा होवो किंवा न होवो तुम्हाला जे खटकतेय ते लिहा.
    तुम्ही एखादा धर्मग्रंथ लिहीत नाहीय किंवा तुम्हाला तुमच्या लिखाणातून एखादा धर्म/संप्रदाय स्थापन करायचा नाहीय त्यामुळे प्रत्येक लिखाण हे त्याच तोडीचं असणे आवश्यक नाहिय. असंतोषातून आलेल्या प्रत्येक लिखाणातून क्रांति होणे आवश्यक नाही किंवा तशी अपेक्षा ही ठेवू नये.

    [असंतोषातून आलेल्या प्रत्येक लिखाणातून जर क्रांति व्हायला लागली असती तर रोजच ती झाली असती आणि कदाचीत त्यामुळे तीचं महत्त्व सुद्धा राहीलं नसतं]
    .
    समंजस
    13 September 2010 7:55 PM

  15. गंगाधर मुटेजी -रानमोगरा वाचतो आहे . अप्रतिम ह्या शिवाय मी त्याला काही संबोधू शकत नाही .
    आपल्या तळहातावर साहित्याची ,प्रतिभेची जी ठळक रेषा उमटली आहे. त्याचे खूप कौतुक आपले फोटो आल्बम अप्रतिम ,
    शेतकरी मेळाव्याचे फोटो देखील डोळे दिपवणारी आहे .त्यातील आपले बरेचशे लिखाण मी वाचलेले आहे .
    आपली कवितेतील चौफेर टोलेबाजी मी बघत आहेच .नागपुरी तडका मस्त जमून गेला आहे .
    ईतर ललित लिखाण पण छान जमले आहे . त्यात तुमचा अनुभव बोलत आहे. हे खूप बरे वाटते .
    माझ्या मनापासून शुभेच्छा. पुढील प्रतिभेच्या प्रवासासाठी

  16. संतोषजी, अनामिकजी, गणेशजी, गजाननजी, समंजसजी, वरीआरजी, प्रकाशजी, नरेशजी
    सहृदय प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा.

  17. तुमचे लिखानकाम उत्तम आहे. ते नसते तरिही आवडले असते. शेतकरी हा कोणत्याही भागातला आणि कसाही असला तरि त्याविशयी आपुलकी राहणारच…..

  18. मा. श्री. गंगाधर मुटे यांस, सप्रेम नमस्कार.

    परवा आपली कविता मिसळपाव या संकेतस्थळावर वाचली -’बायको : नागपुरी तडका’ , आवडली. त्या निमित्ताने तुमच्या ब्लॉग वर आलो. बरेचसे लि़खाण एका बैठकीत वाचून काढले. आपल्या कविता छान आहेतच, परंतू आपले स्फुटलेखन फारच आवडले. विशेषतः वांग्याची कहाणी, शेतकरी होण्यासाठी आवश्यक पात्रता, शेतकर्‍याला आयकर का असावा हे फारच आवडले.

    शेतकरी होण्यासाठी आवश्यक गोष्टी वाचताना जणु मी माझीच स्टोरी वाचतो असा भास झाला. मी १४ वर्षांपुर्वी पुण्यातील काँप्युटरचा स्वयंरोजगार (आणि पत्नीची नोकरी, एसपी कॉलेज मध्ये लेक्चरर) सोडून काहीतरी वेगळे करायचे म्हणून पुण्यापासून १०० कि.मी. वरील गावी, वडिलोपार्जित शेतीवर, पत्नी व दोन छोट्या मुलांसह, जावून रहाण्याचा निर्णय घेतला. आणि आज पन्नाशीला पोहोचल्यावर मागे वळून पहाताना काहीच दिसत नाही. माझ्या बरोबरीच्या लोकांची दोन दोन घरे, गाड्या इन्व्हेस्टमेंट्स इ. होवून ते निवृत्तीचे प्लॅनिंग करीत आहेत व आम्ही मात्र घरचे दूध व धान्य यांच्या फुशारक्या मारीत होतो तिथेपण नाही आहोत. त्यामुळे स्वतःची जिरवून घेण्याच्या तुमच्या मताशी सहमत आहे. कर्जाचे मोठे मोठे आकडे आणि ज्यांचे आयुष्यात कधी तोंडही पाहीले नसते अशा लोकांची कर्जे घेतल्यामुळे आणि फेडू न शकल्यामुळे त्यांना तोंड देता देता हाल होतात. खोटे बोलण्याला व वायदे करण्याला तर सीमाच नाही. लोकांचा तर सोडाच, घरच्यांचा व आतातर माझाच माझ्या शब्दावर विश्वास नाही अशी परीस्थीती आहे खरी.
    मध्यंतरी पुण्याच्या एका मित्रास अशीच वडिलोपार्जित जमीन वाट्यास आली. त्याने मला सल्ला विचारला की, जमीनीतून पैसा कसा मिळेल? त्याला एका शब्दात सांगितले – विकल्यावर. खरोखरच त्याने चांगल्या किमतीस जमीन विकली आणि पुण्यास आणखी एक फ्लॅट घेवून सुखी झाला. मी पण बहुतेक त्याच वाटेवर आहे. दोन्ही मुले आता मोठी झालीत. (२२ व १७ वर्षे). त्यांनी पुण्याला जाण्याचे ठरविले आहेच. त्यामुळे २,४ एकर ठेवून बाकी १२ एकर विकले तर बर्‍याच कटकटींतून सुटका होईल असे वाटते.
    हि सर्व रामकहाणी सांगण्याचे कारण आपल्या लि़खाणाने अगदी दुखर्‍या नसेवर हात ठेवला. आपल्या ब्लॉगचे मुद्दाम पत्नी बरोबर सहवाचन केले. आम्ही हसलो खरे, पण ते हसू म्हणजे, आपला लहानपणीचा फोटो पहाताना आपण कसे बावळट होतो ते पाहून हसू येते असा काहीसा प्रकार झाला. तुमच्या लेखनाच्या आरश्यात आम्हाला आमचेच प्रतिबिंब दिसले. हा आरसा दाखविल्या बद्दल आभार.

    शुभेच्छांसहीत,
    आपला – एक शेतकरी
    —————————————————–

  19. I have seen your show today in star mazha & gone through ur site .
    Ya, ur poems r exl well i have heard a lot about u from my brother Rajesh Kherde akola
    Ur work shows the ever best use of the blog & hearty congrats

  20. puna ekda sharad joshi ani shetkari sanghtana……
    hardik abhinandan kaka
    pranav babuji kitukale
    chandur bazar shetkari sanghatana
    9823600381

  21. अभिनंदन!
    देशाला विकास करायचा असेल तर शेतकऱ्याचा आणि कष्टकऱ्यांचा विकास होणे गरजेचे आहे कारण देशाची खरी ऊर्जा ही तळागाळात असते आणि नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे व्यक्त होणे ही काळजी गरज आहे.तुम्ही उद्याच्या शेतकऱ्याचे प्रतिक आहात.
    तुम्हाला मातीच्या आणि ब्लॉगच्या मशागतीसाठी शुभेच्छा!!!!!

तुमचा अभिप्राय नोंदवा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदल )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदल )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदल )

Connecting to %s