आधी काय निर्माण झाले असावे?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटून जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत आणखी वाढतच जाते, वैताग येतो. आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणून आपण विषय सोडून देत असतो.
………….
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीण असते?
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असू शकतो?
‘आधी कोंबडी की आधी अंडी’ या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रीय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळून जाते. कळून चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासून कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दूर होते आणि मग लक्षात येते की महाकठीण वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
…………………….
आज हा विषय चघळण्याचे कारण?
२६ जानेवारी – गणराज्य-प्रजासत्ताकदिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
‘काय मिळवले काय गमाविले’
‘देश जगात महाशक्ती म्हणून उदयास येणार की नाही’.
‘देशाला प्रगतिपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिले’.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा? नेते मंडळी की जनता जनार्दन?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा…… उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारीख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरू.
हे असे रहाटगाडगे………..पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती…..!!
याला म्हणायचे प्रजासत्ताकदिन धूमधडाक्यात साजरा करणे…..!!
जोरसे बोलो….
प्रजासत्ताक दिन चिरायू होवो….!!!!!!!!!!!!!!!
Jan
24
2011
कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन
कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन
गंगाधर मुटे
————————————————————
(पुर्वप्रकाशित १२.०१.२०१०)
————————————————————